#काव्योत्सव -२
# सामाजिक
धर्म....
जाणवतय का तुम्हाला माझं मर्म....
मी नाही एक चौकट, मी नाही केवळ एक बांधीव पुस्तक..
मी आहे एक जीवनप्रणाली आणि जगण्याचं भान देणारं वास्तव....
कुणी वदवलं मला रणांगणावर कुणाच्यातरी मुखातून
कुणी सजवला मला हिरव्या रंगाच्या कागदी सोनेरी नक्षीच्या वर्खातून
कुणी ठेवलं मला बंद करून स्तूपात
कुणी अडकवून ठेवलं मला डोक्यावरच्या काटेरी मुकुटात!!
कुणी म्हटलं मी आहे शाश्वत चिरंतन सत्य
कुणाला सापडलो मी म्हणत सर्वच आहे दुःख आणि अनित्य!
कुणी म्हटलं एक दिवस येईल निर्णयाचा दिवस
कुणी म्हटलं स्वर्गाच्या दारी गेलं की संपेल थांबेल जीवनच!
कुणाचा प्रेषित गात येतो करूणेचे गीत
कुणाच्या ऋचा गाती समाजसंस्थापनेचे संगीत
संध्याकाळी कुणी हाक देतं आरोळीत
कुणी डोंगरी लेण्यात बसून ध्यानसाधनेत मन रमवीत!!
कुणाचा देव एक तर कुणाचे अनेक
कुणी पूजतात दिशा केवळ कुणी लिहीतात शिलालेख!
असं असलं तरी मी सर्वांच्या मनात सारखाच आहे
माणुसकी माझा प्राण आणि आत्मीयता माझा श्वास आहे
मी नाही व्यक्ती मी नाही जात
मी आहे मनामनातून तेवणारी वात
ही वात शांततेची ही वात घडण्याची
ही वात घडविण्याची आणि जीवन उजळविण्याची
सवे येऊन सारे आपण वातीने वात जोडूया
तेजस्वितेच्या प्रकाशात सर्व एक होऊया
धर्माचे मर्म जाणूया