गोष्ट त्या तिघांची....
तो छान होता.ती ही छान होती. तो काहीसा गंभीर. ती पुष्कळशी अल्लडच.त्याला खाजगी आयुष्य सर्वांपुढे आलेलं नाही आवडायचं.ती मात्र मोकळीढाकळी. तो काहीसा लबाडच... राखून वागणारा... तिला आत एक बाहेर एक असं जमलंच नाही कधी.हे असे दोन ध्रुव भेटले योगायोगाने.
कधीतरी भेटायचे.गप्पा मारायचे.
तिला वाटायचं त्याने असावं आपल्यासाठी.,. पण तो काहीसा कर्तव्यकठोर... तरीही आजमावत राहिले ते एकमेकांना...
एकदा कधीतरी असं काही घडलं की कळलं त्या दोघांनाही की आपण छान असू शकतो एकमेकांबरोबर.इतरांच्या तुलनेत जरा नीट जमतं आहे आपलं.
कधी तिचा ताण त्याला कळायचा तरी कधी त्याचा तिला...
दिवस सरत होते. आता हळूहळू कळू लागलं मनातलंही एकमेकांच्या. तिने स्वीकारलं पण तो अजूनही चाचपडत होता... की लपवत होता...
मग कुणीसं काहीसं बोलू लागला. ती दुखावली पण तिने त्याला सोडलं नाही...
त्यात मग आला तिसरा. त्याचा जीवलग खरं तर. पण तिला वाटलं की आपलं नातं,मैत्री जुळवायला हा आपल्याला मदत करेल...
याचं नातं फुलत गेलं... पण त्याला बहुधा ती त्याच्या सोयीने हवी होती... तिने मात्र त्याला कायमस्वरूपी स्वीकारलं होतं... मग सुरु झाला संघर्ष... मनांचा,आवर्तांचा,कल्लोळांचा...
तिसरा हे पाहत होता... त्याला दिसत होतं आपल्या मित्राचं मन आणि जाणवत होती तिचीही माया.
पण हे जुळायचं कसं आणि जुळलं तरी टिकायचं कसं???
दोन भिन्न वृत्ती!भिन्न स्वभाव...
मग शेवटी ते घडलंच.... तिला नाही कळलं असं का झालं???
त्याने निग्रहाने आणि काहीशा कठोरपणाने तिला झिडकारलं.ती उन्मळून गेली वादळात... इतकं सुंदर नातं असं पायदळी तुडवलं जावं...
तिसरा तरी काय करणार? तो आला मदतीला... सावरलं तिला...
ती ही हळूहळ बाहेर आली.... पण साहवेना... तिलाही आणि त्यालाही...
आता परत तो पाठशिवणीचा जीवघेणा खेळ. एकाने लपायचा आणि दुसर्याने भोज्जा द्यायचा. त्या तिसर्याने आकडे मोजत बसायचं.. कोण डाव जिंकणार हे त्यालाही माहिती नसायचं...
मग त्यातून सुरु झाला नवा खेळ... आंधळी कोशिंबिरीचा... झाकल्या डोळ्यांनी एकमेकांना पकडण्याचा... पण तरी खेळ दोघांचाच चालला होता म्हणून... नाहीतर चौथंच कुणीतरी आडवं आलं असतं आणि हाती सापडलं असतं....
ताजही धावत आहेत ते असेच... डोळ्याला पट्टी बांधून चाचपडत शोधत, वेध घेत,कानोसा घेत...
तिसरा म्हणतो आहे... असे किती काळ खेळतील माहिती नाही.,, त्यापेक्षा हिने सोडावा हा खेळ...
पण ती आजही बसली आहेडोळ्याला पट्टी बांधून.... अस म्हणतात... बंद असलेले डोळे कालातराने उघडले की विखारी होतात.. मग खेळ सुरु होईल बहुधा.. विष आणि अमृत असा तिघांचा.,,..
आर्या.