-------------------------
उद्या महाविद्यालयात कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विचाराने स्त्री आणि वास्तविक यावर कविता लिहावी असा विचार अलगद मनात डोकावला म्हणुन वही न् पेन घेऊन बसले. स्त्री? ती मी आहेच मग वास्तविक? ते मी रोजच अनुभवते. नेहमी नकारात्मक काय लिहायचं आज सकारात्मक विचार लिहून पाहू असा विचार सुरू असतानाच समोर पडलेल्या वृत्तपत्रावर नजर गेली. संक्रांतीच्या प्रतिज्ञा, सुवासिनी वाण, जिजाऊ यांना अभिवादन, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, कॅन्टीन चालकाची मुलगी नेमबाजी मध्ये सुवर्ण विजेती अशा अनेक समाजात स्त्रियांचे अस्तित्व स्पष्ट करणार्या बातम्या वाचून मनात पुन्हा एकदा प्रश्नाने ठोठावलं, कोण म्हणतय स्त्री अबला आहे? सावित्रीबाई फुले, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई , अहिल्याबाई होळकर पासून कल्पना चावला, इंदिरा गांधी, सानिया नेहवाल यांसारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या स्तरावर आपले अस्तित्व चोखपणे सिद्ध करतात मग स्त्रिया अबला कशा?
स्त्री सबला होती, स्त्री सबला आहे, स्त्री सबला राहणार
हो माझ्या आत्म्याचा आवाज सांगतो आहे.
वास्तविक पाहता सबलीकरण हे कोणाचे व्हावे तर ते खचलेल्या माणसाचे, बंधनात अडकून ठेवणार्या मनस्थितीचे, पंख छाटणार्या अडाणीपणाचे, खुंटलेल्या विचाराचे आणि अपयशाला घाबरून थांबणार्या, संपणाऱ्या वृत्तीचे.
-----------------------
✍सोनल सुनंदा श्रीधर
------------------------