Teen Jhunzaar Suna - 14 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 14

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 14

            तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षाचे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशाचे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीक राव                      शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

भाग १४

भाग १३   वरून पुढे वाचा .................

“बारीकरांव बाबांच्या म्हणण्या नुसार आपल्या मातीत 20 ते 25 टक्के रेती असावी. आपल्याला 70 टक्के रेती हवी माती मध्ये. त्या प्रमाणे मागवा. रिपोर्ट येईलच पण फारसा वेगळा असणार नाहीये. आणि भरपूर जुनं शेणखत मिसळा. जेवढं नांगरून झालं आहे, त्यांचे वाफे तयार करायला घ्या. जमिनी पासून किमान एक फुट वरती उचललेले ठेवा. आणि शेताला एका बाजूला जरा उतार ठेवा. पाणी साचायला नको.  हे सगळं जमेल ना ? जर बाहेरून शेणखत मागवायचं असेल तर ते मागवा. लगेच. वेळ घालवू नका. सरितानी सांगितलं. आपल्याला जवळ जवळ 30 ते 40 टन शेण खत लागणार आहे हे लक्षात असू द्या.” सरितानी सविस्तर सांगितले.

“हो वहिनी साहेब.” – बारीकराव. 

“आपल्याला drip irrigation पण करावं लागणार आहे अर्थात आता त्याची जरूर नाहीये, पण पावसाळा संपल्यावर जरूर पडू शकेल. किती पाइप लागणार आहे त्याचं मोज माप करून ठेवा, बाकी मी बघते.” – सरिता.

“ठीक आहे वहिनी साहेब.” – बारीकराव.

“वहिनी साहेब, मजूरांची तर व्यवस्था झालीय. घमेली, कुदळ आणि फावडी आणावी लागतील. तुम्ही पैसे द्या आता बाजारात जाऊन घेऊन येतो. शेणखत उद्या पासून तो टाकणार आहे. हिशोब तुम्ही बघून घ्या.”

“ठीक आहे. दोन मिनिटं थांब, पैसे घेऊन येते.” – सरिता.

“आणि वहिनी साहेब, रावबाजी ने शेतांतून पाइप न्यायला नकार दिला आहे. तो म्हणतो आहे की त्यांच्या शेताची नासाडी होईल. तुमची व्यवस्था तुम्ही करा म्हणून.” बारीकरावांनी रावबाजीची तक्रार केली.

“ठीक आहे मी बोलते निशांतशी. हे पैसे घे आणि तू निघ आता.” – सरिता.

तो गेल्यावर, सरितानी बाबांना अपडेट दिलं.

“बाबा, आता पाण्याची व्यवस्था कशी करायची ? निशांतशी बोलून काही उपयोग होईल असं वाटतं का ? आपल्याला तर पाणी लागणार आहे.” – सरिता.  

“निशांत यावर काही तोडगा काढेल, असं मला पण वाटत नाहीये. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. असं कर उद्या बाबूराम फोन कर. त्याला बोलावून घे. इथे कुठे बोरिंग केल्यावर पाणी लागेल ते तो सांगेल मग आपण लगेच बोरिंग करून घेऊ.” बाबांनी सल्ला दिला.

“ठीक आहे, मला त्याचा नंबर द्या. करते मी उद्या फोन.” दुसऱ्या दिवशी सरितानी बाबूराम ला बोलावलं. तो शेत भर फिरला आणि त्यांनी तीन जागा सांगितल्या. त्या पैकी एक गोठ्या जवळ होती. तीच त्यांनी फायनल केली. मग बोरिंग वाल्याला फोन करून विचारलं की केंव्हा त्याला वेळ आहे ते.

मग त्या प्रमाणे अमरावतीला जाऊन सबमरसीबल पंप बघून, सरिताने पंपाची ऑर्डर दिली. आता फक्त पायपिंग ची कामे व्हायची होती. आणि ती झाल्यावर drip piping

ची कामे मार्गी लावायची होती. हप्त्या भरात बोरिंग चं पाणी यायला सुरवात झाली. मग नीट आखणी करून पायपिंग ची कामं करायला घेतली. प्रत्येक वाफ्याच्या  सुरवातीला एक थोड्या उंचावर टाकी  बांधायला घेतली. यातूनच drip चं पाणी खेळवायचं होतं.

वाफे बनवण्याचं काम जवळ जवळ ५० टक्के होत आलं होतं. पॉवर टिलर पण येऊन पोचलं होतं. त्यांच्या ट्रेनिंग मध्ये अजून दोन तीन दिवस गेलेत. आणि मग टिलर चं काम सुरू झालं. सरिता तहान भूक विसरून अथक काम करत होती. जवळ जवळ ७ लाखांच्या आसपास खर्च होऊन गेला होता. आता ही योजना यशस्वी व्हायलाच हवी होती.

आता जून महिना उजाडला होता. संध्याकाळी बारीकराव आला. तेंव्हा सरिता आणि बाबा अंगणात थोडा विसावा घेत बसले होते. फार गरम होत होतं म्हणून अंगणातच चहा पीत बसले होते.

“वहिनी साहेब, तुम्ही सांगितलेली सगळी कामं जवळ जवळ पूर्ण होत आलेली आहेत. अजून एक दोन दिवसांत पूर्ण होतील. पुढे काय करायचं आहे ?” – बारीकराव.

“बारीक राव आम्ही त्या बद्दलच बोलत होतो. अजून मान्सून अंदमानात पोचला नाहीये. म्हणजे इथे पोचायला या महिन्यांची अखेर उजाडेल. आपल्याला त्याच्या वर अवलंबून राहता येणार नाही. Drip पाइप ताबडतोब घालायला पाहिजेत. माझं बोलणं झालेलं आहे उद्या त्यांना बोलावून घेते. माती चांगली दमट झाली की लगेच रोवणी करायला घ्या.” सरितानी आपली योजना नीट समजावून सांगितली.

“हो, वहिनी साहेब, एक गोष्ट विचारायची आहे.” – बारीकराव.

“विचारा.” – सरिता.

“आपण जे १५ मजूर  आणले होते, त्यांचं काय करायचं. काम तर झालं आहे आणि टिलर पण आलं आहे.” – बारीकराव.

“बारीकराव, आपण त्यांना ६०० रुपये रोज देत होतो ना ?” – सरिता.

“हो.” – बारीकराव.

“ठीक आहे. आता हिशोब करा त्यांचा आणि जाऊ द्या.” – सरिता.

“ठीक आहे.” – बारीकराव 

दुसऱ्या दिवशी सरितानी  drip पायपिंग करण्या साठी माणूस पाठवायला सांगितलं. आणि

कामाचा आढावा घेण्यासाठी ती फिरत असतांना नवीन घेतलेल्या मजुरांपैकी पांच जणं तिला भेटायला थांबले होते.

“काय म्हणता ?” – सरितानी विचारपूस केली.

“वहिनीसाब, हम चाहते हैं, की अगर आप ही के यहाँ रुक जाते तो अच्छा होता.” परदेशी मजूरांचा म्होरक्या रघुवीर बोलत होता.

“हे बघा आमचं अर्जन्ट काम होतं म्हणून तुम्हाला एवढे पैसे देता आले. पण आता ते काम झालं आहे. कायम एवढी मजूरी देणं शक्य नाहीये.” सरिता म्हणाली.

“वहिनीसाब, हमे यहाँ का माहौल बहुत अच्छा लगा. हम यहाँ आपके पास ही काम करना चाहते हैं.” – रघुवीरनी पुन्हा विनंती केली.  

“ये सुनकर मुझे बहुत अच्छा लगा. लेकिन मेरी अभी शूरवात हैं. इतना पैसा देना मेरे लिए मुमकिन नहीं हैं. फिर भी, जब भी जरूरत पड़ेगी मैं आप लोगोंको बुला लूँगी.” सरितानी आपली अडचण सांगितली.

“वहिनीसाब, हम यहाँ रहना चाहते हैं. आप जो भी तय करेगी, हम तयार हैं.” – रघुवीर.  

सरितानी बारक्या कडे पाहिलं.

“बारीक राव हे कसं शक्य आहे ?” – सरिता.

बारक्या ने मजुरांना सांगितलं की तो आज वहिनी साहेबांशी बोलेल. मग संध्याकाळी  बघू. सर्व आढावा घेतल्यावर, बारक्या आणि सरिता घरी आलेत.

“वहिनी साहेब, मला काय वाटतं, सांगू का ?” बारीकराव म्हणाला. “आपण या माणसांना ठेवून घ्यावं. ही माणसं खूप कष्टाळू आहेत. आणि कामाला वाघ आहेत.”

“पण बारीक राव अजून नुसता खर्चच चालला आहे. उत्पन्न काय होणार आहे त्याचा नुसता अंदाजच आहे, या परिस्थितीत हा बोजा कसा घेणार आपण ?” – सरितानी तिची शंका बोलून दाखवली.

“पण वहिनी साहेब, तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं त्यावरून  सतत पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे, थोडं सुद्धा  आजू बाजूला तण उगवायला नको, प्रत्येक रोप दमट अवस्थेत असायला पाहिजे, परत पाणी मुळीच साचून राहता कामा नये असं तुम्ही सांगितलं आहे. अश्या परिस्थितीत आपल्याला जास्त माणसांची गरज लागणार आहे. आणि पुढचं पीक अश्वगंधा असणार आहे त्यांचे वाफारे तयार करण्यासाठी सुद्धा जास्त माणसं लागतील. आपली पांच आणि या पांच माणसांत ते काम होऊन जाईल. कमी माणसं असल्यावर उशीर होऊ शकतो ते जास्त महागात पडेल.” बारीकरावांनी त्याला काय वाटतं हे बोलून दाखवलं.

“हे सगळं ऐकून बाबा म्हणाले की बारक्या म्हणतो आहे ते बरोबर आहे. सरिता तू एकदा विचार कर.” – बाबा.

“पण बाबा, एवढे पैसे आपण नाही देऊ शकणार.” सरिता म्हणाली.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.