Reunion - Part 18 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 18

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 18

व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होते काकांच्या खात्यावर  थोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे  पण होते ..काकांच्या ठेवीचे आणि इतर सगळे पैसे त्यांच्या मृत्युनंतर ऊमाने क्लेम करून मिळवले आणि काकुच्या हातात दिले होते .मला आता हे काय करायचे आहेत असे म्हणून काकूने ते परत ऊमाच्या ताब्यात दिले होते .या सर्व घडामोडीत मोहन भावासारखा तिच्या पाठीशी होता .सतीशचा पत्ता अजूनही लागला नव्हताच .हळूहळू पोलिसांनी ती केस बंद करून टाकली आणि ऊमाला सतीशच्या परतीची एक आशा होती तीही जवळ जवळ सुटून गेली.एक दीड वर्ष कसेतरी पार पडले आणि अचानक काकुला कर्करोगाचे निदान झाले .बिचारीच्या नशिबाचे भोग अजून संपले नव्हते .तिच्या बऱ्याच तपासण्या झाल्या .नंतर केमोथेरपीचे  सेशन पण सुरु झाले . काकुला ते सर्व अजिबात सहन होत नव्हते .या वृद्ध अवस्थेत तिला होणाऱ्या त्या यातना ऊमालाही बघवत नव्हत्या .एक वर्षभराच्या केमोथेरपी उपचारानंतर ती तर आता पूर्ण थकली होती . तिची जगण्याची इच्छा पण आता जवळ जवळ संपली होती .तिच्या डोळ्यात जणु ज्योतीच राहिली नव्हती.अखेर त्यानंतर पाच सहा महिन्यातच तिचा मृत्यू झाला .ऊमा अखेर पूर्णपणे पोरकी झाली होती .पण रडण्यासाठी सुद्धा अक्षरशः तिच्या डोळ्यात अश्रूच शिल्लक नव्हते .मोहन सुद्धा ऊमाच्या आयुष्यात घडणारे हे सगळे पहाताना चक्रावून गेला होता .या सगळ्या चारपाच वर्षाच्या ऊमाच्या आयुष्यातील चित्रविचित्र घटनांचा तोच तर साक्षीदार होता .काय काय भोगले होते ऊमाने या काळात !!!ऊमाच्या पुढे तर संकटांची मालिकाच लागली होती.नयना आता चार सव्वाचार वर्षाची झाली होती .तिने तिच्या आजी आबांच्या सोबत तिचे बालपण घालवले होते त्यामुळे ती पण सारखी सारखी आजी आबांचे नाव काढत असे .एक मात्र विशेष होते कसे कोण जाणे पण तिने आपल्या बाबाचे नाव घ्यायचे पूर्णच बंद केले होते .सायकल तर ती हल्ली अजिबात खेळत नसे .ऊमाही सतीशचा विषय काढत नसे .मोहनला मात्र ती मामा म्हणत असे ..खुप लाडकी होती त्याची ती! तो ऊमाच्या घरी आला की आधी नयना त्याला जाऊन चिकटत असे . मोहनची हळूहळू ऊमाला अगदी जवळून ओळख होऊ लागली होती .तरुण वयातच प्रेमभंग झाल्याने मोहनने लग्न केले नव्हते .पुढे करायचा त्याचा विचारही नव्हता .त्याला फक्त आई होती . भाऊ बहिण कोणीच नव्हते .वडील पण लहानपणीच निवर्तले होते .एकुलता एक असल्याने तो आपल्या आईसोबत राहत असे .एकदोन वेळा त्याने बहिणींच्या नात्याने ऊमाला घरी नेऊन आईची भेट घडवून दिली होती .नयना पण त्याच्या आईला आजी आजी म्हणून चिकटली होती .आईला त्याने ऊमाविषयी सर्व सांगितले होते .तिलाही ऊमाच्या दुर्दैवी आयुष्याचे वाईट वाटले होते.काकुंचे दिवसकार्य पार पडले आता पुढे कसे कसे काय करावे लागेल याचा ऊमा विचार करीत होती .कारण काकुच्या या दुर्धर आजारपणात अफाट पैसा खर्च झाला होता .जवळची सगळीच्या सगळी पुंजी संपली होती .आत्ता तर साधी नोकरी पण नव्हती तिला  ..भविष्याचा विचार तर दूरचा होता .नयना पण हळूहळू मोठी होत होती .कसे काय सगळ निभवायचे ..?विचारांची आवर्तने एकापाठोपाठ तिच्या मनात चालू होती..पण तिला काय ठाऊक होते की अजुन एक संकट तिच्यापुढे आ वासून उभे होते .