सफर सिंधुदुर्गाची ४देवाचं गाव - देवगड (२८ एप्रिल २०२५)तसे आम्ही फिरस्ते. पावलांना ओढ...रस्ते तुडवण्याची...नजरेला भूक निसर्ग न्याहळण्याची. आम्हाला मग वेळ....काळ याच बंधन नसतं.झांट्ये...गोडकर...,केरकर व मी असे चारजण फिरायला बाहेर पडलो.नेहमीप्रमाणे ठिकाण ठरलेलं नव्हते.गाडीच सुकाणू झांट्येच्या हाती होतं.गाडी कुडाळ उद्यमनगरातून... पाट येथे उजव्या बाजूला वळली.पाट तलाव में महिन्यातही पाणी व पाणवनस्पतींनी भरलेला होता.काही बगळे पाण्यात ध्यानस्थ उभे होते. हिवाळ्यात येथे विविध स्थलांतरीत पक्षी येतात.आम्ही सागरी महामार्गावरुन परूळे व मधली गाव पार करत चिपी विमानतळाजवळ पोहोचलो.बाहेर सूर्य आग ओकत होता.मधला रस्ता हा दोन्ही बाजूंच्या माड पोफळीच्या भागांनी भरलेला होता.पण चिपीच्या अलिकडून कातळ सुरु झालं. हिरवाई कमी झाली.उदास सुना व उजाड असा विमानतळाचा परीसर बघून मन खिन्न झाले.कोकणच्या भूमीला लागलेला शाप आजही कोकणाला विकासा पासून वंचित ठेवतोय हेच खरे. विमानतळाला वळसा घालून आम्ही मालवणात सरळ न जाता ( मालवणाचा बाजाराचा दिवस होता.) डावीकडच्या आतल्या छोट्या रस्त्याने गेलो.वाटेत झांट्येच काजू युनिट पाहिलं.इथून परस्पर आम्ही मालवण बाजारपेठेत पोहचलो. बाजारातला रस्ता मुळात अरूंद त्यात बाजाराचा दिवस..त्यात पर्यटकांच्या गाड्या.. त्यामुळे बरीच कसरत करावी लागली. बॅ.नाथ पै सेवांगणाचा निसर्गसुंदर परीसर पार करत सर्जेकोट किनार्यावर पोहोचलो.समोर छत्रपतींचा भव्य पुतळा दिसला.समोर अथांग अरबी समुद्र...भणाणता वारा....पाण्याला टेकलेले क्षितीज.....हे सगळे सामावणारी महाराजांची करडी नजर.हिंदुस्थानातील पहिले आरमार उभारणारे छत्रपती पाहून मन आदराने झुकले.आमच्या पाठोपाठ काही घाटावरील मंडळी आली.त्यांनी " छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा जयघोष केला.आम्हीही उस्फूर्तपणे त्यांच्या सूरात सूर मिसळले. पुढे आम्ही मालवण आचरा रस्त्यावरून आचरा तिठा गाठला. तिथून डाव्या बाजूच्या छोट्या रस्त्यावरून वळत आम्ही रामेश्वर संस्थान जवळ पोहोचलो.सगळा परिसर अजूनही जुन्या काळासारखा आहे.माड व पोफळीच्या बागा... चिरेबंदी घर .. भरपूर पाणी...मालवणी माणसे ..मालवणी भाषा... मस्त वाटलं इथे.रामेश्वर संस्थानचा परीसर खूप मोठा आहे.तीन सभागृहे पार करत आम्ही गाभार्याजवळ पोहोचलो.मध्ये दोन्ही बाजूला दगडी दीपमाळा दिसत होत्या. मंदीरात सुंदर लाकडी कोरीव काम केलेले दिसते.एकूणच इथला परिसर सर्वांग सुंदर आहे.बाहेर मंडपात काही महिला सरबत वाटत होत्या.रामनवमी वेळी इथे मोठा उत्सव असतो.मंदिराच्या उजव्या बाजूला एक सार्वजनिक वाचनालय आहे. जिल्ह्यातील एक जुने व टापटीप असलेले हे वाचन मंदिर आहे. मंदीरात डाव्या बाजूला नियोजित मंदीराचा लक्ष वेधून घेणारा लाकडी आराखडा आहे.