#काव्योत्सव -२
#वात्सल्य ,प्रेम
तुझ्या येण्याची चाहूल अवचितच होती!
घनघोर मल्हाराची जणू बरसात होती!!
तुझ्या अस्तित्वाची नोंद मी घेतलीच नव्हती!
धुक्यातल्या हिरवाईने खरंतर
आधीच कुणकुण दिली होती!!
घडलं नव्हतं असं कधी झाले वेडीपिशी!
माझा जीवलग होता तेव्हा कुण्या गावच्या वेशी!,
तुझ्या नि माझा 'दोन' जीवांचा सुरु झाला "एक" प्रवास!
सोबत होती सुरेख वळणे काळ होता 'नव'मास!!
कुणी म्हणे बहरेल "मोगरा" कुणी म्हणाले उमलेल "जाई"!
मला मात्र म्हणणार होते ते चिमुकले फूल "आई"!!
कुणी सिंचले त्या बीजाला हळुवार नितळ पाणी!
कुणी लावली माया आणिक कुणी गायली गाणी!!
माझ्या "गर्भ"गृही पूजिली एक साजिरी मूर्ती!
निसर्गाच्या हिरवाईने झळाळूनी उठली ती!!
नवमासाचा प्रवास झाला साजिरा गोजिरा!
आता उत्कंठा शिगेला "जाई" की "मोगरा"!!
तुझे नि माझे नाते घडले जोडूनी गेली "नाळ"!
आता वेगळे होशील तरीही तू तर माझेच बाळ!!
संघर्षाची रात्र संपली तेजाळली सकाळ!
गभस्तीच्या चाहुलीने माझे मन वेल्हाळ!!
आक्रंदच तो माझा होता आनंदाची झूल!
भर माध्याह्नी अमुच्या वेली फुलले साजिरे फूल!!
"जाई"चा गंध दरवळला पसरला
हुंकारला सोsहम् चा नाद!
नाळेपासूनी विलग होऊनी जीवा जीवाची "साद"!!
त्याच क्षणाने दोन जीवांना जन्म दिला कोवळा!
मातृत्वाच्या आनंदाने विसरुन गेले कळा..!!
तुझा नि माझा प्रवास आता प्रगल्भ होतो आहे!
रूजलेल्या रोपाला आता पालवी फुटते आहे!!