#ज़रूरतमंद
गरज तेथे मदत करा
जीवनात सुख-शांती व समाधानाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण देवाला साकडं घालतात, नवस करतात. मागणी पूर्ण झाली की काहीजण देवाला अन्नाचा अभिषेक करतात तर काही भंडारा करून अन्नदानाचे कार्य करतात. अन्नदान करणे हे चांगले कार्य आहे परंतु अन्नाचे दान कुणाला द्यावे ? ज्यांना अन्नाची खरी गरज आहे त्यांना अन्नदान दिल्यास, पुण्य आपल्या पदरी पडेल. आत्मिक समाधान मिळेल. परंतु आपल्या हातून असे घडतच नाही. गरीब दरिद्री व खंगलेल्या लोकांना आपण पंगतीमधे प्रवेश देत नाही. त्यामुळे आपण देवाकडे केलेला नवस पूर्णत्वास जातो का ? त्याऐवजी आपल्या नवसपूर्तीसाठी गरजवंत लोकांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे
त्यामुळे गरजवंताची जीवन सुसह्य होईल. प्रत्येक गावात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने भंडारासारख्या कार्यक्रमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यातून गावातील व शेजार गावातील गरीब-श्रीमंत या सर्वांना त्याचा लाभ दिला जातो किंवा घेतला जातो. परंतु यात खरोखरच किती गरजवंत राहतात ? याचा आकडा जर काढला तर बोटावर मोजता येतील एवढीच संख्या आढळून येते. .आज एक वेळच्या जेवणाची सोय नसलेल्या जनतेची संख्या खूप मोठी आहे. अशा भुकेल्या लोकांची व्यवस्था करण्याची फक्त शासनाची जबाबदारी ठरवून आपण मोकळे राहणे योग्य आहे का ? माणुसकीच्या नात्याने आपण त्यांच्याविषयी एकदा तरी विचार का करू नये ? याबाबत प्रत्येक सधन व्यक्तीने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
आज देशात कित्येक सेवाभावी संस्था आहेत जे की खऱ्या गरजवंतांना मदत करतात. जेव्हा देशावर भूकंप किंवा नैसर्गिक संकटे आली त्या रिलिफ फंडाच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देण्यात आले. काही सेवाभावी संस्था आर्थिक प्रश्नामुळे रेंगाळत असतात. कुणाकडे मदतीचा हात मागवला तर त्यांना फारच कटू अनुभव येत असतो. संस्थेचे लोक जेव्हा जातात तेव्हा समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे नाक मुरडतात किंवा बघूया पुन्हा असे उत्तर ऐकायला मिळते. खरोखरच जर संस्थेचे कार्य कौतुकास्पद असेल तर अशा संस्थेला मदत करणे निश्चितच आपले चांगले कार्य नव्हे का ? आपल्या मनात असलेल्या कल्पना त्यांना सांगून त्यांच्या संस्थेमार्फत काही चांगले कार्य करता येईल काय? याचा विचार करून त्यांना मदतीचा हातच नव्हे तर त्यात सक्रीय सहभाग घेतल्यास त्या रेंगाळलेल्या संस्थेचे पुनर्जीवन तर होईलच शिवाय पूर्वीच्या कार्यकर्त्यात एक नवा उत्साह संचारेल ? ज्याप्रकारे आपण जेवण प्रारंभ करण्यापूर्वी देवासाठी पहिला घास बाजूला ठेवतो. त्याच प्रकारे आपल्या रोजच्या कामातून नाही तर नाही निदान मासिक कमाईतून ही रक्कम देवासाठी काढावे ही प्रथा बर्याच जणांनी अवलंबिली सुद्धा असेल. परंतु जमा झालेली ती सर्व रक्कम देवाचा कार्यासाठी या ना त्या निमित्ताने करतात. त्यापेक्षा त्या देवाची पैशातून काही गरजवंत व्यक्तींना मदत केल्यास त्यात मिळणारे समाधान फार मोठे आहे.
नवसपूर्तीसाठी देवाच्या पायऱ्या चढावेच लागते हा पायंडा पण बदलू शकतो. गाडगेबाबा म्हणत देव कुणा दगडात नाही, मंदिरात नाही ना लाकडात नाही तर देव प्रत्येकात आहे. प्राणिमात्रांची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने देवांची सेवा करतो. ज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे याची अनुभूती वारंवार आपल्या जीवनात येत असते. जी व्यक्ती अत्यंत गरजू लोकांना हवी ती मदत करतात त्यांच्यावर देव कधीच नाराज होत नाही. गावात जयंती, पुण्यतिथी, उत्सव किंवा गावातील धार्मिक कार्यक्रम करण्यात येतो त्यातील काही टक्के वाटा प्रत्येकांनी बाजूला ठेवून जर देशातील बऱ्याच गरजवंताची एकवेळची भूक मिटवू शकले तर ती एक प्रकारे आपल्या देशाला चांगली मदत होऊ शकेल तशी विचारशक्ती आपणा सर्वांना प्रदान होवो हीच सदिच्छा
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769