त्यात तलाव..पुष्करणी...धर्मशाळा असा विस्तृत परीसर दाखवला आहे.ह्या सुंदर परीसरातून हलूच नये असं वाटत होतं. इथून आम्ही रखरखत्या उन्हातून सिंधुदुर्गातील काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वरला पोहोचलो.गप्पा गोष्टीत रस्ता भरकटून आडवळणाच्या रस्त्याने आम्ही प्रवास केला.बरेच पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दिसले.देवळातून समोरचा अफाट सागर न्याहाळताना आपण किती खुजे आहोत हे कळते.देवदर्शन केल्यावर आम्ही पोटपूजा केली.जेवण चवदार होत आणि भूकही जोरदार लागली होती.त्यामुळे जेवण अधिकच चविष्ट लागलं सोबत आमरसही होता. इथला गारा वारा अंगावर घेत आम्ही मंदिराच्या पाठीमागील जीवघेणी चढण पार करत देवगडच्या दिशेने गेलो.डाव्या बाजूला समुद्र उजव्या बाजूला कातळ.. मध्ये मध्ये गर्द बागा...धूळ उडवणारा वारा... अश्या वातावरणात आम्ही सुरूच बन व नवा पूल पार करत देवगड चौपाटी गाठली.इथल्या सूरूच्या बनात बसून गप्पा गोष्टी केल्या. तिथे काही पर्यटक घोड्यावर बसून फेरफटका मारत होते.एक मुसाफिर झिप लाइन वरून परिसराच शूटिंग करत होता.काही शाळकरी मुले क्रिकेट खेळत होती.भर उन्हात सावलीचा गारवा झेलत आम्ही बसलो होतो.डाव्या बाजूला पवनचक्क्यांची गरगर फिरणारी पाती...समोर दर्या...मंद लाटांचे हिंदोळे... वातावरण भुलवून टाकणार होते.बराच वेळ बसल्यावर आम्ही देवगड बंदर गाठलं आम्हाला जुनी आरमारी नौका बघायची होती.कोणी सांगितले इथे नाही पलिकडे चला तिथे पोलीसांच पेट्रोलींग प्रशिक्षण चालू होते.तिथे विचारले पण त्यांनाही माहीत नव्हते.खरतर ती नौका देवगडला नसून विजयदुर्ग बंदरात ठेवली होती.इथे मच्छीमार बांधवांची वस्ती होती.समुद्रात असंख्य छोट्या - मोठ्या नौका दिसत होत्या.देवगड बाजारपेठेत हेमंतने देवगड हापूस आंब्यांची खरेदी केली.देवगड हापूसचा दर ४५०ते७५० या दरम्यान होता.फिरून पुन्हा आम्ही वाहतूक कोंडी पार करत पवनचक्क्यांचा परीसर गाठला. प्रथम लज्जतदार स्पेशल चहाचा आनंद घेत आम्ही थकवा पळवला.चार वाजले होते तरीही ऊन जाणवत होते. दहा एक पवनचक्क्यां चालू होत्या.जवळून त्या किती मोठ्या आहेत हे कळत होतं. पवनचक्क्यांच्या खालच्या बाजूला किनार्या लगत छोटी पण सुंदर बाग आहे.आम्ही काही वेळ इथे घालवला.आता पर्यटकांची वर्दळ वाढली होती.स्थानिक व परराज्यातील विक्रेते आपली दुकाने थाटूत होते.इथून झिपलाईन सुरु होत समोरच्या छोट्या टेकडीवर पोहचत होती.खर तर या ठिकाणी सूर्यास्तावेळीगंमत आली असती.कलत्या नारिंगी रंगात हे ठिकाण अधिक शोभून दिसत असेल. परतीचा प्रवासात कुडाळ उद्यमनगरातील तिठ्यावर वडा चटणी चा आस्वाद घेतला.वडा एवढा आवडला की केरकरने पुन्हा वडा मागवला.वड्यांची चव जीभेवर रेंगाळत असतानाच आम्ही सावंतवाडीत पोहोचलो.
बाळकृष्ण सखाराम राणे.
...