तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपत रावांची बायको
प्रताप श्रीपत रावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपत रावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपत रावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपत रावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांचीआई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
भाग ८
भाग ७ वरून पुढे वाचा .................
“चालेल. उद्या दहा वाजता गाडी ने जर निघालो तर साडे अकरा पर्यन्त पोहोचू. अनायासे शिवाजी रावांची पण गाडी आहेच.” - वासुदेवराव.
“ठीक आहे, या उद्या, वाट पहातो. बाकी उद्या प्रत्यक्ष बोलूच. ठेऊ मग ? ठेवतो.” आणि श्रीपतरावांनी फोन ठेवला. सगळे त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात होते. श्रीपतरावांनी मग डीटेल सांगून सगळ्यांचं समाधान केलं. निशांत, आणि विशाल यांच्या चेहऱ्यावर संध्याकाळी काय चर्चा झाली, हे ऐकल्यावर, अवकळा आली होती, ती जावून आता दोघांचेही चेहरे फुलले होते. ते ही दुसऱ्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते.
दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब आपल्या आपआपल्या कार ने मोर्शी ला पोचले.
विदिशा च्या आई ची सगळ्यांशी ओळख झाली. बऱ्याच गप्पा टप्पा झाल्या. सर्व काही समाधान कारक रित्या चाललं होतं. आता सगळे जण बाहेरच्या व्हरांड्यात खुर्च्या टाकून बसले होते. शिवाजी रावांनी मग साखर पुड्याचा आणि लग्नाचा विषय काढला.
“साखरपूडा उरकून टाकू. लवकरच. त्याला मुहूर्त पाहावा लागत नाही. एखादा चांगला दिवस पाहून बार उडवून देऊ काय ?” शिवाजीराव म्हणाले.
“चालेल.” यमुना बाई बोलल्या. “पुढच्या महिन्यात गुढी पाडवा आहे. चालेल ?”
साखर पुड्याचा दिवस ठरला. लग्नाची बोलणी फारशी काही नव्हतीच.
मग श्रीपत राव म्हणाले की “साखरपुडा होऊन जाऊ दे. लग्न मात्र आपल्याला डिसेंबर मध्ये करावं लागेल. आमची मोठी सून, सरिता, तिला सातवा महिना सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर शिवाय पर्याय नाही.” यालाही सर्वांनी अनुमोदन दिलं.
साखर पुडा झाला. डिसेंबर मध्ये लग्नही झोकात पार पडलं. दोन्ही जोडपी मनालीला जाऊन आली. पुन्हा रुटीन सुरू झालं. नव्या नवलाईचे दिवस. आणि प्रतापच्या मुलाच्या, अश्विनच्या बाल लीलाचा आनंद घेता घेता, पांच वर्ष कशी निघून गेली ते कळलं पण नाही.
नाही म्हणायला, अधून मधून यमुनाबाई विचारायच्या की गुड न्यूज कधी देणार ते. पण वर्षा आणि विदिशा काही बोलायच्या नाहीत. सरितानी सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं पण दोघींनी प्रत्येक वेळेस काही तरी थातुर मातुर सांगून, विषय बदलला. एक दिवस शिवाजीराव सपत्नीक आले होते, त्यांनीच हा विषय काढला बाबांनी लगेच त्यांचं बोलणं उचलून धरलं. पण निशांत आणि विशाल म्हणाले की काय घाई आहे, जरा आम्हाला हौस मौज करू द्या की. आधीच शेतात आमचा सगळा वेळ जातो. पण शिवाजीराव आणि बाबा ऐकायला तयार नव्हते. त्यांनी निक्षून सांगितलं, की “आश्विन एकटाच आहे आणि सर्व त्याचे लाड करतात त्यामुळे तो हट्टी होण्याचा दाट संभव आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर आता तुम्ही या गोष्टीचा गंभीर पणे विचार करायला पाहिजे.” निशांत आणि विशालनी मान तर हलवली पण पुढची पावलं काही टाकली नाहीत. आणि तो विषय तिथेच थांबला.
निशांत आणि विशाल आता शेतीच्या कामात बराच रस घेऊ लागले होते. नोकरीचं भूत त्यांच्या डोक्यावरून आता जवळ जवळ उतरलं होतं. वर्षा आणि विदिशा दोघीही समाधानी होत्या. आश्विन आता चार वर्षांचा झाला होता, आणि पुढच्याच महिन्यात त्याला पाचवं वर्ष लागणार होतं. त्याचा वाढ दिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्याचं ठरत होतं. सर्व त्याचीच तयारी करायच्या मागे लागले होते.
अश्विनच्या ५ व्या वाढदिवसाची तयारी जोरात चालू होती. निशांत, विशालच्या लग्नानंतर श्रीपतरावांच्या घरी कुठलंच मोठं कार्य किंवा समारंभ झाला नव्हता, म्हणून हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं होतं. आणि त्या प्रमाणेच सर्व तयारी चालू होती.
