तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनात सहाय्य डॉ. अनंत बिजवे
पात्र रचना
श्रीपती पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची प्रेयसी.
विदिशा वर्षांची मैत्रीण .
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधरा विदिशाची आई
भाग 3
भाग 2 पासून पुढे ......
निशांत विचारच करत होता की वर्षांच्या आई, वडीलांनी तर असा प्रश्न कधी केला नाही, मग बाबा मला का असं बोलतात. बरं दादा सुद्धा काही नोकरी करत नाही त्याला तर असं कधी विचारल्याचं आठवत नाही. दादा जसा शेतावर काम करतो तसाच मी पण करतो आहेच की. बस ठरलं असच विचारायचं. सगळं बळ एकवटून तो म्हणाला
“बाबा असा प्रश्न तर तुम्ही कधी दादाला विचारला नाही. त्या वेळेला तुम्ही आनंदानी त्याचं लग्न लावून दिलं, मग आत्ता मलाच का असं विचारता आहात ?”
“हा प्रश्न तू स्वत:लाच विचार न. दादाचं शेतीमध्ये किती contribution आहे आणि तुझं किती आहे. तो किती कष्ट करतो आहे आणि तू किती, हे तूच तपासून पहा म्हणजे कळेल. तीन वर्ष झाली तुला पदवी घेऊन आणि या वर्षांमध्ये तू किती शेतीची कामं शिकलास ? आज तो संपूर्ण जबाबदारी अंगावर घेऊन शेती सांभाळतो आहे. तुला घेता येईल अशी जबाबदारी ?” बाबांनी सगळा लेखाजोखा निशांत समोर मांडला
“दादाची गोष्ट वेगळी आहे. त्याला शेतीत इंट्रेस्ट आहे आणि तो शिकला पण आहे. पण सगळ्यांनी त्याच्या सारखंच व्हायला पाहिजे असं तुम्ही कस म्हणू शकता ? प्रत्येकाची आवड आणि क्षमता वेगवेगळी असते. मी B.Com आहे. मी मिळवलेलं ज्ञान वेगळं आहे आणि मी त्याचा पूर्ण उपयोग करतो आहे. तरी तुम्ही म्हणता की माझं contribution काय आहे म्हणून. तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही आम्हा भावंडांना वेगवेगळे मापदंड लावता आहात म्हणून ?” निशांतचा सुर आता तक्रारीचा होता.
प्रतापला आता संकोच वाटायला लागला होता. तो म्हणाला
“बाबा आम्हाला झोप आली आहे. आज दिवसभरात बरीच दमछाक झाली. आम्ही जातो, तुमचं चालू द्या.”
“नाही प्रताप, सगळे इथेच थांबा. सरिताची गोष्ट वेगळी आहे. तिला सातवा महिना लागला आहे. ती जर थकली असेल तर तिने जावं. बाकी सगळे कुठेही जाणार नाहीत.” बाबांनी प्रतापला थांबवलं. आणि ते पुढे म्हणाले-
“हूं, निशांत, ऐक, मी याच्या अगोदर पण बरेच वेळी जे सांगितलं होतं तेच आता पुन्हा सांगतो. आपली जमीन फार सुपीक आहे. मी माझ्या कुवतीनुसार पारंपरिक पद्धती पेक्षा बरेच नव नवीन प्रयोग करून पाहीले आणि आपल्या घराची सुबत्ता वाढली. प्रताप शिक्षण घेऊन आला आणि त्यांनी अजून पुढे मजल मारली, आणि आपल्या उत्पन्नात बरीच भर पडली. तू आणि विशाल दोघेही उच्च विद्या विभूषित आहात. भलेही शेती हा तुमचा प्रांत नसेल, पण बुद्धिमत्ता तर आहे. तुम्ही तिघे मिळून निरनिराळी तंत्र आणि यंत्र वापरून जर शेतीत श्रम घेतले, तर मला खात्री आहे की तुमच्या श्रमाचा मोबदला कित्येक पटीनी तुम्हाला मिळेल. कसलीही ददात पडणार नाही. पण हे तेंव्हाच शक्य आहे ,जेंव्हा तुम्ही जीव ओतून काम कराल. आहे का तयारी ? माझं आता वय झालंय आणि तुम्ही तिघांनी मिळून मोर्चा सांभाळला तर मी निवृत्त होईन. मला त्यात आनंदच आहे.” बाबा म्हणाले.
निशांत आणि विशालनी एकमेकांकडे बघितलं. त्यांच्यात काही नेत्र पल्लवी झाली. मग निशांत म्हणाला
“बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण आम्हाला शेतीची काहीच माहिती नाही. म्हणजे तशी बरीच आहे, पण अंगावर जबाबदारी घेऊन, काही करण्या इतकी नाही. तुम्ही आम्हाला ट्रेनिंग द्या आणि मग बघा आमचा performance.”
“तुमची शिकायची मनापासून इच्छा असेल तर, मी आणि प्रताप तुम्हाला सर्व माहिती देऊ. प्रगती करणं तुमच्या हाती. वर्ष भरात तुम्ही स्वतंत्रपणे आपला आपला विभाग सांभाळा. आणि आपला performance दाखवा. चालेल ?” – बाबा
“एकदम तयार.” निशांत आणि विशाल दोघंही एकदम म्हणाले.
“ठीक आहे उदयापासूनच ट्रेनिंगला सुरवात. पण हे काम आमच्या दर्जाचे नाही, असल्या कॉमेंट्स चालणार नाहीत. चिखला पासून शेणा पर्यन्त हात खराब करावे लागतील. स्पष्टच बोलतो. शरीराचं आणि शेतीचं सारखंच असतं. जसं ढुंगण धुण्याची लाज वाटत नाही तसंच शेतीच्या कुठल्याही कामाची लाज वाटून उपयोगाची नाही. हे लक्षात घ्या. विचार करा आणि मगच तयार आहे म्हणा.” बाबांनी शेवटचा हातोडा मारला.
यमुनाबाईंनी आणि सरितानी तोंडाला पदर लावला, त्यांना पण हसू आवरेनास झालं होतं.
“ईss, अहो काहीतरीच काय ? इतक काही बोलायला नको.” यमुनाबाई बोलल्या.
“अहो खरं तेच बोललो, हे साहेब लोक आहेत, त्यांना आधीच कल्पना दिलेली बरी.”
“अहो बाबा काहीतरीच काय बोलता, आम्हीही शेतकरीच आहोत. आणि हे सिद्ध करून दाखवूच काय विशाल काय म्हणतोस ?” निशांत म्हणाला.
“Yes, I am with you. आपण दोघ इतकी मेहनत करू की सर्वांना आश्चर्य वाटलं पाहिजे.” – विशालनी खात्री दिली.
“वा वा that is the spirit. मला आवडलं.” प्रताप म्हणाला.
बाबा हसले. म्हणाले “चला हे ठीक झालं. मलाही हे ऐकून आनंद झाला.”
“पण बाबा, मूळ मुद्दा तर बाजूलाच राहिला.” निशांत म्हणाला.
“तो मुद्दा आता आमचा आहे.” बाबा म्हणाले “तू काळजी नको करू. तू जे काही सांगतो आहेस त्यावरून ती चांगली माणसं दिसत आहेत. काळजी करू नकोस. शेती कडे लक्ष दे बस्स. आणि आम्ही सांगे पर्यन्त तिला फोन करू नकोस आणि तिचा फोन आलाच तर आज काय बोलणं झालं आहे ते सांगू नकोस. चला बराच उशीर झाला आहे. झोपायला चला.”
त्या रात्री वर्षांनी निशांतला फोन करायचा बराच प्रयत्न केला. पण त्यावेळेला बाबा मीटिंग घेत होते. त्यामुळे वर्षाशी तो बोलू शकला नाही. वर्षाला मग इतका राग आला की तिने आईला सांगून टाकलं की ती आता त्याला कधीच फोन करणार नाही. तिच्यापुरता हा विषय संपला आहे.
खोलीत गेल्यावर निशांतनी पाहीलं की वर्षांचे बरेच मिस कॉल्स आहेत. तो लगेच कॉल बॅक करणार होता पण अकरा वाजले होते आणि या वेळेस फोन केलेला कदाचित तिच्या आई वडिलांना आवडणार नाही म्हणून उद्या सकाळी करू असा विचार करून त्यानी फोन ठेऊन दिला. निशांत आणि विशाल नंतर बऱ्याच वेळ बोलत होते. शेवटी त्यांचं शेतीत मनापासून लक्ष घालायचं यावर एकमत झालं. मनासारख्या नोकऱ्या मिळत नसल्याने दोघांच्याही जवळ दूसरा पर्यायच नव्हता. विशाल इंजिनियर झाला होता, पण कोचिंग क्लास च्या भरवशावर मिळालेली डिग्री ती, फारशी चांगली नोकरी मिळत नव्हती. जी मिळायची ती आवडायची नाही. अश्या परिस्थितीत घरची शेती सांभाळणं हाच एक पर्याय शिल्लक होता.
आता खरं म्हणजे कष्ट करणे, ही दोघांचीही प्रकृती नव्हती. दोघांनाही सरकारी नोकरी हवी होती. पण त्यासाठी प्रयत्न करण्याचे कष्टही दोघांनी घेतले नव्हते. पण निशांतच्या आता अंगावरच आल्याने त्याला निर्णय घ्यावाच लागला. विशालचीही अवस्था फार वेगळी नव्हती. त्याचं प्रेमप्रकरण नव्हतं पण त्याला लवकर लग्न करून बायको बरोबर आयुष्याची मजा चाखायची होती. पण ह्या सगळ्यांची अपेक्षा करतांना फारसे श्रम करायची तयारी नव्हती. सगळं कसं आरामात आयतं मिळालं तर हव होतं. पण आता बाबांना शब्द दिल्या मुळे शेतीत राबावं हे लागणारच होतं आणि ते ही बाबांच्या हाताखाली. आणि याच्या वर काही उपाय नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप बरोबर दोघेही शेतावर गेले. जातांना निशांत बाबांच्या कडे हेतुपूर्वक बघत होता आणि बाबांनी मान हलवली आणि मग तो निश्चिंत पणे शेतावर गेला. पण वर्षाला फोन करायचं विसरून गेला.
ते लोक गेल्यावर श्रीपतरावांनी वर्षांच्या वडीलांना फोन लावला.
“हॅलो, सुळे साहेबांशी जरा बोलायचं होतं.”
“वासुदेव सुळे बोलतोय. आपण कोण ?” सुळे म्हणजे वर्षांचे वडील, म्हणाले.
“नमस्कार, मी श्रीपती पाटील मोर्षी वरून बोलतोय. निशांत माझा मुलगा. कालच त्यानी आम्हाला वर्षा बद्दल आणि तुमच्या बद्दल सांगितलं. मला अस वाटत की या बाबतीत आपण एका ठिकाणी बसून बोलायला पाहिजे. कसं म्हणता ?”
“बरोबर आहे तुमचं म्हणण. कसं आणि केंव्हा सांगा.” – सुळे
“मी आमच्या ड्रायव्हरला पाठवतो. साधारण तासाभरात तो पोचेल. तुम्ही तयार रहा. आत्ता साडे आठ वाजले आहेत. साडे नऊ पर्यन्त तो पोचेल. इथे यायला साडे दहा, फार फार तर अकरा. या तुम्ही, आमचं घर बघा, शेत बघा. निवांतपणे बोलू, जेवू, आणि मग संध्याकाळ पर्यंत तुम्हाला अमरावतीला आमचा ड्रायव्हर सोडून येईल. ठीक आहे न, जमेल न ?” श्रीपतरावांनी योजना सांगितली.
“पाटील साहेब, इतक्या घाई घाईने ?” सुळे साहेबांना जरा आश्चर्यच वाटलं.
“सुळे साहेब या गोष्टी आधीच व्हायला हव्या होत्या. पण आमच्या लेका कडूनच बराच उशीर झाला आहे, आता मात्र आपण सर्व गोष्टी वेळेवारी करू. तुम्ही याच. हे बघा, आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन निघाला सुद्धा. आम्ही तुमची वाट पाहत आहोत.
पोरांना सुद्धा श्रीपतरावांनी बोलावून घेतलं होतं. अकरा वाजे पर्यन्त सगळी मंडळी आली. वर्षा, वर्षांचे आई वडील आणि वर्षांची मैत्रीण विदिशा असे चौघे गाडीतून उतरले. स्वागताला इकडची सगळी उपस्थित होती. सगळ्यांचं गुलाबांचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं. सुळे मंडळी एकदम भारावून गेली. सगळी आत आली. रेणुका बाईंनी पाणी आणलं. नंतर सुळे साहेबांनीच सुरवात केली.
“मी वासुदेव सुळे, मी बँकेत आहे सध्या अकोल्याला पोस्टिंग आहे. ही विजया, माझी पत्नी. ही आणि वर्षा अमरावती ला असतात. मी एकटाच अकोल्याला राहतो शनिवार रविवार इथ येतो.”
“ही कोण, वर्षांची लहान बहीण का ?” श्रीपतरावांनी विदीशा कडे पाहून विचारलं.
“नाही. ही माझ्या मित्राची मुलगी. विदिशा पाटील. आमची घरं शेजारी शेजारीच आहेत. हिचे वडील MSEB मध्ये आहेत सध्या भंडाऱ्याला आहेत. ही, हिचा भाऊ आणि आई हे लोकं अमरावती ला राहतात. हिला शेती पाहायची खूप उत्सुकता होती म्हणून आमच्या बरोबर आली आहे.” वर्षाचे बाबा बोलले.
“मला असं वाटत सुळे साहेब, पोरांना आमची शेती, कारखाना आणि मळा पाहायला जाऊ द्याव. आणि आपण सविस्तर बोलून घेऊ. कसं म्हणता ?” – श्रीपतराव.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.