* मागणे ते एक तुजप्रती आहे...*
असं मानलं जातं की, जग हे मायावी आहे. प्रकृती एक अनंत सत्ता आहे, एक विशाल शक्तीशाली सत्ता आहे आणि मनुष्य एक सामान्य जीव आहे. मनुष्य आपले प्रयत्न आणि शक्तीच्या जोरावर पुढे जाऊ शकतो, यासाठी त्याला कोणाकडूनतरी प्रेरणा घ्यावी लागेल, मदत घ्यावी लागेल.
मनुष्याला प्रेरणा देण्यासाठी, पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी मनुष्याने हे नेहमी ध्यानात घ्यावे की, तो एकटा नाही, असहाय्य नाही आहे. परमेश्वर त्याच्या सोबत आहे आणि तो मनुष्याला मदत करतच राहणार आहे.
देव, परमेश्वर, परमात्मा ही मनाला विश्वास देणारी शक्तीस्थानं आहेत. ती कुणालाही काहीही न करता, काहीच देत नाहीत. काही हवं असेल, तर त्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवा. कष्टाची तयारी हवी. राबवण्याची ईच्छा हवी. न राबता कसं काय कुणी आपल्याला काही देईल.?
कष्ट करायला शरीर बळकट, हात दणकट आणि मनात सकारात्मक उर्जा असेल, तर घामाचे मोती होतात. पहाडाला देखील माणूस झुकवू शकतो. उंच इमारती बांधू शकतो. नदीचं वाहतं पाणी अडवू शकतो. समुद्रावर जहाजं चालवू शकतो. हवेत पक्षासारखा घिरट्या मारु शकतो.
पण "असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी" असं म्हणणाऱ्यांना तो फुकटात काहीच देत नसतो. म्हणून प्रत्येक माणसाने, आपल्या आतील शक्तीवर विश्वास ठेवायला हवा. कर्तृत्वाला महत्त्व द्यायला हवे. मन प्रसन्न आणि सकारात्मक ठेवायला हवं. कष्टाची लाज वाटायला नको. वाटलाच, तर अभिमान वाटायला हवा. माणसांमध्ये मिसळायला हवं. सज्जनांचा सहवास मिळवायला हवा.
देवाकडे फुकटचं काही मागू नये. आणि असं काही फुकटचे मागणाऱ्याला, देवही देतही नसतो. तो कष्ट करणाऱ्या सोबत असतो. जो कुणी त्याच्याकडे एक पाऊल चालतो, परमेश्वर त्याच्याकडे दहा पावलं चालून येतो.
मात्र, अट एकच ! आपण पहिलं पाऊल टाकायला हवं. त्याच्याकडे विश्वासाने बघायला हवं. त्याच्याकडे मागायचंच असेल, तर संकटात लढण्यासाठी बळ, शक्ती मागा. दुःखातून सावरायला पुरेसा वेळ मागा. संकट, दुःख हे शाश्वत आहेत. ते जीवनात येणारच. कारण, त्यांना पार केल्याशिवाय यश हातात पडत नाही. सुखाकडे जाता येत नाही.
मनुष्याला अशी सत्ता हवी असते ज्याला तो त्याचे आराध्यदैवत मानेल, जे त्याला आश्वासन देईल.
मनुष्याने सतत हे लक्षात ठेवायला हवे की, परमेश्वर त्याच्या सोबत आहे. तो नेहमीच त्याचे रक्षण करत असतो.
देवाकडे काही मागवायचे झाल्यास, एकच मागणं मागायचं. "देवा माझा दंभ सरु दे. माझं मोठेपण गळू दे. मला सामान्य ठेव. माझे पाय जमिनीवरच असू दे. मला माणूस म्हणून जगू दे. सर्वांसोबत जगतांना, माझं मन निर्मळ ठेव देवा. माझ्या चित्ती तू सदैव विराजमान रहा. तुझ्या चित्तात मला जागा दे. माझ्या जगण्या, वागण्या, बोलण्याला तुझी साथ असू दे. तू दिसू दे. तुझी कृपा असू दे. माझी मोह, माया, आसक्ती सुटू दे.
मागणे ते एक तुजप्रती आहे।
देशील तरी पाहे पांडुरंगा॥*
या संतासी निरवी हेचि मज देई।
आणिक दुजे काही न मागे देवा॥
तुका म्हणे आता उदार तू होई।*
मज ठेवी पायी संताचिया॥
"देवा तुला मला काय द्यायच असेल ना? तर एकच मागणे दे देवा ते म्हणजे ह्या तुझ्या भक्तानां, संतांना ,वारकऱ्यांना नीरव.. म्हणजे त्यांची गत जन्मी ची सारी कर्मे जी भोग म्हणून त्यांना भोगायला लागणार आहेत ना? त्यांची निरवानीरव कर, पुसून टाक आणि अगदी तुझ्या सारख कऱ देवा बाकी काहीच मागण नाय देवा आणि मग..."*
"मला त्या संतांच्या पायापाशि ठेव म्हणजे त्यांच्या संगतीत मी आचार विचाराने शुद्ध राहीन आणि माझ्यातही नवीन काही कचरा जमा होणार नाही की ज्या मुळे मी परत बद्ध होइन."*
🙏🙏🙏🙏🙏