पाहता पाहता वाढदिवसाचा दिवस आला. वाढदिवस दणक्यात साजरा झाला. शेवटची आवारा सावर सुरू झाली आणि अचानक प्रतापच्या छातीत कळा यायला लागल्या. आणि तो उभा च्या उभा कोसळला. शेवटी रेंगाळलेले काही पाहुणे होते, त्यांच्या पैकी एक डॉक्टर होते. त्यांनी लगेच प्रतापची नाडी बघितली. पल्स लागेना तेंव्हा लगेच छाती वर दाब देऊन compression- release करायला सुरवात केली. पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी मान हलवली. प्रतापला तसंच गाडीत घालून हॉस्पिटलला नेलं. पण तिथेही काही करता आलं नाही. सगळंच विस्कटून गेलं.
या घटनेचा श्रीपत रावांना जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या संवेदनाच हरवल्या.
दिवसा मागून दिवस, महिन्या मागून महीने गेले. श्रीपती आणि सरिता यांच्या शिवाय बाकी सर्व सावरले. सगळ्यांचं रुटीन पुन्हा सुरू झालं. एक वर्ष तसेच गेले. निशांत आणि विशाल शेती बघत होते पण आता त्यात नवे काही करायची जिद्द नव्हती. श्रीपत रावांनी शेती मधे लक्ष घालणं सोडून दिलं होतं. त्यांचं कशातच मन रमत नव्हतं.
श्रीपतरावांनी मग एक दिवस दोघा पोरांना म्हंटलं की ते आता त्यांच्या शेतावरच्या घरी राहायला जाणार आहेत. त्यांचं आता या घरात मन रमत नाही. ज्याला यायचं असेल त्यांनी यावं. हे वाक्य यमुनाबाईंना, म्हणजे त्यांच्या बायकोला उद्देशून होतं. त्या लगेचच म्हणाल्या की जिथे श्रीपत राव तिथेच त्या राहतील. त्यांना सोडून कुठेही जाणार नाहीत. सरिताला एकदम जाणवलं की तिची जागा सासू, सासऱ्यांच्या बरोबर आहे. मग ती पण म्हणाली की ती पण आई, बाबां बरोबर शेतांवरच्या घरात राहायला जाईल.
निशांत आणि विशाल ला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी होकार दिला. पण वर्षा आणि विदिशा ला काही त्यांच हे वागणं आवडलं नाही. बरीच वादा वादी झाली पण शेवटी त्यांना नमतं घ्यावंच लागलं.
शेतावरचं घर म्हणजे, अधून मधून विरंगुळा म्हणून हे सगळे लोक राहायला जायचे पण ते चार दोन दिवसांकरिता. नेहमी राहण्यासाठी ज्या सोई सुविधा लागतात त्या काही तिथे नव्हत्या. मग श्रीपत राव आणि सरितानी, आवश्यक त्या सर्व सोई करून घेतल्या. त्याला सुद्धा निशांत आणि विशालने हरकत घेतली. म्हणाले, गावातलं इतकं चांगलं घर असतांना इथे राहायला यायची काय जरूर होती, “वहिनी, या सगळ्या सोई करता करता कीती खर्च होणार आहे, याची कल्पना आहे का ? तुम्हाला कसं कळत नाही ?” निशांतनी नाराजीचा सुर लावला होता. श्रीपत राव त्यांना काहीच बोलले नाहीत. ते सरिताला म्हणाले की तुला जे जे आवश्यक वाटतं ते करून घे. यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नकोस.
हव्या त्या सोई करून झाल्या आणि आता ते घर राहण्या योग्य झालं होतं. होत असलेल्या खर्चाच्या बद्दल निशांत आणि विशाल ने चार चार वेळा नापसंती व्यक्त केली. पण श्रीपत् रावांनी तिकडे दुर्लक्ष केलं.
सरिताच्या ध्यानात आता हळू हळू यायला लागलं होतं की निशांत आणि विशाल पैशांचा काही तरी घोटाळा करताहेत म्हणून. पण तिला हिशोबाची काही माहिती नव्हती म्हणून बोलत नव्हती. पण लग्न होऊन आल्या नंतर आज पर्यन्त कोणीच खर्चा बद्दल कधीही कुर कुर केली नव्हती. सरिता विचारात पडली की आर्थिक स्थिती, जे प्रताप सांगायचा त्यावरून तरी उत्तमच होती. मग अचानक असं काय झालं की हे दोघं एवढी कटकट करताहेत. तिने या बाबतीत आईंशी बोलायचं ठरवलं.
“मला ही कळतंय सर्व. ही दोघं पोरं कुठल्या दिशेने चालली आहेत त्याचा अंदाज आम्हाला दोघांना आला आहे. आता जर काही करायचं असेल तर ते तुझे सासरेच करू शकतात पण ते सध्या तरी काहीच बोलत नाहीयेत. आपण काय करणार ?” यमुनाबाई म्हणाल्या.
सरिता विचारात गढून गेली. पुढे काहीच बोलली नाही. असेच दिवस जात होते. धान्य घरात भरून ठेवलं होतं. भाजी आणि दूध शेतावरून येत होतं. रोजच्या व्यवहाराची तशी काही चिंता नव्हती. बाळ लहान होतं अजून त्याला शाळेत घातलं नव्हतं. पण ती सुरू झाल्यावर गाडीची आवश्यकता पडणार होती. सध्या दोन्ही गाड्या गावातल्या घरीच होत्या
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद