थर्ड डीग्री
-------------- मच्छिन्द्र माळी. छ. संभाजीनगर.
थर्ड डिग्री
----------------- मच्छिन्द्र माळी, छ.संभाजीनगर
मी पोलीस खात्यात स्वतः पस्तीस वर्ष नोकरी केली असल्यामुळे " थ र्ड डि ग्री " हा काय प्रकार आहे? हें मला ज्ञात आहे. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनात या प्रकारविषयी विलक्षण संकल्पना निर्माण झालेला आहे. पोलीस विनाकारण मारझोड करतात अशी भीती मानवी मनात निर्माण झाली आहे. थर्ड डिग्री चा प्रयोग हा शक्यतो गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावरच केला जातो. यात पोलिसांचा वयक्तिक काही स्वार्थ नसतो. जन हितार्थ हें केले जाते हीं बाब सर्वांनी आवर्जून लक्ष्यात घ्यावी.या अनुभव लेखाद्वारे माणसाच्या मनातील भीती व गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी आशा आहे. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे भरभक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांचे असते. या पुराव्याच्या आधारे न्यायालयात आरोपीनेच गुन्हा केला आहे हे सिद्ध व्हावे लागते. आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयास असतो.
कोणताही निर्ढावलेला आरोपी हसतखेळत आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाही. केलेल्या गुन्ह्याचा तपशील सांगत नाही. गुन्ह्यासाठी वापरलेली शस्त्रे, हत्यारे स्वतःहून पोलिसांना काढून देत नाही किंवा चोरी-दरोड्याचा मुद्देमाल काढून देत नाही.
त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे आणि भरभक्कम पुरावे गोळा करणे हे आव्हानात्मक काम असते त्यासाठी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. सायबर क्राईम सारख्या नव्याने येणाऱ्या विषयांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.
आता काळाच्या ओघात समाज बदलत आहे कायदा आणि अधिकार यांची जाण सर्वसामान्य माणसाला झाली असली तरी गुन्हेगार ही याच समाजातील एक घटक असतो हे ही विसरता येणार नाही.
आपला देश १५० वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता.त्या काळातील सुव्यवस्था राखणारे अस्तित्वात असलेले दलही त्यांच्या अखत्यारीत होते. ते सांगतील त्याप्रमाणे कर्तव्य बजावत असत.इंग्रजानी दहशत निर्मिती साठी या दलाचा पाहिजे तसा वापर करून घेतला. त्या काळातील दलाच्या हस्ते लोकांवर हवे तसे अत्याचार करवून घेतले.मनुष्य स्वभाव मतलबी असतो हे ही सर्वांना ज्ञात आहेच. ही अत्याचार गाथा व पोलीसांचा दरारा व रुबाब लोकांच्या विस्मरणात जात नाहीत. व काही लोकांना ऐकीव माहितीवर गैरसमज घेण्यात मोठेपणा वाटतो. पोलीसांच्या उत्कृष्ट कामगिरी लोक लक्ष्यात घेत नाही मात्र पोलीसांच्या चुकांवर मात्र ध्यान ठेवून प्रभावी टिकास्त्र सोडण्यात पटाईत असतात.
सर्वांचं जीवन सर्वांना सुरळीत शांततेत व सुखात जगता यावे म्हणून तर कायदा व निती नियम बनविले आहेत ते तोडून धाब्यावर बसविण्यासाठी नव्हे. कायदा आणि नियम पालन करणे हेही सर्वांवर बंधनकारक आहे ना ? मग त्याचे पालन करुन घेण्याची जबाबदारी कायद्याने पोलीसावर टाकण्यात आलेली आहे हे सुजान नागरीकांना माहित नाही काय? लोकशाही शासन व्यवस्थेत नागरीकांना जसे अधिकार दिले आहेत तसे कर्तव्य करणे व नियम पाळणेही बंधनकारक केले आहे ही गोष्ट स्वार्थी लोक का विसरतात. चुकीचे वर्तन करणाऱ्यास पोलीस सौजन्याने समजावून सांगितले तरीही ऐकत नसेल तर खडसावून सांगितले तर तुमचा अहंकार दुखावला जातो, अब्रू जाते व एखादा फटका बसला तर तुमच्यावर अन्याय, अत्याचार होतो. ते निवारण होण्यासाठी मानवी हक्क आयोग वगैरे संघटना कार्यरत आहेत पण संघटनांनी एखाद्या घटनेची सत्यता पडताळूनच अत्याचार ग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा. उगाच खर्या गुन्हेगारांना (अपराध लहान अथवा मोठा असे काही नसते. चूक ही चुकच असते.) उठसूठ पाठिंबा देऊ नये असे माझे मत आहे.
एक नेहमी लक्षात असू द्या की सर्वच पोलीस काही तुमचे दुष्मन नाही . कर नाही त्याला डर नाही या उक्तीप्रमाणे "थर्ड डिग्री" या सर्वसामान्यांनी बाऊ करून गैरसमज करून घेऊ व सर्वांना कायदा व नियम पालन करुन स़माजिक धार्मिक व सर्व प्रकारच्या सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे ही विनंती
----0 🙏 🙏 0----