" नामाचा अनुभव आणि भवसागर "
--------------------------------------------
नामाचा अनुभव कोणता ? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसर्या कशात पाहू नये; म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुध्दी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरूवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्याआत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल.भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे ? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादि संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत; जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्यावाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळयाओवळयाचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे.उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळया देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल. नाम घ्यायला स्वत:चीच आडकाठी असते.ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.
भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच प्रमुख साधन आहे. नाम हे स्वत:सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो; उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो; किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सदगुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळया खातो आहे; समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.देह केव्हा जाईल याचा नेम नाही मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची खात्री आहे का ? आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या.सोन्यामोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते; मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे.
जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरूरीचे आहेतसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे.
--------------- 🙏 -------------
मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर.