पत्र सुमने 1
प्रिय सोना...
घरकाम हा तुझा अगदी आवडीचा विषय होता
घरकामात तू खूप रमायचा.
अगदी आपण दोघे कार्यरत असताना सुद्धा
स्वयंपाक तयारी तू कायम करून द्यायचा.
मी नोकरीत असताना सकाळी इतर पण गडबडीच्या कामात तुझी मदत कायम असायची
अगदी दुपारी तू दवाखान्यातून घरी आल्यावर सुद्धा
तू माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवायचा
त्यावेळी आपल्या घरी आपला कुत्रा जिमी पण होता
त्याला फिरवणे खायला प्यायला देणे आणि मग आपल्या मुलाला शाळेतून आणायला तू जायचा
दर आठवड्याला फर्निचर पुसणे टॉयलेट बाथरूम साफ करणे ही कामे तुला दुसऱ्या कोणी म्हणजे मी केलेली आवडत नसत
सगळ तुझ्या सिस्टिम प्रमाणे व्हायला लागत असे
शनिवार सकाळी तुझा तो कार्यक्रम असायचा
आज माझा पुसा पूसी चां वार असे तू म्हणायचा
प्रत्येक गोष्टी साठी वेगळे टॉवेल वापरणे
परत ते स्वच्छ धुवून ठेवणे
यातल्या कोणत्याच कामाला तू मला हात लावू देत नव्हतास
फक्त वरचे टॉयलेट बाथरूम मी स्वतः साफ करायचे माझ्याकडे घेतले होते
स्वयंपाक कट्ट्यावर तर दोन चार वेळा तुझा हात फिरत असे
मी जरी जेवणं झाल्यावर कट्टा स्वच्छ धुवून पुसला तरी तूपरत एकदा तरी फडके मारत असायचस
तुला (ocd) अती स्वच्छतेच वेड आहे असे मी तुला चिडवायचे सुद्धा..
बाजारहाट तर कायम तुझ्याकडेच होता
धान्य,फळे, भाजी याची तुला उत्तम पारख होती
कोणती गोष्ट कुठे चांगली मिळेल आणि योग्य किमतीला मिळेल याच्याकडे तुझे बारीक लक्ष असायचे
तुझा आवडता बाजार म्हणजे ऋणमुक्तेश्वर मार्केट
कित्येक वर्षे तिकडून भाजी आणल्याने
तिथला प्रत्येक विक्रेता तुला वैयक्तिक रित्या माहिती होता
तुझ्या गोड बोलण्याने स्वच्छ टापटीप इस्त्रीच्या कपड्या मुळे तुझा रुबाब वेगळाच असे
त्यात तुझ्या पायात कायम बूट असल्याने तुझे एक वेगळेच इम्प्रेशन पडत असे
प्रत्येक विक्रेता तुला तोंड भरून हसून या डॉक्टर साहेब असे बोलावत असे
तुझ्या सोबत कायम दोन चार प्लास्टिक जाळीच्या चेन असलेल्या पिशव्या असत
भाजी वजन केली की तू पिशवी पुढे करून त्यात ती घालायला सांगत असे
व चेन बंद करून स्वतःच्या पिशवीत टाकत असे
अशा प्रत्येक भाजी साठी वेगळ्या पिशव्या तुझ्याकडे असत
खेडेगावच्या विक्रेत्या बायकाना याचे फार अप्रूप असे
या पिशव्या घरी आल्यावर फ्रीज मध्ये ठेवून लागेल ती भाजी काढता येत असे
धान्याच्या बाबतीत सुद्धा नवे जुने तांदुळ जुनी तूर डाळ याची तुला खूप पारख असे
आपल्या लग्नाच्या सुरवातीच्या काळात तर आपण पंचवीस किलो तूर डाळ आणून तिला तेल हळद लावून वाळवून ठेवत असू
नंतर आपण तो प्रकार कमी करून जेवढे लागेल तितकेच आणायला लागलो
तरीदेखील करोना काळात कदाचित धान्याचा तुटवडा भासेल म्हणून तू भरपूर डाळी तांदुळ वगैरे घेऊन ठेवले होतेस
ते आपल्याला जवळ जवळ चार वर्षे पुरले
बाजारहाट करण्यात तू तुझे वडील ज्यांना तात्या म्हणत त्यांच्या प्रमाणेच कुशल होतास
पण दुर्दैवाने तुझे हे कसब पुढील पिढीत गेले नाही