तीन झुंजार सुना.
पात्र रचना
मुखपृष्ठा वरील चित्र कादंबरीच्या संकल्पने नुसार.
चित्रकार सौ. शिल्पा पाचपोर
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा सुळे निशांतची प्रेयसी
विदिशा वर्षांची मैत्रीण.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
भाग 2
भाग 1 पासून पुढे ......
बराच वेळ रडल्यानंतर वर्षांनीच दार उघडलं.
‘हा असं कसं वागू शकतो ? मी आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही.’ – वर्षा स्वत:शीच बडबडत बाहेर आली.
आई तिच्याकडे बघत होती पण बोलली काहीच नाही.
“अग मी तुझ्याशी बोलते आहे. का तुलाही माझा कंटाळा आला आहे ?” वर्षा आता आईवर चिडली.
“तू काही सांगशील तर मला कळेल न. आधी शांत हो. घे पाणी घे. तुला काही खायला देऊ का ? पाहुण्यांसाठी पोहे केले आहेत देऊ का तुला ? जरा शांत पणे बसून सांग काय झालं एवढं चिडायला ?” विजयाबाई शांतपणे म्हणाल्या.
“अग हा निशांत,” वर्षा तक्रारीच्या सुरात बोलली “खूपच विचित्र वागला आज. त्याला इथल्या सगळ्या घडामोडीची कल्पना दिली आणि म्हंटलं की उद्या इथे ये. आपल्याला नक्की काही तरी ठरवायला हवं.”
“मग काय म्हणाला तो. येतोय का उद्या ?” – विजयाबाई
“छे, उद्या जमणार नाही असं म्हणाला. शेतावर तहसीलदार व्हिजिट देणार आहे, त्यामुळे नाही येता येणार असं म्हणाला.” – वर्षानी सांगितलं. सुर तोच तक्रारीचा.
“अग मग बरोबर आहे. सरकारी कामकाज त्यांच्या सोई नुसारच चालतं. ते उद्या येणार म्हंटल्यावर निशांतला थांबणं गरजेचं आहे. यात एवढं चिडायला काय झालं ?”- विजयाबाई
“अग आई, तिथे त्याचे बाबा असणार होते, मोठा भाऊ आहे, तो असणार होता. हा नसता थांबला तर काय बिघडणार होतं ?” – वर्षा
“अग असं नसतं. सरकारी काम म्हंटलं की सगळेच लागतात. कोण केंव्हा काय माहिती विचारेल ते सांगता येत नाही. आता निशांत ज्या कामात लक्ष घालतो आहे त्याबद्दल त्यालाच पूर्ण माहिती असणार, आणि म्हणूनच तो नाही येऊ शकला. बरोबरच आहे त्याचं.” विजयाबाईंनी वर्षांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
आईचं बोलणं ऐकल्यावर वर्षा अजूनच चिडली म्हणाली “आई तू त्याची बाजू घेऊन का माझ्याशी वाद घालते आहेस, मुलगी मी आहे तुझी, तो नाही, मग ? जाऊ दे आता मी त्याच्याशी बोलणारच नाही.”
“अग असा त्रागा करून काय साध्य होणार आहे ? जरा शांतपणे विचार कर मग तुला पण माझं बोलणं पटेल.” – विजयाबाई.
“आई काल तर तू म्हणाली होतीस की निशांत चा नाद सोड आणि त्या काकूनी सुचवलेल्या मुलाचा विचार कर म्हणून. आणि आज काय झालं ? निशांतची बाजू घेऊन माझी समजूत काढायला निघाली आहेस.” आता वर्षाला, आईच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.
“नाही बाळा असं काहीही नाहीये.” – विजयाबाई.
