#पुढे
समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परिपोशीने जगणाऱ्या वनस्पतींचे काही खरे नसते कारण त्याचे संपूर्ण जीवन दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते आणि स्वयंपोशी वनस्पती स्वतःवर आत्मनिर्भर असतात म्हणून ऊन, वारा, वादळ, थंडी आणि पावसात दीर्घकाळ टिकून राहतात. माणसांचे ही तसेच नाही का ? दुसऱ्यावर जगणारा माणूस किती दिवस जगू शकेल ? शंकाच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. किती दिवस बाप-दादांच्या पैश्यावर ऐश करायचे. जोपर्यंत मनुष्य एक रूपाया कमावण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तो आळशी समजला जातो. माणसांच्या प्रगतीत आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. जो आळस झटकून काम करतो त्याच्या पदरात लक्ष्मी खेळत असते. मात्र दे रे हरी पलंगावरी या वृत्तीने जगणाऱ्या माणसाला जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते एवढे मात्र खरे आहे. आजकाल शिक्षण घेता घेता मुलाचे वय 25 ते 30 संपून जात आहेत. नोकरी लागली तर ठीक आणि नाही लागली तर बेरोजगार म्हणून तो घरावरच एकप्रकारे अवजड वाटत आहे. शिक्षण जास्त घेतल्यामुळे शेतात काम करणे लज्जास्पद वाटते तसेच त्यांच्या पात्रतेनुसार कोणते काम नसल्याने ते कोणत्याच कामात रस दाखवत नाही. शालेय जीवनात आत्मनिर्भर कसे राहता येईल ? हे शिकवले जात नाही त्यामूळे शिक्षण घेऊन सुद्धा तो काहीच करू शकत नाही. त्यामुळे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली म्हणजे तो भारताचा नागरिक बनतो आणि त्याच दिवसापासून देशासाठी एक तरी रूपाया कमावण्याचा विचार चालू करणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ह्या धोरणाने प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होऊ शकतो. परंतु आई-वडिलांकडे भरपूर पैसा उपलब्ध असते आणि ते आपल्या लाडक्या लेकरांसाठी किती ही पैसा खर्च करायला तयार असतात. हीच प्रवृत्ती मुलांना परावलंबी करून टाकते आणि भविष्यात तो काहीच करू शकत नाही. पूर्वीच्या कुटुंबात आणि आजच्या कुटुंबात हा एकच फरक आहे. म्हणून पूर्वीच्या एवढं आजची मुले आत्मनिर्भर नाहीत. देशात कित्येक युवक आज रिकामटेकडे फिरत असतांना दिसून येतात. त्यांनी छोटा उद्योग जरी निर्माण केलं तरी त्यात ते कमाई करू शकतात मात्र यांना दुसऱ्याच्या पदरातील गलेलठ्ठ पगाराची प्रतीक्षा असते. दहा हजार रुपये पुणे मुंबईत कमावलेले आपल्या गावाकडे कमावलेले दहा रूपायाप्रमाणे आहे. आज आपल्या देशावर आणि आपल्यावर कोरोनाचे संकट आले आहे. मोठ्या शहरातील अनेकजण आपल्या गावी परतले आहेत. बाहेर राज्यातील अनेक मजूर आपल्या स्वतःच्या राज्यात स्थलातर झाले आहेत. आज आपली खरी परीक्षा आहे. ही योग्य वेळ आहे स्वतःमध्ये असलेली क्षमता सिद्ध करून दाखवण्याची. म्हणून कसलाही विचार मनात न आणता छोटे छोटे काम करून मोठी मोठी स्वप्ने पूर्ण करता येऊ शकतात. आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनानुसार स्वदेशी वस्तूचा वापर करू या आणि आपण स्वतः आत्मनिर्भर होऊ या. फार पूर्वीच्या काळी जी बारा बलुतेदार ची पद्धत होती त्याचा थोडा अभ्यास करून गावातला माल गावात कसे खेळता राहील यावर संशोधन करू या.
- नागोराव सा. येवतीकर