Teen Jhunzaar Suna - 5 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 5

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 5

            तीन झुंजार सुना

             पात्र  रचना

 

श्रीपती पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                        श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची प्रेयसी.

विदिशा                         वर्षांची मैत्रीण .

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई. 

शिवाजीराव                      विदिशाचे वडील

वसुंधरा                         विदिशाची आई

 

 

भाग ५

भाग ४  वरून पुढे वाचा .................

 

“विशाल भाऊजी काय बिनसलं आहे तुमचं ? गेले दोन दिवस पाहते आहे की कशातच लक्ष नाहीये तुमचं. काय झालं आहे ? बाबा रागावले का ?”

“नाही असं काहीही नाहीये. तू नको यात लक्ष घालू. आधीच इतके जण आहेत त्यात आणखी तुझी भर नको.” – विशाल.

“अहो असं काय करता ? सहज चौकशी केली, त्यात काय एवढं. तसा मी अंदाज लावू शकते म्हणा, पण म्हंटलं की तुमच्याकडूनच ऐकावं.” – सरिता.

विशाल चपापला. काय कळलं असेल वहिनीला, म्हणून ती अंदाज लावते आहे, त्याला काही कळेना.

“काय वाटतं तुला वहिनी ? काही कोणी रागावले नाहीये.” – विशाल.  

“भाऊजी, एक गंमत सांगते. आमच्याकडे एक मांजर पाळली होती.” – सरिता.

“मग ?” – विशाल.

“ती नं, दूध पितांना डोळे मिटून घ्यायची.” – सरिता.

“काय म्हणायचं काय आहे तुला वहिनी ?” – विशाल.

“काही नाही, समझने वाले को इशारा काफी होता हैं.” – सरिता.

आता विशाल गडबडून गेला. आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. निशांत पण हसत होता.

“वहिनी, निशांत, तुम्ही समजता  तसं काही नाहीये. उगीच काहीतरी बोलता.” – विशाल.

“आम्ही काय समजतो आहे विशाल ?” निशांतच बोलला.

आता विशाल वैतागला. सर्व गोष्टींची सरळ कबुली देऊन मोकळा झाला.

“अरे मग तिला फोन लाव न.” – निशांत.

“उचलत नाहीये.” -विशाल.

“वर्षाला विचार, तिला माहीत असेल.” – सरिता.

“हां, हे नव्हतं लक्षात आलं. आत्ताच लावतो” असं म्हणून विशाल उठून अंगणात गेला.

सरिता आणि निशांत एकमेकांकडे बघून हसले.

“काय हो निशांत भाऊजी, कुठवर आलंय हे प्रकरण ?” – सरिता.

“माहीत नाही. दोनच दिवस तर झाले आहेत भेटी होऊन. मला पण निटशी कल्पना नाहीये.” – निशांत उत्तरला.  

विशाल वर्षाला फोन करायला अंगणात आला खरा पण मग त्याच्या मनात विचार आला, की ‘वर्षाला फोन करून काय फायदा, विदिशालाच जर आपल्याशी बोलायचं नसेल तर वर्षा तरी काय सांगणार ? आपण इतके कॉल केलेत ते तिला दिसले नसतील का ? फोन वर मिस कॉल येतात मग तिने कॉल बॅक करायला नको का ? यांचा अर्थ काय लावायचा आपण ? आपल्याच घरी आली होती म्हणून आपल्याशी प्रेमाने बोलली. दिसायला खूपच आकर्षक आहे, त्यामुळे कदाचित तिला मुलांना खेळवण्याची आवड आणि सवय असेल. म्हणजे आता आपण तिचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही. तिला विसरून जायचं. ठरलं. आता ठरलं. तिला मनातून काढून टाकायचं.’

पण इतकं सोपं होतं का विदिशा ला विसरून जाणं ? त्याच्या डोळ्यांसमोरून विदिशा चा चेहरा हालत नव्हता. त्याला आता वेड लागायची पाळी आली. विदिशा चा राग आला होता, पण त्याच वेळेस असंही वाटत होतं, की काहीतरी कारण असेल म्हणून ती फोन उचलत नसेल आणि तिला फोन करायला कदाचित अवसर मिळाला नसेल. काही असो, विचार कर करून तो जास्तच अस्वस्थ झाला होता.