“नाही कसं ? तूच म्हणाली होतीस न की निशांतचा नाद सोड म्हणून ?” – वर्षा
“हो म्हणाले होते. पण आता मी काय म्हणते ते ही नीट ऐकून घे. निशांत हा चांगला मुलगा आहे. तू जे काही सांगितलं त्यावरून त्याचं घर, घराणं पण चांगलं आहे. आम्हालाही तो पसंत होताच. तो आपल्या घरी पण बऱ्याच वेळा येऊन गेला आहे. परंतु तुमचं सध्या जे काही चालू आहे, म्हणजे चाल ढकल, ते आम्हाला पसंत नाहीये. जर निशांतची इच्छा नसेल तर या काकूंनी सुचवलेल्या मुलाचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. इतक्या चांगल्या मुलाला गमावण्याची आमची तरी इच्छा नाहीये. तेंव्हा तुम्ही दोघं लवकर काय तो निर्णय घ्या. ते सर्वांसाठीच चांगलं होईल.” विजयाबाईंनी जवळ जवळ निर्णयच दिला.
वर्षा आता विचारात पडली. थोड्या वेळाने म्हणाली
“तूच सांग मी काय करू. यासाठीच त्याला आज बोलावलं होतं पण तो आलाच नाही. आता ?” – वर्षा
“उद्या पुन्हा फोन कर. त्याला सगळी परिस्थिती समजावून सांग, मग बघू तो यावर काय म्हणतो ते. पण आता जास्त थांबण्याची आमची तयारी नाही. आणि तुमचं नोकरीचं खूळ मनातून काढून टाका. साधा B.Com आहे तो. त्याला पगार कितीसा मिळणार ? आणि तुम्ही नोकरीच्या गावी जाऊन राहणार म्हणता, म्हणजे संसार ओढगस्तीचाच होणार. त्या पेक्षा त्यांच्या भरल्या घरात राहण्यातच शहाणपणा आहे. याचाही विचार करा. हां, आता तुला मोर्षी ला जाऊन राहावं लागेल पण मला विश्वास आहे की तू लवकरच त्यांच्यात मिसळून जाशील.” विजयाबाईंनी आता जरा विस्तारपूर्वक चार गोष्टी वर्षाला सुनावल्या.
“ठीक आहे, उद्या संध्याकाळीच करते त्याला फोन.” – वर्षा
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, मोर्षीला जेवणाच्या वेळी प्रताप म्हणाला
“निशांत आज दिवसभर मी पाहतो आहे की तहसीलदार साहेब आले होते आणि तुझं लक्ष भलतीकडेच होतं. काय झालं आहे सांगशील का ?”
निशांतला कळत नव्हतं की काय सांगावं ते. त्यानी आज पर्यन्त ही गोष्ट उघड केली नव्हती. तरी पण आता वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. वर्षा कायमचीच दुरावण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यानी मग सर्व अवसान गोळा करून बोलायला सुरवात केली.
“बाबा, असं आहे की कॉलेज मधली माझी एक मैत्रीण आहे वर्षा सुळे नाव आहे तिचं. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आज पर्यन्त मी कोणालाही सांगितलं नव्हतं कारण मला भीती वाटत होती की तुम्हा कोणालाच हे आवडणार नाही म्हणून.”
“हे प्रकरण किती दिवस चालू आहे” बाबांनी विचारलं.
“तीन वर्ष.” – निशांत
“आधी तू बोलला नाहीस, मग आज अचानक असं काय झालं, की तुला बोलायला भाग पडलं ?” बाबांचा प्रश्न
“तिला एक स्थळ सांगून आलं आहे.” निशांत म्हणाला “आणि तिच्या आई, बाबाना तो मुलगा पसंत आहे.”
“तुला कशाची भीती वाटत होती ? आणि तू सोल्यूशन काढायच्या ऐवजी इतकी वर्ष काय करत होतास ?” – बाबा
“मी नोकरी शोधायच्या मागे होतो. मग नोकरीच्या गावी जाऊन संसार थाटायचा विचार होता. पण चांगली नोकरीच मिळाली नाही आणि वेळ मात्र भराभर निघून गेला. आणि आता सगळंच अंगावर आलं आहे. प्लीज मला समजून घ्या.” निशांत काकुळतीने म्हणाला.
“कुठे राहते ती ?” – बाबा
“अमरावती.” – निशांत
“वडील काय करतात ? आई काय करते ?, नीट सगळं सांग.” बाबांनी विचारलं.
