७
ऑपरेशन सिंदूर झालं होतं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं नष्ट केल्या गेली होती. सपना व रुकसार चर्चेत आली होती. तसंच रुकसारच्या चर्चेत आल्यानं अख्ख्या मुस्लीम बिरादरीला प्रोत्साहन मिळालं होतं की ते भारतवासी आहेत व ते भारतात राहात असल्यानं त्यांनी पाकिस्तानचं गुणगान करु नये. भारताला मदत करावी.
भारतात राहणारा मुस्लीम समुदाय आज भारताचे गोडवे गात होता. परंतु पाकला ते बरोबर वाटत नव्हतं. पाकचे इरादे पाक नव्हते. त्यामुळंच तो भारताचा बदला घेण्यासाठी भारतावर गोलाबारी करीत होता. त्यातच त्याला काही देश हवाही देत होते. ते त्याला मिसाईल व ड्रोन पुरवून मदत करीत होते. रुकसारला आठवत होतं ते बालपण. ज्या बालपणात ती पाकिस्तानात राहात होती.
रुकसार पाकिस्तानात पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहात होती. तसं तिचं गाव एक शहरच होतं. परंतु ते खेडंच वाटायचं की ज्या शहरात तिचा जन्म झाला होता. ते शहर की ज्या शहरात कोणत्याच सुविधा नव्हत्या. प्यायला बरोबर पाणी मिळत नव्हतं.
रुकसार लहान असतांनाच आपल्या वडिलांसोबत भारतात आली. तिचं शिक्षणही भारतातच झालं आणि ती लहानाची मोठीही भारतातच झाली. तिचे वडील भारतात आल्यावर सैन्यात सामील झाले होते.
रुकसार पाच बहिणी होत्या. त्यात मुलींना शिक्षणाची संधी नसल्यानं परिवारानं रुकसारला जास्त शिकवलं नाही. ती पाचवी वर्ग शिकली व वयात यायच्या पुर्वीच तिचा विवाह लावून दिला. फरक एवढाच की तिचा विवाह शेजारच्याच मोहम्मद अब्दुलशी लावून दिला. जो भारतातच राहात होता. त्यानंच तिला शिकवलं व सैनिकी शिक्षणही दिलं.
रुकसारला सैनिक शिक्षणाची आवड होती. त्याचं कारण होतं तिचे वडील. तिचे वडील सैन्यात असल्यानं तिला सैन्याचं जीवन आवडायचं. ते सीमारेषेवरील बंधुकीचे आवाज आवडायचे. ज्यात आवाजाच्या तालावर तिचे बाबा नाचायचे. त्यांनाही आवडायचं ते सैन्याचं जीवन.
रुकसार जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहायची. तेव्हा ती परेशान असायची. सतत आतंकवाद्यांसोबत भारताचा गोळीबार चालायचा. ते तिथंच लपून बसायचे. त्यातच कधीकधी सामान्य लोकांनाही ओलीस ठेवायचे. आज ती भारतात आल्यानं त्या गोळीबारातून तिला राहत मिळाली होती.
ती सैनिकांची ड्युटी. त्या ड्युटीवरुन त्यांना सुट्टी मिळायची नाही. कारण ते अतिशय जबाबदारीचं पद होतं. त्यातच ते जेव्हा एखाद्यावेळेस घरी येत. तेव्हा फारच आनंद होत असे. घरात दिवाळी वा दसऱ्याची अनुभूती येत असे. परंतु ते जेव्हा घरातून निघून जात असत. तेव्हा मात्र घरात काळोख दिसून येई. वाटत असे की ते आता कधीच परत येणार नाहीत. तसंच घडायचं नाही. कारण युद्ध सध्या कमी होत असत.
युद्धाची भीती कमी होती. मात्र आतंकवाद्यांची भीती जास्त होती. आतंकवादी काश्मिरला येत व ते तेथील लोकांना ओलीस ठेवत. ज्यातून लोकं त्यांना लपायला स्वतः जागा देत असत. ते त्यांना स्वतंत्र्य अशी खोली निर्माण करुन देत. ज्यात कोणालाही शंका येत नसे. बदल्यात हे आतंकवादी पैसे देत. पैसा जेवढा हवा तेवढा देत असत. अन् समजा एखाद्या सैनिक अधिकाऱ्यांना त्यांची माहिती दिल्यास जीव जाण्याचीही भीती होती. त्यामुळं घरची मंडळी धाकानं का होईना, आतंकवाद्यांना लपवून ठेवत असत. त्याची कल्पनाही कोणाला देत नसत. हेच आतंकवादी रात्रीला निघत व भारतात कुठे कसा गोळीबार करायचा. कुठे कसा बॉम्बस्फोट घडवून आणायचा. याची सल्लामसलत करत असत.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दर सहामाहीला बॉम्बस्फोट व्हायचे. ज्यात लाखो निरपराध लोकं मारले जात असत. त्याचं रुकसारच्या परिवाराला दुःख होत असे. ते दुःख बालपणापासून रुकसार पाहात आली होती. अशातच काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. तो बॉम्बस्फोट महत्वाचा ठरला होता. ज्यात बरेचसे निरागस जीव मारल्या गेले होते. तिही घटना लाजीरवाणीच होती. त्यावर चर्चा झाली व सरकारनं ठरवलं होतं. आपण आतंकवाद्यांचा बिमोड करायचा. ज्या काश्मीरमध्ये आतंकवादी लपतात ना. त्याच काश्मीरमध्ये घरात शिरायचं. आतंकवाद्यांना शोधून काढायचं.