वाड्याचे मालक,काकांचे मित्र कधीच निवर्तले होते .आता वाड्याचा कारभार त्यांच्या मुलाकडे गेलेला होता .तो ऊमाला भेटायला आला आणि त्याने ऊमाला घर सोडायची विनंती केली.त्याच्या म्हणण्याप्रमाणे वडिलांचे मित्र आणि एक वृद्ध दाम्पत्य म्हणून त्याने काकांना नाममात्र भाड्यात त्या वाड्यात भाडेकरू ठेवले होते .पण आता काका काकु दोघेही हयात नव्हते आणि ऊमाचा या जागेवर काहीच हक्क नव्हता त्यामुळे तिला आता इथे रहाता येणार नव्हते .शिवाय त्याला आता वाड्याची दुरुस्ती करून नुतनीकरण करायचे होते.अशा परिस्थितीत तो सर्वच भाडेकरूंना नोटीस देणार होता.ऊमाला त्याने आठ दिवसात घर खाली करायला सांगितले . हे ऐकुन तर ऊमाच्या पायाखालची जमीनच सरकली.दुसऱ्याच दिवशी तिने फोन करून मोहनला बोलावून घेतले.मोहन घरी आला की नयना मात्र खुष होत असे .घरात काय घडतेय ते तिला दिसत होते .पण तिच्या बालमनाला त्याचे काही आकलन होत नसे . घडणाऱ्या गोष्टींची तिला काही झळ लागू नये याची वेळोवेळी ऊमा खबरदारी घेत असे .आजी आबा विषयो तिने विचारले की ..ते बाप्पाकडे गेले आहेत आणि आकाशात स्टार झाले आहेत असे मात्र ऊमा तिला सांगत असे .मोहनमामा आला की तिचे विश्व बदलुन जात असे . नेहेमीप्रमाणे मोहनने तिच्यासाठी आणलेला खाऊ तिला दिला .आणि तिच्याशी खेळत खेळत ऊमाला काय झाले ते विचारले ऊमाचे सगळे त्याने ऐकुन घेतले व नेहेमीप्रमाणे तिला धीर दिला .आणि या गोष्टीवर काय मार्ग काढता येईल ते उद्या विचार करून सांगेन असे बोलून तो निघून गेला.दोन दिवस त्याचा फोनही नव्हता आणि तोही आला नाही  .ऊमा बेचैन होती ,घर सोडायची मुदत आता जवळ आली होती .सारखा सारखा मोहनला फोन करणे पण तिला अप्रशस्त वाटत होते . तिसऱ्या दिवशी मात्र तो सकाळी सकाळीच आला .आणि त्याने ऊमाला तिचे सर्व सामान बांधून ठेवायला सांगितले .पुण्याजवळच्या एका लहान उपनगरात त्याने तिच्यासाठी घर आणि काम दोन्ही पाहिले होते .त्याच्या एका मित्राचे तिथे मेडिकल दुकान होते .तिथे ऊमाला क्लर्क म्हणून नोकरी मिळत होती .शिवाय त्याच्याच वाड्यात दोन रिकाम्या खोल्याही त्या ऊमाला भाड्याने द्यायला मोहनचा मित्र तयार होता .मोहनचा मित्र अतिशय भला होता ..अनेक वर्षांची त्यांची मैत्री होती .मोहनचा त्याच्यावर खूप विश्वास होता .त्यानेही मित्रप्रेमाखातर हे सारे करायची तयारी दाखवली होती .हे ऐकुन ऊमाचा जीव भांड्यात पडला..मनोमन तिने देवाला नमस्कार केला .“मोहन तुमचे हे उपकार कधी फिटतील माझ्याकडून ..असे म्हणून तिने डोळ्यात पाणी काढले ..“वहिनी भाऊ म्हणता न मला ..मग इतके तर मला करायलाच हवे”नवीन गावी लहान मुलीला घेऊन जायचे ,नवीन नोकरी ,नवी माणसे ऊमाला थोडे बिचकायला झाले होते .पण मोहन म्हणाला ,”काळजी करू नका वहिनी तुम्हाला एकटीला एकदम नवीन वातावरणात मी नाही पाठवणार  .मी सुद्धा आता दोन दिवस रजा घेतली आहे .तुम्हा दोघींची तिकडे नीट व्यवस्था लावून मगच मी परत येईन “मोहनच्या या शब्दांनी ऊमाला हायसे झाले .आवरायचे फारसे काही नव्हतेच त्या छोट्या घरात.तिचे तिच्या घरून तिचे सामान आणले होते ते तसेच तसेच पडले होते .काकुचा संसार छोटासा होता तो ऊमाने आवरायला सुरवात केली .काकूचा संसार गोळा करताना ऊमाला अगदी भरून आले .तिला आठवले यातील प्रत्येक भांड्यात आणि वस्तुत काकूचा जीव गुंतलेला असायचा.जुन्या काळातील बाई होती ती ...आपला नवरा आणि आपला संसार हेच तिचे सर्वस्व होते .क्रमशः