'स्वराज्यसूर्य शिवराय' ह्या माझ्या चरित्रात्मक कादंबरीचा सातवा भाग मातृभारती या लोकप्रिय संस्थेच्या वतीने प्रकाशित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा परिचय, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा, धाडस, साहसी- जीवाला जीव लावणारे सवंगडी, शत्रूला सळोकीपळो करून सोडणारी नीती अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा, परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
शेकडो वर्षे झाली परंतु श्री शिवाजी महाराजांची लोकप्रियता आजही तशीच आहे, उत्तरोत्तर ती वाढते आहे. शिवराय हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. सिनेमा, नाटक, कथा,कादंबरी, चरित्र, पोवाडे, गाणी इत्यादी कुठल्याही प्रकारचे वर्णन समोर येताच शिवभक्त क्षणभर थांबतो, पाहतो, ऐकतो, गुणगुणतो, भक्तीभावाने महाराजांना वंदन करून मगच पुढे जातो.शिवराय ही व्यक्तीरेखा जनसामान्यांच्या ह्रदयात घर करून आहे. आबालवृद्धांना आवडणारे, भावनारे अनेक प्रसंग शिवरायांच्या जीवनात आले होते. मग तो अफजलखानाचा वध असो, शाहिस्तेखानाची फजिती असो, आग्र्याहून चातुर्याने करुन घेतलेली सुटका असो, पावनखिंडीतील बाजीप्रभूचा पराक्रम असो, मुरारबाजीचे साहस असो, प्रतापराव गुजर यांचे जगावेगळे धाडस असो ... अशा शेकडो घटना आजही शिवभक्तांना मंत्रमुग्ध करतात.
जिजाऊ.... शिवरायांच्या मातोश्री. शिवरायांच्या जीवनात धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्य निर्मितीचे बीजांकुरण करताना, शिवरायांना धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या अशा या आऊसाहेब. अनेकांनी शिवरायांच्या जीवनावर लिहिले आहे. मीही मला जमेल तसे लिहितो आहे. जवळपास पंचवीस भाग होण्याची शक्यता आहे.
श्री महेंद्र शर्मा जी, अनुजाजी आणि मातृभारती संस्थेच्या सर्व संबंधित व्यक्तींनी मला संधी दिली त्यामुळेच मी शिवरायांसारख्या राष्ट्र पुरुषावर, युग पुरुषावर लिहू शकलो. वाचकांनीही प्रकाशित झालेल्या सातही भागांचे चांगले स्वागत केले आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे.