थंड झाल्यार खावचा भाग ६
तिने दोन दिवसानी ही गोष्ट ग्यानुच्या कानावर घातली नी दुसाऱ्याच दिवशी हिंदमाता सिनेमा जवळ च्या गल्लीतला भट गाठून ग्यानूने त्यांच लग्न लावून दिलं. मात्र ठुमरी बाळंत होईतो ही गोष्ट गुपित ठेवायची असं त्यानी ठरवलं. त्याच दरम्याने पारशी सोराबजीला अर्धांगाचा झटका आला नी त्याचा डावा भाग लुळा पडला. त्याला जे जे मध्ये अॅडमिट केलं.त्याची बहिण मेहरू त्याच्याही पेक्षा म्हातारी होती. ती वाळकेश्वरला रहायची.भगवानने तिला वर्दी दिली.
अलिकडे सोराबजीने धंद्याचा व्याप कमीच करीत आणलेला होता. पेढीवर फक्त दोन कारागीर कॉण्ट्रॅक्ट बेसवर काम करायचे. त्याना विचारून मेहरूने त्यांचा आर्थिक व्यवहार भागवला. या नंतर दहा ते तीन या वेळेत पेढी उघडी ठेवून पूर्वी झालेल्या वायद्या प्रमाणे कोणी पार्टी आली तरआपल्याला कळव असं सांगून भगवानवर जबाबदारी सोपवून ती निघून गेली. मेहरू गेली आणि त्याने पेढीच्या आंतर्भागाची तपासणी सुरु केली. सोरबजीच्या ठेवी कुठेअसतात याची पूर्णमाहिती त्याला होती. स्टोअर रूममध्ये दोन मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये जोखमीचा ऐवज ठेवलेला असे. त्याने त्या खोलल्या. वरचेगॅल्व्हनाईज पत्र्याचे तुकडे बाजुला केल्यावर किंतानाच्या रकट्यात गुंडाळलेल्या लुकटीत खाकी पेपरमध्ये बांधलेल्या पुड्यांमध्ये शंभरनंबरी शुद्ध सोन्याचे एक तोळ्याचे पत्रे मध्ये कापुन दुभाग केलेले तुकडे होते. अशा चौदा लुकट्या मिळाल्या. एकेका लुकटीचं वजन सहज रत्तलभर जोखलं असतं. दुसऱ्या पेटीत वरच्याबाजुला जुने लोखंडी खिळे नटबोल्ट नी त्या खाली रद्दी पेपरात चलनी नोटांची पुडकी मिळाली. एका कोपऱ्यात तेलाची चार पिंप रचून ठेवलेली दिसली त्यातहीअसंच वरच्या बाजूचं गंजलेलं भंगारउपसल्यावर तळात बुचडा छाप चांदीच्या रुपयांच्या लुकट्या, उंची खडे असा ऐवज गावला.
सोराबजीचं वय नी अवस्था पाहता तो यातून ऊठत नाही हे भगवानाने पुरतं ओळखलेलं. या व्यवहारात झूट पण नीट राहून कसा कार्यभाग साधता येईल याची पध्दतशीर योजना त्याने आखली. इथला ऐवजलांबवून अन्यत्र हालवण्या साठी कांदिवलीत डोंगरी भागात झोपडपट्ट्यांमध्ये देवगड मालवण भागातले लोक रहायचे . तिथे गणपतीत तो गाववाल्यांकडे जाऊन आलेला होता. तोत्याना भेटला . आपण नेपाळी बाईशी दुसरं लग्न केलेलं असून तिला चार सहा महिने इथे आणून ठेवायची आहे, असं कारण सांगून चार रूम असलेली बरीशी जागा भाड्याने घेतली. पत्र्याचे बिस्किटाचे दहा बारा डबे घेवून त्यात बेतवार वजनाचा ऐवज भरून कडेला किंतनाच्या फाळ्या चोंदून झाकणं सहज उघडणार नाहीत अशी ठोकून घट्ट केली. सोराबजीच्याच गाडीतुन शीख ड्रायव्हर घेवून दोन तीन खेपांमध्ये सगळा ऐवज डोंगरीला घेतलेल्या खोलीत लांबवला. त्या भागात गावातले काही झिलगे लहान खोलीत चौघे पाचजण मिळून रहात. त्यांचाशोध घेवून पुजारी वाडीतल्या पांडू नी येसू ह्याना एका वर्षाच्या बोलीवर मोफत रहायला सांगितलं. मात्र त्रयस्थाला सांगताना भगवानाची दुसरी बायको येई पर्यंत महिनाभर राहणार असं पढवलं . आपलं सामान एका खोलीत टाकून टाळं लावलं.
डायरीत व्यवहाराच्या नोंदी असायच्या त्या प्रमाणे वसूलीची कामं करूनत्या रक्कमा मेहरूकडे जमा केल्या. महिनाभरात जवळ बरेचसे व्यवहार जवळ येत चालले. या दरम्यानच्या काळात हाय खावून शेठाणी पण एवढी खंगत चालली की तिला उठायचंही त्राण राहिलं नाही.आता ती फार काळ जगत नाही हे ओळखून भगवानाने बैजंताला बजावून ठेवलेकि,शेठाणीच काही बरवाईट झालच तरी मी येईपर्यंत ही बातमी फोडायची नाही,तिची संपूर्ण देखभाल बैजंता एकटीच करीत असल्यामुळे तिच्या मरणाची खबर सर्वात आधी तिलाच लागली असती. शेठाणी मेलीहे कळलं की लगेच लोकांची गर्दी होईल आणि आपल्याला वाहत्या गंगेत हात धुवून घेता येणार नाहीत.हे त्याच्या सांगण्यातलं इंगित तिने बरोबर ओळखलं. शेठाणी बैजंतीवर इतकी खूश झाली की तिने मेहरूला भेटायला आली असताना आपल्या माघारी एक डाग बैजंतीला द्यायला सांगितला. त्या नंतर जेमतेम आठवडा भरात संध्याकाळी शेठाणीने डोळे मिटले. संध्याकाळी पाच वाजताकामवाली जेवण रांधून निघताना शेठाणीला हाक मारून बाहेर पडली नी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे बैजंतीला वर्दी देवून ती निघून गेली. बैजंती रूमबंद करून बंगल्यात गेली. तिचा पायरव लागल्यावर शेठाणीची काही हालचाल दिसेना म्हणून तिने बघितलं शेठाणी गारझालेली होती. गेला महिनाभर ती आपलीठेव उशाशी घेवून असे. अधून मधून कामवाल्या नसल्याची संधी मिळाली की शालीत गुंडाळलेल्या पिशवीत नोटांचीचळत नी दुसऱ्यॎ पिशवीत तिचे दागिने होते. ते अर्धवट बाहेर ओढून त्यावर तीहात फिरवीत राही. शेठाणीच्या छातीला कानलावून तिच्या काळजाची धडधड बंद पडल्याची खात्री करून घेतल्यावर बैजंताने उशागतीच्या दोन्ही पिशव्यातला माल भसाभसा काढून घेतला नी खोलीचं दार बंद करून ती बाहेर पडली. ग्यानु क्वार्टरमध्ये नव्हता.
कपडे ठेवायला तेलाचं पिप वापरात होतं. त्यातल्या वरच्या घड्या बाजूला करूनऐवज आत ठेवला नी ती रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. तासाभरात भगवान आला. मालकिण गेल्याची बातमी कळल्यावर ग्यानू जेवण करून बाहेर जाई पर्यंत काही न बोलायची सुचना त्याने दिली नी तो बंगल्याकडे निघाला.लॉक खोलून आत गेल्यावर दार बंद करून नेहेमीसारखे दिवे लावून तो शेठाणीच्या खोलीत गेला . तिच्या उशागती काहीही नव्हतं..... तो काय समजायचं ते समजला . तिच्या डोक्याजवळचा किल्ल्यांचा जुडगा घेवून त्याने लोखंडी लॉकर खोलला . आत खचाखच नोटांची बंडलं भरलेली होती. मिळालं तरी सगळंच तळासकट मुर्गळून खाल्लेलं पचत नाहीअशा साध्या धोरणाने तो वागायचा. त्याने थोडीशी नोटांची बंडलं शिल्लक ठेवून बाकीची बाहेर काढली. तळच्या खणात दहा तोळ्याच्या सोन्याच्या लगडीं पैकी थोड्या शिल्लक ठेवून बाकीच्या काढून घेतल्या नी लॉकर बंद केला. मग चाव्यांचा जुडगा पूर्ववत शेठाणीच्या उशाशी ठेवला. सगळा माल पोत्यात भरून दिवाणखान्यात कोचामागे ठेवला नी भगवान बंगला बंद करून आपल्या क्वार्टरमध्ये गेला . ग्यानुचं जेवण झालं नी तो पहारा द्यायला बाहेर पडला. (क्रमश:)