Teen Jhunzaar Suna - 7 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 7

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 7

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपती पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                        श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची प्रेयसी.

विदिशा                         वर्षांची मैत्रीण .

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई. 

शिवाजीराव                      विदिशाचे वडील

वसुंधरा                         विदिशाची आई

 

 

 

भाग ७

भाग ६  वरून पुढे वाचा .................

श्रीपतराव आणि प्रताप दोघेही गंभीर झाले. सुळे साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतच. खुद्द त्या दोघांनाही निशांत आणि विशाल ची खात्री देता येत नव्हती. पण शेवटी ही कोंडी फुटायला हवीच होती.

श्रीपतराव म्हणाले की “काय आहे सुळे साहेब, तुमची काळजी रास्तच आहे. खरं सांगायचं तर आमची तुमच्या मुलीवरच सारी भिस्त आहे. ती हुशार आहे, आणि कुटुंब जोडून ठेवेल या बद्दल आमची खात्री आहे. आमची मोठी सून सरिता, तिच्याशी तुमच्या मुलीचं चांगलं जमेल आणि ती निशांतला कुठलं ही वेडं वाकडं पाऊल उचलू देणार नाही हा  विश्वास आहे. पण हे आमचं मत आहे, आता तुम्हीच विचार करा पुढं जायचं की नाही ते.” श्रीपतराव एका दमात  बोलले. थोडं थांबून ते पुढ म्हणाले की

“आणखी एक सांगायचं आहे, आमची बायको आणि आमची सून म्हणजे प्रतापची बायको सरिता, मागेच लागल्या आहेत की या विदिशा ला पण सून करून घ्या म्हणून. खरं म्हणजे आमचा इथे येण्याचा हा एक उद्देश होताच. दोघी मैत्रिणी एकत्र आल्यावर काय बिशाद आहे आमच्या पोरांची की ते काही वेगळा विचार करतील ? या दोघी त्यांना ट्रॅक वर ठेवतील अशी आमची शंभर टक्के खात्री आहे.”

आता वासुदेवराव. आणि शिवाजीराव दोघेही विचारात पडले. त्यांना जी शंका होती, तीच श्रीपतरावांना आणि प्रतापला पण भेडसावत होती. पण त्यांच घर वाचवण्या साठी आपल्या मुलींचा बळी कसा देणार ?

थोडा वेळ तसंच गेला. कोणीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. ती शांतता फार जीव घेणी होती. सर्वात जास्ती अवघडल्या होत्या त्या विजया ताई आणि वसुंधरा ताई. वर्षा आणि विदिशा कडे तर पाहायची सोयच नव्हती. दोघींचे चेहरे मलूल झाले होते. या परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी, जर पुढे न जाण्याचं ठरवलं तर त्यांना दोष देता येणार नाही, मग आपण काय करायचं ? हाच विचार त्यांच्या मनात होता.

“श्रीपतराव आमच्या बोलण्याचा कदाचित तुम्हाला राग आला असेल आणि ते मी समजू  शकतो. पण अशा परिस्थितीत जर तुम्ही असता तर काय विचार केला असता ? तुमचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतु नव्हता आणि नाही. खरं तर ही सोयरीक आम्ही आनंदांनी स्वीकारली होती. शिवाजी राव सुद्धा विदिशा साठी तुमच्याशी बोलायलाच इथे आज आले आहेत. अगदी तुमच्या मनात जे होतं तेच आमच्याही  मनात होतं. पण आता तुम्हीच सांगा काय करायचं ते.” वासुदेवरावांनी आपलं मन उघड  केलं.

श्रीपतराव आणि प्रताप दोघांचीही मनस्थिति विचित्र झाली होती. खरं तर ते विदिशा ला मागणी घालायला आले होते. पण आता सगळंच बदललं होतं. विशाल आणि  विदिशा एकमेकांना पसंत करतात हे त्यांना कळलं होतं. आणि त्यानुसारच ते अमरावती ला आले होते सर्वांनाच विदिशा फार  आवडली होती.

प्रतापनीच आता बोलायला सुरवात केली. तो म्हणाला –

“काका अस बघा, कितीही झालं तरी माझे भाऊ हाडाचे शेतकरी आहेत. आता तरुणपणात  काही अवास्तव कल्पना असतात डोक्यात. त्याला आजकालचे सिनेमे खत पाणी घालतात. पण कालांतराने ही जळमटं निघून जातील. अहो जबाबदारी अंगावर पडल्यावर सगळंच बदलतं. आणि या दोघी आहेतच की. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मी आणि माझी बायको सरिता, दोघंही याची काळजी घेऊ. तुम्ही सरिताला भेटलाच आहात. या दोघीही तिच्या बरोबर बराच वेळ बोलत होत्या. मी शब्द देतो आम्ही कुटुंब फुटू देणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. तुम्ही आमच्या घरी दिवसभर होता. आमच्या घरच्या वातावरणांशी तुम्ही परिचित आहातच. तेंव्हा सर्व बाजूनी विचार करून, तुमचा जो काही विचार ठरेल, त्या नुसार निर्णय घ्या. तुम्ही उलट निर्णय घेतला तर आम्हाला वाईट नक्कीच वाटेल, पण आम्ही तुमचा निर्णय मान्य करू.”

आता शिवाजी राव बोलले. “श्रीपत राव तुमच्या प्रतापची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. मी पण शेतकरीच आहे. जरी नोकरी करत असलो, तरी रिटायर झाल्यावर पुन्हा शेतीकडे वळायचा मानस आहेच. खरं तर आम्ही आज विदिशा बद्दल बोलायलाच आलो होतो. आम्हाला थोडा वेळ द्याल का ? आम्ही आपसात आणि मुलींशी जरा चर्चा करावी म्हणतो. चालेल का ? काय आहे, आयुष्य भर या निर्णयाचे पडसाद उमटणार आहेत, तेंव्हा थोडा वेळ द्या अशी नम्र विनंती आहे.”

“तुमचं म्हणण बरोबरच आहे शिवाजी राव,” श्रीपतराव बोलले. “तुमच्या मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेंव्हा जरूर वेळ घ्या. पण जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला कळवा. बरं आता आम्ही निघतो.”

प्रताप आणि श्रीपतराव गेल्यावर बराच वेळ वर्षा, विदिशा आणि त्यांचे आई वडील चर्चा करत होते. बराच साधक बाधक विचार करून झाल्यावर दोन्ही कुटुंब या विचारांवर पोचली की पुढे जायला हरकत नाही. वर्षा आणि विदिशा दोघींनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या मना सारखं आता होणार होतं.

“काही म्हण वासुदेव, पण श्रीपतराव आणि प्रताप दोघांनाही, पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे  ते सगळी काळजी घेतीलच. आणि ते म्हणताहेत त्या प्रमाणे, हे तारुण्यातलं खूळ डोक्यातून निघून गेलं की सर्व सुरळीत होईल, असा मलाही  विश्वास वाटतो.” शिवाजीराव म्हणाले.

“अरे पण हे बरचसं आपल्या मुलींवर अवलंबून आहे. काय ग पोरींनो, तुम्हाला काय वाटतं ? तुम्ही करू शकाल हे ? बघा पूर्ण विचार करा आणि सांगा. तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. आधी आम्हाला शंका होती, पण प्रतापच्या बोलण्यावर आमचा विश्वास आहे. काय शिवाजी काय म्हणतो मी ?” वासुदेवरावांनी वर्षा कडे  पाहून विचारलं.

“बाबा,” वर्षा बोलली “आमच्या capacity बद्दल आमच्या पेक्षा तुम्हालाच जास्त कळतं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तुम्ही आमचं नक्कीच वाईट चिंतणार नाही. आता भविष्यात काय दडलंय ते कोणालाच माहीत नसतं. सध्या तरी सगळं ठीक वाटतंय पुढचं पुढे. आमची तयारी आहे. त्या घरातली सगळी माणसं छान आहेत. आम्हाला त्रास होणार नाही असं वाटत. शेवटी पाठीराखे तुम्ही आहातच की.”

“अग आम्ही काय जन्माला थोडीच पुरणार आहोत ? शेवटी तुमचं तुम्हालाच सांभाळावं  लागणार आहे.” शिवाजीरावांनीच उत्तर दिलं.