तो सरकारचा विचार. त्यावर संसदेत सल्लामसलत झाली. संरक्षण मंत्र्यासोबत गुप्त चर्चा झाली व ठरलं.
आतंकवाद्यांना शोधून काढायचं ठरलं. शेवटी मोहिम आखण्यात आली व काश्मिरमध्ये आतंकवादी शोधणे सुरु झाले होते. पुढं कारगीलचं युद्ध झालं होतं, तेही घुसखोरीवरुनच.
कारगीलचं युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्यात उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध होय. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजुबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पुर्वीच्या भारत - पाकिस्तान युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.
सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणे ताब्यात घेतल्याचे भारताच्या लक्षात आले व या आतंकवाद्यांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरु झाले. ही ठिकाणे कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठिकाणे परत मिळवण्यात यश मिळाले. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगील पुरतेच मर्यादित ठेवले. म्हणूनच भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तशीच पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली.
कारगील शहर हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. हिमालयाच्या इतर भागाप्रमाणे कारगील मध्येही थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दिर्घ व कडक असतो. बरेचवेळा येथील तापमान -४० °C पर्यंतही उतरत असते.
कारगील हे राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर वसलेले आहे. कारगीलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता होय. आतंकवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली.
भारतीय लष्कर याच भागात नेहमीच कार्यरत असायचे व लष्कराच्या अनेक चौक्याही याच भागात कार्यरत असायच्या. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर होत्या. केवळ कारगीलच नाही तर आग्नेयेकडील द्रास व नैर्ऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली होती.
कारगील, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करुन ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापुर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवाला राहण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता. मात्र १९९९ साली भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापुर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगीलचे युद्ध भडकण्याची ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज होती. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी होती. इ.स. १९७१ ला पाकिस्तानसोबत असेच युद्ध झाले होते. जे मोठेच युद्ध होते. त्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नव्हते. मात्र सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत होत्या. सियाचीन हिमनदीवर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालच्रा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजूकडील मंडळी सातत्याने प्रयत्नशील असत. त्यातच इ.स. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला होता. तसेच इ.स. १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने ठाण मांडले होते. त्यामुळं भारताला काश्मीरमध्ये कायमस्वरुपी सैन्य तैनात करावे लागले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करुन पाठवले जात असे. हे सर्व पाकिस्तान करत असे. त्यांनी काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले. विचारणा केली असता पाकिस्तान स्पष्ट नकार देत असे. कारगीलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला.
भारत कोणत्याही बाबतीत पाकिस्तानच्या पुढे जावू नये. यासाठी पाकिस्तानचे पुर्वीपासूनच बरेच प्रयत्न होते. इ.स. १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अणूचाचणी केली. त्यावेळेस पाकिस्तानने अणू चाचण्या केल्यानंतर जागतिक संबंध चांगलेच ताणले. भारत असाच पुढे वाढू नये म्हणून इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. ते घुसखोर नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करुन राष्ट्रीय महामार्ग एकच्या जवळ यायचे. असे केले की महामार्गावर कायमस्वरुपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरुन काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल. असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल. असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी युक्ती वापरली होती. तीच युक्ती पाकिस्ताननेही यावेळेस वापरली होती.
त्या चौक्या दोन्ही बाजूच्या नियंत्रण रेषेवर होत्या. हिवाळ्यात दोन्ही बाजूचे सैन्य तेथे थंडी जास्त असते म्हणून चौक्या खाली करीत असत. ते कडक हिवाळ्याचे दिवस असायचे. कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही नेहमी पाळत असत. हिवाळा संपला की पाकिस्तानी लष्कर आपल्या चौक्यात परतायचे व भारतीय सैनिक आपल्या चौक्यात परतायचे. हे सत्र सन १९९८ पर्यंत बरोबर चाललं. परंतु १९९८ मध्ये पोखरण या ठिकाणी भारतानं अणूचाचण्या करताच पाकिस्तानचे धाबे दणाणले व त्यांच्या मनात कुटनीतीचं वादळ सुरु झालं. तसं पाहिल्यास पाकिस्तान आधीपासूनच भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता.
त्या भारतीय चौक्या होत्या. हिवाळ्यात थंडी जास्त पडायची. त्यामुळं भारतीय लष्कर तेथे हिवाळ्यातील चार महिने राहात नसे व पाकिस्तानीही लष्कर तेथे राहात नसे व हवामान पुन्हा ठीक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असत. मात्र फेब्रुवारी इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सुत्रबद्ध पद्धतीने व कोणालाही थांगपत्ता लागू न देता पार पाडली. त्यातच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्यालाही या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही. त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. जेव्हा हेच भारतीय लष्कर हिवाळा संपताच आपल्या चौक्यांचा ताबा घेण्यासाठी परतलं. तेव्हा त्यांना सत्य काय ते आढळून आलं.
स्पेशल सर्व्हिसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या चार ते सात बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतल्या होत्या. साधारणपणे अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणाऱ्या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्या. त्यातच पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले. सुरुवातीला अनेक कारणांमुळे कारगीलच्या घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई केली. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी पडताळणीसाठी एक तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरुपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे भारतीय लष्कराला वाटले. परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. त्यातच घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच स्वरुपाचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी ही घटना मोठ्या कारवाईचाच भाग आहे असे लक्षात यायला वेळ लागला नाही. अशा रितीने कारगील येथे युद्ध सुरु करण्यात आले. कारण भारतीयांना आपल्या लष्कराच्या चौक्या ताब्यात घ्यायच्या होत्या.
पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता. भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही सुरु केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित करण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगीलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. यात पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते. त्यानंतर भारतीय वायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागर' सुरु झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती. भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरुन लक्ष्य करण्यात आले. या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबली. अशाप्रकारे भारतीय लष्कराने कारगीलवर विजय प्राप्त केला. कारगीलचे युद्ध सुरु झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले. भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा केला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व दिले गेले. असे केल्याने हा महामार्ग सुकर होणार होता. घुसखोरांनी आधुनीक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षीत केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलीत मशीनगन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच चौक्यांच्या सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरूंगांनी सुरक्षीत केला होता. यातील ८,००० सुरूंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहीत विमानांमधून पाहणीदेखील केली होती.
भारतातर्फे आधी महामार्गालगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रीत करण्यात आला. या चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पाडली व महामार्गही सुरक्षीत होत गेला. जसा महामार्ग सुरक्षीत झाला. तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सुत्रबद्ध रितीने होत गेले.
महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तुर्तूक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या.
४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा निशाणबिंदू होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. निशाणबिंदू ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत, तोफखान्याचा भडिमार चालूच होता. पाकिस्तानी सैन्याने पाडलेल्या भारतीय विमानाचे अवशेष
भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला. तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले.
ती तोलोलिंगची लढाई. त्या तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पुर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशिरा नियंत्रण मिळवले गेले. तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई ठरली. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल हा भाग भारताच्या ताब्यात आला. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्युमुखी पडले. या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन युक्त्यांचा चांगलाच वापर केल्या गेला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करुन शत्रूवर अनपेक्षीत ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला, त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत. या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे. त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्धही नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाली रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे युद्ध करणे भारताला शक्य होते. तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्याही मिळवणे शक्य होते. परंतु यासाठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. मात्र तसे केल्यास पुर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. असे केल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.
भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात घेतल्या. युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले तर २७०० पाकिस्तानी सैनिक मरण पावले.
कारगीलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धाच्या निमित्ताने दिसली. मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे लाभदायक ठरणार होते. म्हणून सैनिक कारवाई सुरु करण्यास विलंब लावला. असा आरोप युद्ध पार पडल्यावर विरोधी पक्षाने केला. या आरोपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले. निवडणूकपूर्व आघाडीने संपूर्ण बहुमत मिळवले. असे हे इ.स. १९८४ नंतर प्रथमच घडले. कारगीलचे युद्ध भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्धक्षेत्रात जाऊन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरिकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या कित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात अफाट प्रतिसाद मिळाला. या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले. संपुर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंचीवर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली. कारगीलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले. पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व लष्कर यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सुत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहिती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना व्यवस्थीत सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे नवाज शरीफ यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या काळात नवाज शरीफ यांना त्यांच्या अगदी जुना लष्करी मित्र असलेल्या अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच हे सैनिक आमचे नाहीत हा पवित्रा घेतला. परंतु सत्य काय ते लवकर लक्षात यायला वेळ लागला नाही.
***************************************