आठवण ..
कोरोना काळातली
आईच्या काळात धुणी भांडी करायला अथवा जमीन सारवायला (हो तेव्हा जमीन होती घरात )
बाई लावायची पध्धत नव्हती आणि आर्थिक परिस्थिती पण नव्हती
आई शिक्षिका होती पण सर्व कामे घरात करायची .
कालांतराने बर्याच वर्षा नंतर घरी भांडी घासायला बाई तिने ठेवली होती .
धुणे मात्र तिला कुणाचेच पसंत पडायचे नाही त्यामुळे स्वतःचा धुवायची
काही वर्षापूर्वी ती बाजारात पडली आणि तिचा हात मोडला .
मग नाइलाजाने स्वयंपाकाला बाई ठेवली होती
पण चार दिवस काही ती टिकली नाही
वडिलांना आणि तिला दोघांनाही नाही आवडली ..
मग तिची अवस्था बघुन मीच सकाळी डबा पोचवू लागले
आणि संध्याकाळी परत बँकेतून येताना त्यांचा दोघांचा स्वयंपाक करून येत असे .
माझे लग्न झाले तेव्हा माझ्याकडे मात्र धुणे भांड्याला फारशी पुसायला बाई होती .
आईला फार कौतुक वाटायचे म्हणायची ,” ताई (मला घरी ताई म्हणत )तु नशीबवान आहेस तुझ्याकडे सगळ्या कामाला बाई आहे “
कारण माझ्या लग्नानंतर तिने पण धुण्याला किंवा इतर कामाला बाई लावायचा प्रयत्न केला होता .
पण बायका दांड्या मारायच्या ,वेळेत यायच्या नाहीत ..
म्हणजे आधी पैसा नव्हता म्हणून बायका कामाला ठेवता आल्या नाहीत
आणि नंतर पैसा आला पण बायका टिकेनात .
तिला मात्र मी काम केलेलं अजिबात आवडायचे नाही .
कधी माहेरी गेले तरी पाण्याचा पेला सुद्धा हातात देत असे
वर म्हणायची .”.तुझ्या घरी तुला काम असतेच की
इथे काही नको करू ताई .”.
या लॉक डाऊन काळात आजकाल सर्व महिलांना पुरुषांना घरकाम करावेच लागते
त्याला मी सुद्धा अपवाद नाहीय
आई केव्हाच देवाघरी गेलीय...
पण मला वाटते आई जर आज असती ना तर तिला
तिच्या “ताईला “ धुणे भांड्याची कामे करताना पाहायला अजिबात आवडले नसते .
आठवण येते रोज आईची ....,😪😪