ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ.ही जीवनाची अपरिहार्य बाजू. त्यामुळे दुःख होतच पण ज्याचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीला आदराने निरौप देण्याची परंपरा हिंदू धर्म संस्कृतीत वैदिक काळापासून आहे.
मृत्यूनंतर दिवंगताच्या शवाची सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य व्यवस्था लावणे यातून दाहकर्म संस्काराचा उदय झाला.
वैदिक काळात दहन म्हणजे जाळणे आणि दफन म्हणजे पुरणे या दोन्ही पद्धती प्रचलित असल्याचे संदर्भ वैदिक साहित्यात सापडतात.
मूळ गावापासून लांब नदीकाठी चिता रचून दहन केले जाई. घरात नेहमी प्रज्वलित ठेवलेल्या दक्षिण नावाच्या अग्नीतून शिंकाळ्यात अग्नी बरोबर नेला जाई. ही प्रथा आजही काही समाजगटात जिवंत आहे.
सोबत अनुस्तरणी नावाची शेळी किंवा बकरी नेली जाई. तिला मारून तिची चरबी शवावर जागोजागी ठेवली जाई जेणेकरून त्या चरबीचे तेल जळण्यासाठी उपयोगी पडेल. आता त्याचे प्रतीक म्हणून सातूचे पिंड शवाच्या वेगवेगळ्या अवयवांवर ठेवले जातात.
ऋग्वेदाच्या यमसूक्तातील प्रार्थना म्हणून अग्नी दिला जाई. या शवाचे नीट दहन व्हावे,त्याला आगीचा त्रास होऊ नये अशी भावपूर्ण प्रार्थनाही त्यामधे
पुराण साहित्यातील गरूड पुराण हा ग्रंथ दाहकर्म आणि श्राद्ध या संस्कारांवर विशेष विवेचन करतो.
विष्णूने आपले वाहन गरूडाला सांगितले आहे त्याप्रमाणे या ग्रंथात विधी आलेला दिसतो.
लाकडाची चिता रचून त्यावर शव ठेवले जाते.
एका मडक्यात पाणी भरून त्या मडक्याला भोक पाडले जाते. चितेभोवती तीन उलट प्रदक्षिणा घालून ते मडके एका दगडावर फोडले जाते. घटाकाशातून महाकाशात विलीन होणे असा याचा भावार्थ. ज्या दगडावर मडके फोडले जाते त्यालाच "अश्मा" म्हणतात. दहाव्या दिवशी या अश्म्यावरच तिलांजली दिली जाते.
या प्रचलित पद्धतीमध्ये पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेने कालसंगत काही बदल केले आहेत. धर्म निर्णय मंडळाच्या शास्रार्थाचा याला आधार आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीत यमसूक्तातील प्रार्थना आहे.त्याजोडीने गीतेच्या अध्यायांमधील आत्म्याचे अमरत्व सांगणारे श्लोक आणि गीताईतील समश्लोकी विवेचन आहे. हा विधी जर कुणाला करायचा नसेल आणि नूसताच अग्नी द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पठणासाठी दासबोधातील मृत्यूलक्षण आणि तुकाराम महाराजांचा अभंग, रघुपती राघव राजाराम ही धून असा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.
पूर्वी नदीकाठी एकांतात स्मशान ही जागा असे जी गावापासून दूर असे. तिथे शिवमंदिर असणे अशी पद्धती आजही दिसते. लयाची देवता आणि विविध योनींवर सामर्थ्य असणारे भगवान शंकर यांच्या सहवासाने स्मशानाचे पावित्र्य वाढते अशी धारणा आहे.
काही समाजगटात पुरोहितांच्या मार्गदर्शनाशिवाय केवळ चितेवर दहन केले जाते आणि कावळ्याला पिंड ठेवले जातात. शिंकाळ्यातून अग्नी नेला जातो. स्मशानात न्यायच्या आधी शवाला अंघोळ घालून नवे कपडे घालतात. नव्या जगात प्रवेश करण्याच्या भूमिकेतून शवाप्रती हा आदर व्यक्त केला जातो. दहनानंतर तीन दिवसांनी दहनाच्या जागी नैवेद्य दाखविला जातो.
लिंगायत समाजात शवाला मांडी घालून अघोळ घालून सजवून गाडीत बसवून नेले जाते. पवित्र भस्म अंगाला लावले जाते. स्मशानात चौकोनी खड्डा करून त्यात शव बसलेल्या अवस्थेत ठेऊन खड्डा मीठाने भरला जातो. त्यानंतर तीन दिवस तिथे नैवेद्य दाखविला जातो.
मरणात खरोखर जग जगते याची प्रचिती देणारी स्मशानाची वास्तू ही आयुष्याची अपरिहार्यता आहे.पण तिच्याकडे आणि तिथे काम करणार्या सदस्यांकडे आणि पुरोहितांकडे आदराने पाहणे ही आवश्यक बाब आहे.