आज येथे प्रस्तुत करत आहे एक कथा. जी चार कवितांच्या रूपात लिहिली आहे. हा संवाद आहे दोन प्रेमी जीवांचा...तशी ही एक विरहकथा...पण दोघांच्याही नजरेतून पाहिलेली...या संवादात रुसवे आहेच पण जसा घटनांचा क्रम समोर येतो तसा तो दुरावाही कमी होतो.
_______________________________
ही आहे पहिली कविता : विरह संपला
कवितेच्या नायकाला अनपेक्षितपणे ती दिसते व त्याच्या मनात कल्लोळ माजतो. काय असेल त्याच्या मनात?
_________________
विरह संपला
_________________
अतूट त्या साखळ्या निखळल्या अंतरी
खूण ही पटली मनाला ती तूच आहे खरी
पळालो, थांबलो तुला मी का दिसेना
भांबावलो,थकलो परी मन काही भरेना।
मी गुंतलो, गुरफटलो कशाचे हे धागे
तुटता तुटेना, सुटता सुटेना कोडे हे माझे
भावनांचे बंध हे बांधती माझ्या मना
अश्रूंचे तलम तंतू अडविती वेदना।
विरह हा संपला तरी वसंत का फुलेना
हास्य उमटले जरी का न उमटती भावना
दूर मी होतो तरी किंतु हा नसावा
का तुझ्या डोळयांत मला अनोळखीपणा दिसावा?
(क्रमशः)
©2026, मंदार कुळकर्णी
First published on Instagram @maziya_angani