तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
पात्र रचना
श्रीपती पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची प्रेयसी.
विदिशा वर्षांची मैत्रीण .
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधरा विदिशाची आई
भाग ६
भाग ५ वरून पुढे वाचा .................
वर्षांच्या आईला पण विदिशा च्या आईने मांडलेला मुद्दा पटला. वर्षा तिथेच होती. इतका बिनतोड यूक्तीवाद ऐकल्यावर ती पण गोंधळून गेली.” काय करावं हे समजत नाही,” असं म्हणाली. विदिशा ला काय बोलावं हेच समजत नव्हतं. दोघींनाही हे जुळावस वाटत होत पण आई लोक म्हणताहेत ते पण बरोबर वाटत होत. सगळंच कठीण होऊन बसलं होतं. शेवटी वर्षांचे आणि विदिशाचे बाबा दोघांनाही येत्या रविवारी बोलावून घ्यायचं ठरलं. मग सगळी साधक बाधक चर्चा करूनच निर्णय घेऊ असं ठरवून विदिशा आणि तिची आई घरी गेल्या.
शनिवारीच संध्याकाळी उशिरा वर्षा आणि विदिशाचे बाबा दोघेही घरी आले. दोघांनाही कळत नव्हतं की इतक्या तातडीने कशाला बोलावलं ते. तसा या रविवारी येण्याचा दोघांचाही विचार नव्हता.
जेवणं झाल्यावर वर्षा विदिशा कडे आली आणि सांगितलं, की जेवणं झाल्यावर सगळे आमच्या कडे कॉफी प्यायला या म्हणून. विदिशा च्या बाबांनी विचारलं पण की काय ग काय खास आहे, तर नुसतंच हसून निघून गेली. विदिशा च्या बाबांनी तिच्या आईला विचारलं की
“काय प्रकार आहे ? कशाला बोलावून घेतलं आणि वर्षाचा काय संबंध आहे ?”
“अहो तुम्हाला माहितीच आहे की वर्षांच्या लग्नाची बोलणी करायला ते लोक गेले होते, तेंव्हा विदिशा पण त्यांच्या बरोबर गेली होती. वर्षाला सोबत म्हणून.”- वसुंधराबाई.
“मग ?” – शिवाजीराव
“अहो, निशांत च्या भावाला, विशालला, आपली विदिशा फारच आवडली आहे. आणि हिला पण तो पसंत आहे. आता आपल्याला त्यांच्याशी बोलायला हवं. म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. मला वाटलं की त्यांच्याशी बोलायच्या अगोदर वर्षांच्या आई बाबांशी बोलून घेतलं म्हणजे काही शंका राहणार नाहीत. तुम्ही काय म्हणता ?” वसुंधराबाई म्हणाल्या.
“बरोबर आहे तुझं म्हणण. काय करतो हा मुलगा ? काय शिकला आहे ?” शिवाजीराव.
“इंजिनियर झाला आहे पण आता शेती करणार म्हणतो आहे.” – वसुंधराबाई.
“चांगलं आहे की मग. प्रॉब्लेम कुठे आहे ? अग आपण पण शेतकरीच आहोत. आता आपण स्वत: कसत नाही हे वेगळं. पण माझे भाऊ कसतात नं, मग ? आणि निवृत्त झाल्यावर मी पण गावी जाऊन त्यांना मदत करणारच आहे की.”- शिवाजीराव.
“सध्या त्याचे बाबा आणि मोठा भाऊ प्रताप, हे शेती बघतात. प्रताप शेतकी पदवीधर आहे. मधला B. Com. आणि हा इंजीनियर. असे तिघं भाऊ आहेत. मोठा मुलगा प्रताप आणि बाबा यांना शेतीचं चांगलं ज्ञान आहे. पण हे दोघ! यांना काहीच माहीत नाही. आता ते वडीलांच्या हाताखाली शिकताहेत.” वसुंधराबाईंनी माहिती पुरवली.
“ठीकच आहे की मग. शेतकर्यांची मुलं ती, त्यांना फारसा वेळ लागणार नाही, सगळं आत्मसात करायला. तुम्ही उगीच चिंता करता आहात. बाकी कुटुंब कसं आहे ?” शिवाजीरावांनी बायकोला दिलासा दिला.
“वर्षांची आई तर खूप तारीफ करत होती.” – वसुंधराबाई.
“मग काय उडवून टाकू की बार यंदाच. उशीर कशाला ? काय ग विदिशा, तू काय म्हणतेस ? चालेल न तुला ?” शिवाजीरावांनी विदिशाला विचारलं.
विदिशा ला खूप भीती वाटत होती की आता बाबा काय म्हणतात ते. पण आता
तिच्या मानांवरचं ओझं उतरलं. तिने खुशी खुशीतच हो म्हंटलं.
“चला तर मग वर्षा कडे.” - वसुंधराबाई.
“नमस्कार वासुदेवा तुम्ही सांगावा धाडला, आणि आलो की आम्ही कॉफी प्यायला.”
“अरे या या, तुमचीच वाट पहात होतो.” – वासुदेवरावांनी त्यांचं स्वागत केलं.
थोड इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर सगळेच मुद्द्यावर आलेत.
वासुदेव, म्हणजे वर्षांचे बाबा, म्हणाले की
“विदिशा चं पण तिथेच जमलं तर फारच छान होईल. पण आज विजयानी एक वेगळाच मुद्दा काढला. त्यामुळे मी पण जरा विचारात पडलो आहे.”
“अरे, ही तर सांगत होती की विजयाताई, पाटील मंडळींची खूपच तारीफ करत होत्या म्हणून. मग आता काय झालं ?” – शिवाजीराव.
“नवीनच मुद्दा निर्माण झाला आहे. आणि तुम्ही शेतकरी तेंव्हा तुम्हालाच ते चांगलं कळेल. “ वासुदेवरावांनी सुरवात केली.
“काय मुद्दा आहे ते तर कळू द्या.” – शिवाजीराव.
“विजया म्हणते आहे की निशांत आणि विशालला शेतीत फारसा इंट्रेस्ट नाहीये. आज तर त्यांचे वडील आहेत. पण नंतर जर वाटण्या झाल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला 10 एकर येतील. प्रतापला प्रॉब्लेम नाहीये पण या दोघांच काय ? 10 एकरात भागतं का ? आम्हाला कल्पना नाहीये. पण मी बँकेत असल्याने बरेच असे शेतकरी आहेत की ते म्हणतात की 10 एकरात भागत नाही.” – वासुदेवरावांनी त्यांना वाटणारी काळजी बोलून दाखवली.
“अहो तसं काहीही नाहीये. काम करणार्याला दहा एकर भरपूर झाली. परत विजया ताई सांगत होत्या की त्यांची जमीन ओलिताची आणि फार सुपीक आहे म्हणून.” – शिवाजीराव.
“अहो,” विजया ताईच बोलल्या. “तिथेच तर गडबड आहे. या दोघांनाही शेती मध्ये इंट्रेस्ट नाहीये. मग कसं होणार. आत्ता ते मारून मुटकून वडीलांच्या धाकामुळे करताहेत. पण पुढे काय हाच प्रश्न आम्हाला सतावतोय. आम्हाला आजची चिंता नाहीये पण पोरींना आयुष्य काढायचंय.”
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. शिवाजीराव पण विचारात पडले होते. म्हणाले.
“वासुदेवा मला असं वाटत की आपण या बाबतीत पाटील साहेबांशी बोलून सर्व गोष्टी क्लियर करून घ्यायला हव्यात. आमची तर अजून ओळख पण नाहीये पण आम्ही सुद्धा विदिशा साठी विशालचं, स्थळ म्हणून विचार करतच होतो की.”
“तू म्हणतोस ते बरोबर वाटतंय. मी उद्या त्यांना फोन करून वेळ आहे का हे विचारतो.” वासुदेवराव म्हणाले.
“ठीक तर मग उद्या काय बोलणं होतेय ते सांग. चला निघतो आम्ही आता” शिवाजीराव म्हणाले, आणि निघाले.
दुसऱ्या दिवशी श्रीपतरावांचाच फोन आला.
“मी आणि प्रताप काही कामासाठी अमरावती ला येतो आहोत काम संपल्यावर साधारण चार च्या सुमारास चहा प्यायलाच तुमच्याकडे येतो आहोत.”
झालं आता प्रश्नच मिटला होता. सगळेच चार वाजता त्या लोकांची वाट पहात होते. नाश्ता आणि चहाची जय्यत तयारी पण करून झाली होती.
“या या श्रीपतराव या. बसा. आधी मी ओळख करून देतो. विदिशा ला तुम्ही ओळखताच, हे शिवाजीराव, विदिशाचे वडील आणि या तिच्या आई. वसुंधरावहिनी” वासुदेवरावांनी ओळख करून दिली.
नमस्कार चमत्कार झाल्यावर आणि जरा वेळ अवांतर बोलणं झाल्यावर नाश्ता आणि चहा आला आणि मग सर्वच हॉल मध्ये येऊन बसले.
“बरं झालं तुम्ही दोघंच आला आहात ते. आम्हाला तुमच्याशीच जरा बोलायचं होतं. तसा मी तुम्हाला फोन करणारच होतो पण तुम्हीच इथे आल्यामुळे प्रश्नच मिटला.” वासुदेवरावांनी विषयाला हात घातला.
“असं काय महत्वाचं आहे बुवा. बरं जे असेल ते बोला, मनात काही ठेऊ नका.” श्रीपतराव
“असं आहे की निशांतरावांना शेतीत इंट्रेस्ट नाही असं कळलं. सध्या तर ते तुम्ही सांगितल्यामुळे शेतीत लक्ष घालताहेत. पण पुढे काय ? हे आम्हाला कळत नाहीये. म्हणून जरा काळजी वाटते आहे.” - वासुदेवराव.
“आहे. तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. श्रीपतराव म्हणाले. “पण शेतकऱ्यांची मुलं आहेत ती. लवकरच सर्व शिकतील, आणि एकदा ते नोकरीचं खूळ डोक्यातून गेलं की मग काही प्रॉब्लेम नाही. अहो त्यांना शेतीतच काय, त्यांना मोर्शी मधे पण राहायला आवडत नाही. पण तुमची मुलगी समंजस आहे. ती त्याला भटकू देणार नाही याची खात्री वाटते आहे.”
“अहो पण जर बायकोच ऐकलं नाही तर ? कारण अजून दहा पंधरा वर्षा नंतर काय परिस्थिती असेल ते कसं सांगणार ? म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की जर तिघा भावात वाटण्या झाल्याच, तर प्रताप राव तर सांभाळून घेतील पण बाकी दोघ त्यांच्या वाट्याला आलेल्या शेतीत भागवू शकतील का ? आणि वरचा वचक नसल्याने शेतीतलं लक्षच काढून घेतलं तर कसं ? माफ करा जरा स्पष्टच बोललो पण मुलीला आयुष्य काढायचं आहे हो म्हणून.” वासुदेवरावांनी स्पष्टपणे त्यांना कसली काळजी सतावते आहे ते सांगितलं.
श्रीपतराव आणि प्रताप दोघेही गंभीर झाले. सुळे साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतच. खुद्द त्या दोघांनाही निशांत आणि विशाल ची खात्री देता येत नव्हती. पण शेवटी ही कोंडी फुटायला हवीच होती.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद