युगे अठ्ठावीस........!
आकाशाला आकार नाही. आकाशाचे ज्ञान हेच सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्वज्ञान स्पष्टीकरण करणारा हा समर्थ रामदासांचा श्लोक ! फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचलें मीपणें तें कळेना । तया येकरुपासि दुजें न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहें ।
जे जे म्हणून आकारात जन्माला येते ते ते कधी ना कधी तरी फुटते, तुटते जागेवरुन ढळते. परमेश्वराची माणसाने निर्माण केलेली मूर्तीसुध्दा कधी न कधी तरी नष्ट होते. परंतु जे जे निराकारात आहे ते कधी फुटत नाही की तुटत नाही. आकाराला छिन्नता आहे. परंतु निराकाराला मात्र छिन्नता नाही. या पंचमहाभूतांतून आकाराची दुनिया साकार झाली म्हणून पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या पंचमहाभूतांमध्ये आकारसृष्टी कधी ना कधी विलीन ही होतेच हे निश्चित आहे. परंतु संत विचारात मात्र समर्थ विचाराच्या अगदी उलट तत्वज्ञान सांगितलं आहे. पंढरपूरचे उघडे परब्रम्ह संत व विठ्ठल भक्त युगे युगे पाहत आले व पुढेही पाहत राहतील. मग साहजिकच 'समर्थ विचार सत्य कीं अन्य संत विचार सत्य? असा प्रश्न पडतो. पांडुरंगच्या आरतीमध्ये.... युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसें दिव्य शोभा | या ओळीवरून आकारही युगे न युगे टिकून असतो या पुष्टी मिळते. संतांचे दोन्हीही विचार तात्विक दृष्टीने बरोबरच आहेत यात शंका नाहीत्यासाठी केवळ डोळे असून चालत नाही तर दिव्य दृष्टी असावी लागते. विनाशाकडे केवळ आकाराच जातो हे एकदा का लक्षात आले की, निराकारातील परमेश्वर आपल्याला जाणवू लागतो. सदवस्तू ही या आकाराच्या पलीकडे उभी आहे. तिला दृश्याची सीमा नाही. पंचमहाभूतं एकत्र आली एकत्रित आल्यावर आकार तयार होतो. परंतु पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना एकदा तुम्ही समजून घ्या. सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्वज्ञान कुठले तर आकाशाचे ज्ञान होणे. आकाश सर्व पृथ्वीला व्यापून पुन्हा उरले आहे. त्या आकाशाचा वेध घ्या. तो घननीळ श्रीराम त्या आकाशाला व्यापून आहे. या निराकाराला फुटणे ठाऊक नाही; तुटणे ठाऊक नाही, चलनाची गती नाही आणि ते कुठूनही ढळत नाही. या तारांगणाला कोण तोलून धरतो हे एकदा का कळले की परमेश्वरी अस्तित्त्वाची जाणीव होते. प्रमेश्वरासारखे दुसरे काहीही या जगात नाही. बा माझ्या मना, तू या गोष्टींचा एकदा का शोध घेतलास की अनंताचा शोध तुला लागेल. आणि हा आनंद केवळ संतसहवासात आहे. परमेश्वराला जर तुला आकारातच पाहायचे असेल तर तू संतांचं दर्शन घे. पण निरकाराचा ध्यास सोडू नकोस.
🙏
अढळ निष्ठा.
नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ, जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्यनियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही; आणि देह हा जड, अशाश्वत असल्यामुळे देहाने, नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे, आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे, असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नानसंध्यादि नित्यकर्मे वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे.
शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे. नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे, मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी, परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात, आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय, काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून, मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते, आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना, तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते, असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे.
-----------------------------------
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर. मो. नं. 8830068030.