“वडील बँकेत मॅनेजर आहेत. सध्या ते अकोल्याला असतात. आई घर सांभाळते. त्यांचं स्वत:चं अमरावती ला घर आहे. ते दोघंही पदवी धारक आहेत आणि वर्षा पण B.Com आहे. माझ्याच वर्गात होती.” निशांतनी माहिती पुरवली.
“त्यांना तुमचं लग्न मंजूर आहे ?” – बाबा
“हो.” – निशांत.
“ठीक आहे आता जेवा सगळे. आपण जेवण झाल्यावर या विषयावर सविस्तर बोलू.” बाबांनी स्वल्पविराम घेतला. जेवण झाल्यावर सगळे समोरच्या हॉल मध्ये जमले. बाबांनीच बोलायला सुरवात केली.
“मग, श्रीयुत निशांत पाटील आता काय करायचा विचार आहे, काहीतरी तरी ठरलच असेल न तुमचं. जरा आम्हाला पण कळू द्या.”
आता पर्यन्त निशांत बराच सावरला होता. बाबांचा स्वर रागाचा कमी आणि थट्टेचाच जास्त होता. त्याला धीर आला.
“काही नाही, तुम्ही म्हणाल तसं. पण बाबा तिच्या शिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही.” – निशांत धीर करून म्हंटलं.
“हूं, पण मग नोकरीचं काय ?” – बाबा
“अजून तरी मिळाली नाहीये.” – निशांत
“काहीही प्रयत्न न करता नोकरी कशी मिळेल ? तू seriously नोकरी शोधलीस का ? काय काय प्रयत्न केलेस ते तरी सांग. आम्हाला तर कधी दिसलंच नाही की तू नोकरीसाठी धावपळ करतो आहेस ते.” बाबांनी आता गंभीरपणे विचारलं.
निशांत घुटमळला, खरं तर त्याने विशेष काही केलच नव्हतं. उगाच दोन चार मित्रांना सांगून ठेवलं होतं. पण अशी थोडीच नोकरी मिळते ? तो गप्पच राहिला.
“अरे, तू काय प्रयत्न केलेस ते सांग. बँकेच्या परीक्षा दिल्यास का ? MPSC च्या परीक्षा दिल्यास का ? कुठे खाजगी कंपनी मध्ये जाऊन चौकशी केलीस का ? आपले इतके लोक ओळखीचे आहेत त्यांच्यापैकी एकाला तरी विचारून चौकशी केलीस का ? अरे बोल न.” बाबांनी आता खोदकाम करायला सुरवात केली.
“नाही म्हणजे माझ्या काही मित्रांना सांगून ठेवलं होतं पण कुठे काही जमलं नाही.” निशांतनी गुळमुळीत उत्तर दिलं.
“तुझे मित्र कोण आणि ते काय करतात ?” आता बाबांचा स्वर चढा होता.
निशांतच्या लक्षात यायला लागलं होतं की तो लढाई हरतो आहे. काय करावं ते त्याला सुचेना. तो गप्पच राहिला.
“तुला नोकरी धंदा काही नाही, मग तू तुझ्या बायकोला कसं पोसणार आहेस ते जरा स्पष्ट करशील का ? आमचा लग्नाला विरोध नाही पण त्या दुसऱ्या घरातून येणाऱ्या मुलीने काम धंदा नसलेल्या माणसाशी का लग्न करावं, आणि आपल्या पायावर का धोंडा पाडून घ्यावा ? याचं उत्तर देशील ?” बाबांनी आता सरळच विचारलं.
आतापर्यन्त हलक फुलक असलेलं वातावरण एकदम गंभीर झालं. बाबाच बोलत असल्याने इतर कोणी बोलण्याचा प्रश्नच नव्हता.
निशांत जवळ उत्तर नव्हतं, पण तरी, आपल्या मुलांशी अशा भाषेत कोणी बोलतं का या विचारांनी त्याला बाबांचा खूप राग आला होता.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com