एकाग्रता हीच यशस्वीता
आजकाल माझे मन कुठंच लागत नाही, मन अस्वस्थ वाटायला लागतं, वाचलेले काही लक्षात राहत नाही, अशी काही वाक्य आपल्या मित्रांकडून किंवा नातलगातील व्यक्तीकडून ऐकतो तेंव्हा अगोदर मन एकाग्र कर, बाकी सर्व ठीक होईल, असा सल्ला देतो. मन एकाग्र करणे म्हणजे काय ? मनाची एकाग्रता म्हणजे आपले लक्ष, अवधान. आपले लक्ष नसेल तर मन एकाग्र होणार नाही आणि कोणतीही क्रिया यशस्वीपणे पूर्ण होणार नाही. ही एकाग्रता एका दिवसांत किंवा काही महिन्यात मिळविणारी गोष्ट नाही. त्यासाठी लहानपणापासून आपणांस असलेल्या अनेक सवयीचा परिपाक म्हणजे एकाग्रता. एकाग्रता वाढली की आपली स्मरणशक्ती वाढायला लागते आणि आपण जीवनातील अनेक संकटे लीलया पार करू शकतो. ध्यानधारणा करून चित्त एकाग्र करण्याचे काम पूर्वीचे संत लोकांनी केले आहे. ऋषीमुनी तपश्चर्या करण्यासाठी घनदाट जंगलात, एखाद्या गुहेत किंवा उंच पर्वतावर जाऊन बसत. त्यांची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यापाठीमागचा उद्देश्य असायचा. सांसारिक जीवन जगताना आपले मन एका गोष्टीवर एकाग्र होतच नाही. मालिका चालू असतांना जसे मध्येमध्ये जाहिराती येतात अगदी तसेच अडथळे अधूनमधून येतात ज्यामुळे आपली एकाग्रता लोप पावते आणि कामाचा खोळंबा होतो. लहान मुलांचे मन खुपच चंचल असते. त्यांना एक जागेवर दोन मिनिटं बसून राहा म्हटले तर ते बसून राहू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे तरच ही मुले भविष्यात हुशार होऊ शकतात. लहान मुलांना छोटीछोटी अनेक सोपी कामे सांगितली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात एकाग्रता वाढू लागते. माझं बाळ अजून लहान आहे म्हणून काही काम सांगितले नाही तर त्यांच्यात एकाग्रता निर्माण होणार नाही. त्याच्या वयाला झेपेल अशी कामे त्यांना करायला देणे म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास समजल्या जाते. मेंदूला जेवढं काम दिलं तेवढं त्याचे आयुष्य वाढत राहते. पण जास्तीचे काम लावणे देखील धोक्याचे आहे. काही जण अति ताण घेतात आणि आपल्या जीवाला मुकतात. पूर्वीच्या काळी मनाच्या एकाग्रतेसाठी व शिक्षणासाठी मुलांना गुरुकुलमध्ये पाठवत. त्याठिकाणी त्याला स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावल्या जात असे. विविध प्रकारचे अनुभव शिक्षण त्यांना देऊन त्यांची एकाग्रता वाढविण्याचे काम येथे केले जात असत. पण आज अशी पद्धत नाही म्हणून मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय घरातून लावणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर ही मुले आळशी होऊन भविष्यात प्रगती साधणार नाहीत. शिक्षणासाठी मुलांना शाळेत पाठविले जाते. शिक्षक तेथे शिकविण्याचे काम करतात. शिक्षक शिकविताना काही मुले लक्ष देतात तर काही मुले दुर्लक्ष करतात. जी मुले शिकविण्याकडे आपले मन एकाग्र करून दिलेलं काम करतात तीच मुले पुढे प्रगती करतात. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत आपण मन एकाग्र करतो तर नावडतीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे ती बाब कधीही जमणार नाही. शालेय जीवनात मुले अमुक विषय सोपा आणि अमुक विषय अवघड असे का म्हणतात ? तर त्या विषयाकडे त्याची असलेली एकाग्रता हेच सर्वात मोठे कारण आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत एकाग्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय काही मिळणार नाही. एकाग्रतेसाठी कान आणि डोळे अत्यंत महत्वाचे आहे. डोळ्याने पाहणे आणि कानाने ऐकणे या क्रिया परिपूर्ण झाले तरच काही गोष्टी कळतात. ह्या दोन गोष्टी जर वजा केले तर आपले मेंदू काहीच कामाचे नाही असेच वाटते. एकाग्रता वाढविण्यासाठी योगासने, ध्यानधारणा आणि प्रार्थना ह्या गोष्टी देखील महत्वाचे आहेत. ज्याचा रोज सराव केला तरच शक्य आहे. काही नवीन शिकायचे असेल तर मनाची एकाग्रता वाढविणे आवश्यक आहे.
- नासा येवतीकर, 9423625769