बराच वेळ झाला म्हणून निशांत आणि सरिता बाहेर आले. विशाल अंगणात बाकावर बसलेला दिसला. कुठे तरी शुन्यात नजर लावून.

“काय रे बोलला का वर्षाशी ?” निशांत नी विचारलं.

विशाल नी नकारार्थी मान हलवली.

“अरे मग कसं कळणार तुला, तुझा फोन का उचलत नाहीये, ते ? – निशांत

“नको कळू दे. तिला जर असं करण्यातच मजा येत असेल तर ? मला हे आधीच समजायला हवं होतं.” – विशालच्या बोलण्यात चीड जाणवत होती.

घरात जाऊन सरितानीच  मग वर्षाला फोन लावला.

“हॅलो वर्षा मी सरिता बोलते आहे.”

“बोला वहिनी काय म्हणताय ?” – वर्षा.

“अग ही विदिशा कुठे आहे ? फार लाघवी आणि लोभस मुलगी आहे. मला तिच्याशी बोलायचं आहे. तिचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे ?” – सरितानी विचारलं.

“हो आहे ना, मेसेज करते तुम्हाला. पण ती आता इथे नाहीये. भंडाऱ्याला तिच्या बाबांकडे गेली आहे, दोन चार दिवसांसाठी.” – वर्षा.

“असं आहे होय. हरकत नाही, आज काल मोबाइल असल्याने फोन काय कुठेही करता येतो.” – सरिता.

“अहो वहिनी ती फोन इथेच विसरून गेली आहे. माझं आत्ताच तिच्या आईशी बोलणं झालं. का हो काही अर्जंट आहे का ?” – वर्षा.

“अग काही नाही. सहजच. लाघवी आहे पोरगी फार, म्हणून वाटलं बोलावंस.” – सरिता.

“असं करते मी, तिच्याशी बोलते आणि तिला फोन करायला सांगते.” – वर्षा.

“अग पण, ती फोन अमरावतीलाच विसरून गेली अस म्हणालीस ना ?” – सरिता.

“मी तिच्या आई ला फोन करून तिला करायला सांगते.” – वर्षा.

“बरं ठीक आहे.” – सरिता.

रात्री उशिरा विशाल ला एक मिस् कॉल आला. नंबर अनोळखी होता. त्यांनी लक्षच दिलं नाही. पांच मिनिटांनंतर पुन्हा आला. मग विशालनी कॉल बॅक केलं आणि विदिशा फोन वर आली.

“अरे विदिशा तू ? कुठे आहेस ? कितीदा तुला फोन केला तुला. मिस कॉल बघ.”- विशाल 

“अरे हो. हो. मला कसं कळणार तुझे मिस कॉल  आहेत ते. मी माझा फोन अमरावतीलाच विसरले. आम्ही आता भंडार्‍याला बाबांकडे आलो आहोत. आणि तुझा फोन नंबर माझ्या मोबाइल मध्ये आहे म्हणून तुला फोन पण करता येइना.” विदिशानी स्पष्टीकरण दिलं.

“मग असं आहे, तर आता कसा  मिळाला ?” – विशाल.

“वर्षा चा आईला फोन आला होता तिच्याकडून घेतला. हा माझ्या आईचा फोन आहे. सेव्ह करून ठेव.” – विदिशा.

“माय गॉड, मला असं वाटलं की तू मला विसरलीस, आणि काय काय विचार मनात येत होते. गेले दोन दिवस मी कसे काढले ते माझे मलाच माहीत.” – विशाल.

“अरे माझी पण अवस्था काही वेगळी नव्हती. पण मी काहीच करू शकत नव्हते. पण आता उद्या आम्ही अमरावती ला येतोच आहोत मग बोलू. आता ठेवते. आई च्या फोन वर जास्त बोलता येणार  नाही.” – विदिशा.

“काय रे” निशांत ने विचारलं “कोणाचा फोन होता ?”

“विदिशा चा” – विशाल.

“झालं का बोलणं ? काय झालं होतं दोन दिवस ?” – निशांत.

मग विशालनी सगळं सांगितलं.

“वा. झालं तुझ्या मना सारखं.” आता झोप लागेल तुला. गुड नाइट.

त्या रात्री विशाल ला शांत झोप लागली.

एका रविवारी विशाल ला अमरावतीला जायचं होतं. विशाल आणि विदिशा चा सिनेमाचा प्रोग्राम होता.