“ठीक आहे न बाबा, कुठेही जरी गेलो तरी भविष्यात काय घडणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. इथे निदान सर्व माणसं चांगली आहेत हे माहीत आहे. अगदी निशांत आणि विशाल सुद्धा प्रेमळच आहेत. सुस्वभावी आहेत. निर्व्यसनी आहेत. थोडे आळशी आहेत, म्हणून थोडं खूळ डोक्यात शिरलं आहे एवढंच. आणि खरं सांगायचं म्हणजे मी पण त्याला सपोर्ट केला होता की नोकरी शोध म्हणून, कारण मलाही मोर्शीला राहायची कल्पना आवडत नव्हती.” – वर्षा.

“ठीक आहे मग काय शिवाजी, त्यांना कळवायचं ? आम्ही तयार आहोत म्हणून ?” वासुदेवरावांनी सर्वांच्याकडे नजर फिरवून विचारलं.

“मला तरी ठीकच वाटतंय. आताच फोन करायचा का ? म्हणजे जर काही बोलणी करायची असतील तर उद्या मोर्शीला जाता येईल. आता साडे नऊ वाजले आहेत. झोपले असतील का ते ?” – शिवाजीरावांनी आपला होकार जाहीर केला.

“मला नाही वाटत. पोचायलाच साडे आठ वाजले असतील, मग आज जे काही बोलणं झालंय त्या विषयी थोडी फार चर्चा होईल, जेवण पण होईल. नाही, मला नाही वाटत ते इतक्यात झोपले असतील म्हणून. पण इतक्या तातडीने फोन करणं बरं दिसेल का ?” वासुदेवरावांनी विजायाबाईंना विचारलं.

वर्षांची आई म्हणाली की “मला असं वाटतं की आपल्या प्रमाणेच ते पण उत्तराची वाट पहात असतील. आपला निर्णय झालाच आहे तर थांबायचं कशाला ? तुला काय वाटतं वसुंधरा ?”

“अहो विदिशा चं लग्न ठरतंय म्हंटल्यावरच मला छान वाटतंय. आपण सर्वांनी इतका वेळ चर्चा करून आणि सारासार विचार करून सर्वानुमते योग्य असा निर्णय घेतलाच आहे तर आता उशीर कशाला ?” वसुंधराबाईंनी आपलं मत दिलं.

वासुदेवरावांनी फोन लावला.

“हॅलो, श्रीपत पाटील बोलतो.”

“हॅलो, मी वासुदेव सुळे बोलतो आहे. वेळ आहे का थोडं बोलायला ? का खूप उशीर झाला आहे ?”

“अरे नाही, नाही, अजून  जेवणं व्हायची आहेत. आपल्या संध्याकाळी झालेल्या चर्चे बद्दलच बोलणं चाललं होतं. काय म्हणता ? अजून काही शंका आहेत ?” श्रीपतरावांनी विचारलं.

“नाही. तुम्ही आणि प्रतापरावांनी जो विश्वास आम्हाला दिला, त्याने आम्ही अगदी निश्चिंत झालो आहोत. आणि आम्हा सगळ्यांना दोन्ही सोयरिकी मान्य आहेत.” वासुदेवरावांनी सांगितलं.

“अरे, वा वा. वासुदेवराव मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही आमच्या डोक्यांवरचं ओझं उतरवलं. संध्याकाळच्या चर्चे नंतर वातावरण, जरा गंभीरच झालं होतं. मग शिवाजी राव काय म्हणताहेत ? येता  का उद्या, रीतसर बोलणी करून टाकू.” – श्रीपतराव.

“चालेल. उद्या दहा वाजता गाडी ने जर निघालो तर साडे अकरा पर्यन्त पोहोचू. अनायासे शिवाजी रावांची पण गाडी आहेच.” - वासुदेवराव.

“ठीक आहे, या उद्या, वाट पहातो. बाकी उद्या प्रत्यक्ष बोलूच. ठेऊ मग ? ठेवतो.” आणि श्रीपतरावांनी फोन ठेवला. सगळे त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात होते. श्रीपतरावांनी मग डीटेल सांगून सगळ्यांचं समाधान केलं. निशांत, आणि विशाल यांच्या चेहऱ्यावर संध्याकाळी काय चर्चा झाली, हे ऐकल्यावर, अवकळा आली होती, ती जावून आता दोघांचेही चेहरे फुलले होते. ते ही दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पहात  होते.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद