बळी सारखे हुमदांडगे सर्रास ही नीती वापरीत. काही वेळा याचाही पलिकडे जाऊन आंग जोरावर विकणाऱ्याला किंवा खरेदीदाराला , त्यातल्या त्यात जो नरम असेल त्याला धमवावून, दमदाटी करून झालीले व्यवहार मोडायला भाग पाडून व्यवहार आपल्या पदरात पाडून घेत.
भाऊंच्या व्यवहारात बळीने अशीच दोन बनाकट गिऱ्हाइकं नीखबरे भाऊंच्या तल्लासावर सोडलेले होते.सदा मुंबईवाला, तिकडे वस्तू, नी त्यातल्या त्यात स्थावर मालमत्ता विक्रीची बातमी लागली तर वेळ न दवडता मोका साधण्याची पद्धत असायची. आजची वस्तू उद्याला मिळेलचा याची शाश्वती नसायची. तसेच शहर बाजारात प्रॉपर्टीच्या किमती सर्वसाधारण ठरलेल्या असतात. तिथे लोळत न रहाता झट की पट व्यवहार उरकून मोकळं व्हायचं ही नीती त्याच्या अंगी भिनलेली होती. तसेच जेव्हा त्याने चुलत्याकडे हाविषय काढला तेंव्हा चुलत्याने त्याला बजावून सांगितलेलं होतं की, जमीन मातब्बर आहे. भाऊ गरजू असले तरी मातीमोल भावाने कालत्रयी ही मोक्याची जमीन देणार नाहीत. गिऱ्हाईकं तर एकमेकाचा अंदाज घ्यायला अशी टपलेली आहेत की कोण कधी लग्गा साधील पत्ताही लागणार नाही. तुला गावातच जमीन हवी आहे, पिकदाऊ नीआपल्या आवाक्यात हवी आहे. ही सोन्यासारखी सारखी संधी आहे. तू भाऊला भेटून अशी बोली कर की भाऊला नाही म्हणता येऊ नये. आतापर्यंत मागणारे केणीच या पलिकडे गेलेली नाहीत. जाशील तो बसल्या बैठकीत व्यावहार पुरा करूनच यायचं. सदातासाभरातच रक्कम खिशात टाकून चुलत्याली नी मोठ्या भावाला सोबत घेवून भाऊंकडेगेला.
जुजबी बोलण झाल्यावर चुलत्याने आकडा सांगितला. आतापर्यंत एकानेही एवढा दर केलेला नव्हता.फार ताणून न धरता भाऊनी त्यांच्या बोली बाहेर अडीजशे रुपये जादा सांगितले नी तत्क्षणी व्यवहार ठरला. सदाने दोन हजार लगेच काढून दिले नी उरलेले दुसरे दिवशी राजापूरात जावून पोष्टातून काढूनआणून देतो असं सांगितलं नी व्यवहार ठरला. खबरे तल्लासावरच होते. दुसरे दिवशी राजापुरातून आल्यावर सदा गुरवाने भाऊंचाव्यवहार पुरा केला. त्याने मग भावकीतल्या दोघा चौघाना ही बातमी दिली नी तासाभरात ती बळीच्या कानावर गेली. बळी लगेचनोटा बांधून सोबतीला चार झिलगे घेवून भाऊंच्या घरी आला. जुजबी बोलणं झाल्यावर नोटांची बंडलं समोर टाकून, “ तुम्ही फक्त होयम्हणा.... सदाला व्याजासकट रक्कम परत देवा.... अगदीच आयकत नसलो तर तेकामाज्यासामनी बोली लावूक सांगा.... तो बोलीकरीत तेच्या भायर हजार रुपये मोजून बसल्या बैठकीत मी रोखीन येवार पुरो करीन....तुमी ही रक्कम ठेवा.” बळी बोलला.
भाऊनी हात जोडून सांगितले, “तुम्ही व्यावहार होण्यापूर्वी आले असतेत तर मी तुमच्याशी सौदा केला असता. मी बोलवा फोडून दोन महिने होवून गेले. किती लोक भेटून गेले. जो- तो पडत्या भावात सौदा करू पहात होता. पण सदा आला नी त्याने रितसर आकडा सांगितला....... आता कमी जास्त रकमेला व्यवहार होतात. पण त्याने जी रक्कम दिली ती आजच्या बाजार भावाप्रमाने रास्त आहे. मी हा व्यवहार करण्यापूर्वी बाबुराव देसाई , दादा खोत यांचाशी सल्ला मसलत केलेली आहे. सदाने व्यवहार पुरा केलेला आहे. माझा शब्द गेलेला आहे . मी दिला शब्द पैशासाठी मागे घेणार नाही. तुम्ही सदाच्या चौपट रक्कम दिलीत तरी आता काहीही उपयोग व्हायचा नाही. ठरलेला व्यवहार मी कालत्रयी मोडणार नाही....... जादा पैशाच्या लोभाने ठरलेला व्यवहार मोडायला मी शेण खाणारातला नाही...... तुम्ही पैसे उचला नी घरी जावा...... ” बळी उमजला नी बंडलं उचलून निघून गेला. आलेल्या पैशातून गडी मजूरी आणि गाडांच्या दुकान बाकीसह सगळी देणी भागवून भाऊ ऋणातून मुक्त झाले. मधली रास पूर्ण बंद झाली आणि मिलोच्या कण्या खावून दिवस काढायची विपन्नावस्था भाऊंवर आली. आता त्यांची हुन्नरच संपली होती. सडावळीची बानघाटी जवळची जमिन बेणून तिथे त्यानी कलमं लावायची सुरुवात केली. ते आणि बायको डोकीवरून पाण्याचे डबे वाहून कलमांचं शिंपणं करीत. सुरेश सातवी पास झाल्यावर त्याला खारेपाटणला धाक्रसांकडे देवपुजा करायच्या अटीवर शिक्षणासाठी ठेवला.
मळे जमीन विकल्यानंतर भाऊंचा अगदी पडता काळ सुरू झाला होता. कुठूनच आशेचा किरण दिसत नव्हता. रोहीणी सरत आल्या नी आडाळा पाऊस लागला. आता चार दिवस तरी कलमांच्या शिपण्यातून सुटका मिळणार म्हणून हायसं वाटल.गुरं सोडून आल्यावर भाऊ झोपाळ्यावर टेकले. सुपारी कातरून तोंडात टाकली आणि पानाला चुना लावीत असताना पाळंदीत कोणाचा तरी पायरव आला. इतक्या सकाळी कोण बरं आलं असेल? भाऊ विचारात पडले. तंबाखूची चिमूट घेऊन भाऊ पुढील दाराकडे येऊन बघायलालागले. बळीची बायको रखमा डोक्यावर जडशीळ मोटा घेतलेल्या दोन कुळवाडणीसोबत घेऊन येताना दिसली. काही हासभासनसताना तिला समोर बघून भाऊ चक्रावूनच गेले त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली ती बाहेरआली. भाऊ तिला म्हणाले ही बळी भंडाऱ्याची दुसरी बायको रखमा. नवीन कापड नेसून सुपभर दागिने अंगावर वागवीत आलेली ती गोरीपान भंडारीण बघितल्यावर भाऊंची बायकोसुद्धा भांबावून गेली. तिला ऐकून माहिती होती पण ती प्रत्यक्ष समोर उभी राहिल्यावर भाऊंची बायको तिच्या अंगावरचे दाग दागिने बघून थक्कच झाली. मग भानावर आल्यावर तिने आतून पाट आणून भिंतीच्या कडेला ठेवला आणि ती रखमालाम्हणाली," या पाटावर बसा. सकाळी सकाळी तुम्ही अगदी लक्ष्मीसारख्या माझ्या घरात आलात." रखमाच्या सोबत आलेल्या कुळवाडणीना बसायला पाटाच्या बाजूला कोपऱ्यातली डाळी पसरली. डोक्यावरच्या मोटा ओसरीवर ठेवून कुळवाडणी बसल्या. भटणीने केलेल्या स्वागतामुळे रखमा पुरती भारावूनगेली. भाऊ म्हणाले,"आज आमच्या गरीबाची कशी काय आठवण आली एवढं काय काम काढलंत?"
सोबत आलेल्या कुळवाडणीना ती म्हणाली,"मी हाक मारी सर तुम्ही जरा बाजूक जावन थांबा, माका भाऊंशी नी तेंच्या बायकोशी खाजगी बात करू ची हा." त्यावर कुळवाडणी उठून मागीलदारी गेल्या.” मी ईलय म्हंज्ये तुमी मळ्यातली जमीन ईकलास....रस्त्याचा काम कोर्टान बंद पाडलान..... तुमचो खर्च मिळालो नाय..... त्ये पायी तुमच्यार ही आफत ईली...... डोळ्याला पदर लावीत रखमा पुढे म्हणाली,शेती ग्येली म्हनान डुकरी भरडून कणयो खावची आफत ईली तुमच्यावर.....हरी नळेकरान केस घतलान पन तेका माज्या घोवान आतसून हुसकावून घतलेलो हा..... (क्रमश:)