बाबांनी विचारलच “काय रे काय एवढं काम काढलं अमरावतीला.”

“काही नाही बाबा, मित्रांचा सिनेमाचा प्रोग्राम ठरला आहे म्हणून.” – विशाल.

“ठीक आहे. जा.” – बाबा.

त्या दिवशी विदिशा आणि विशाल दिवसभर भटकले. सिनेमा बघितला, बाहेरच जेवले आणि संध्याकाळी विशालने, विदिशा ला तिच्या घरी सोडलं.

विदिशा ची आई समोरच होती. तिने विशालला आत बोलावलं. मग बऱ्याच गप्पा झाल्यात. मग विशाल परत मोर्शीला गेला.

जेवण झाल्यावर, विदिशा ची आई विदिशा ला म्हणाली की

“काय ग तुमच्या मध्ये काही पक्क असं बोलणं झालं आहे का ?”

“अग आई आज आम्ही फक्त दुसर्‍यांदाच भेटलो आहोत. त्या मुळे हिंडलो, फिरलो, सिनेमा पाहीला आणि अवांतर गप्पा मारल्या त्यात सिरियस असं काही बोलणं झालं नाही. तू पण त्याच्याशी घरी आल्यावर गप्पा मारल्यास ना ? मग तुला काय वाटत ?” विदिशा म्हणाली.

“मला तर तो मुलगा चांगला वाटला. परत वर्षांचं त्याच्या मोठ्या भावाशी लग्न ठरलंच आहे. पण महत्वाचं म्हणजे तुला काय करायचं आहे. तुझी तयारी आहे का त्याच्याशी लग्न करायची ?” – विदिशाच्या आईने विचारलं.

विदिशा गप्पच राहिली. ती विचार करत होती. मग थोड्या वेळांनी म्हणाली की

“आई विशाल चांगलाच आहे. निर्व्यसनी आहे. इंजीनियर  आहे. जिव्हाळ्याने बोलतो. मी त्याला फार आवडते. आणि हे त्यांनी दहा वेळेला तरी बोलून दाखवलं आहे. चांगल्या घरातला आहे. मी त्यांच घर पण पाहीलं आहे. सर्वच माणसं चांगली आहेत. पण विशालला नोकरी करायची आहे आणि त्याच्या मनासारखी मिळत नाहीये. त्याला शेतीत फारसा इंट्रेस्ट नाहीये. पण चांगली नोकरी मिळत नाही म्हणून तो शेतीचं  काम बघतो आहे. निशांतचं पण असच आहे. त्यामुळे माझा निर्णय होत नाहीये. तूच सांग अश्या परिस्थितीत  मी काय करायला हवं ?”

“मला असं वाटत की आपण विजया ताईंशी बोलायला हवं. त्यांनी कुठल्या आधारावर वर्षांचं लग्न ठरवलं ते बघायला हवं. कारण तू म्हणते की निशांत आणि विशाल च्या भूमिकेत फारसा फरक नाहीये. दोघांनाही नोकरी करायची आहे पण मिळत नाही म्हणून नाइलाजानी ते शेतीत लक्ष घालताहेत. पण अस कसं चालेल ? नाइलाज म्हणून जर कोणी एखादी गोष्ट करत असेल तर काहीच साध्य होणार नाही. चल. आपण शेजारी जाऊन बोलू विजया ताईंशी.” वसुंधराबाई म्हणाल्या. त्यांच्याही स्वरात चिंता जाणवत होती.

वर्षांच्या आईला पण विदिशा च्या आईने मांडलेला मुद्दा पटला. वर्षा तिथेच होती. इतका बिनतोड यूक्तीवाद ऐकल्यावर ती पण गोंधळून गेली. काही समजेनास झालय असं म्हणाली. विदिशा ला काय बोलावं हेच समजत नव्हतं. दोघींनाही हे जुळावस वाटत होत पण आई लोकं म्हणताहेत ते पण बरोबर वाटत होत. सगळंच कठीण होऊन बसलं होतं. शेवटी वर्षांचे आणि विदिशाचे बाबा दोघांनाही येत्या रविवारी बोलावून घ्यायचं ठरलं. मग सगळी साधक बाधक चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं ठरवून विदिशा आणि तिची आई घरी गेल्या.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद