पैशासाटना तुज्या जावयान तुजा सोन्या सारक्या चेडू न नांदवता म्हायारी धाडलान...... तां आदी निस्तर...... नी कायरे? रस्त्याचा काम तू वाडवून दिलस भाऊंका ?तेंच्या फायद्यासाटी येवड्यो म्हारक्यो केलेस तू? जटारा कडसून मळ्यात जमिन घितलना तू तेतूस्सून रस्तो जावचो हा. रस्त्यासाटना तुजे धा वीस भांगे जातले म्हणूनपावण्याक मदी घालून गुरववाडीत्सून रस्तोन्हेवची तुजी मकलाशी जगदुनियेक नसली म्हायत तरी माका म्हायत हा ना...... ज्येका त्येका नाड नी जगदुनियेचे हपाप घी....... येवडा कमवून जाताना मड्यारघालून किती न्हेशी तां बगीन ना मी.....आता ही हलकटपणा बास कर.... नेदान चांगल्याशी तरी चांगलो वाग रे हलकटा..... भाऊंच्या शिलीपाटाक तू हातच लाव..... नाय तुका निजत्या हातरणावर जितो जाळलो तर माका सांग...... ही खोटेपणा आताबंद करा…. जा खालास ना ता पचात कसा ता आदी येवजा. तुमी जावा भाऊनु..... ह्यो तुमच्या केसाकव धको लाव शकणार नाय ... मी तेका असा करूक द्येनार नाय.... तुमी बिनघोर ऱ्हवा.... पुन्नारुपी तुमका काय दमदाटी केलान तर माका सांगा.......”बळी खेटर मारल्या सारख़ा गप बसला.
जून अखेरीला झालेल्या कामाचा हप्ता मिळाला. लाकूड सामानाचेही बरे पैसेमिळाले म्हणून यावेळचा खर्च कसाबसा निभावला पण हातात काहीच उरलं नाही. काम पुरं होईतो सरकार कधीच बजेटच्या निम्मेपेक्षा जादा रक्कम सोडीत नाही. पुढचं दोन टप्प्यातलं काम झाल्यावर रस्ता पुरा झाली मग मात्र चांगला फायदा होणार होता. त्या आशेवर भाऊ खंबीर होते. दिवाळी झाली नी पुढच काम सुरू झालं , महिनाभरात रस्ताभाऊंच्या ठिकाणापर्यंत पोचला. बळी तात्पुरता गप्प बसलेला होता. रखमामुळे त्याला उघडपणे काही करणं शक्य नव्हतं. त्याला कोणीतरी चांगला गुरू भेटला. गुरववाडीतून आलेला रस्ता पुढे व्हाळापर्यंत जावून मूळ प्लॅन मध्ये असलेल्या रस्त्याला मिळणार त्या फाड्यात झिलू सडेकराचे बारा दळे होते. वाढीव प्लॅन प्रमाणे सर्व्हे झाला त्यावेळी इतर जमिन मालकांसोबत झिलूने नाहरकत पत्रावरसही केली होती. पण त्याला पुढे करून गवाणकर वकिलाना गाठून बळीने कोर्टात दरखास्त दिली. आपला अशिल अल्प भू धारक आहे, वादातीत जमिन वग़ळता अन्य जमीन वरकस असून शेती योग्य नाही असा युक्तिवाद गवाणकरानी केल्यामुळे कोर्टाने तत्काळ स्टे ऑर्डर काढली नी अकस्मातपणे रस्त्याचे काम आहेत्या स्थितीत बंद ठेवायची लेखी नोटीस भाऊना बजावण्यात आली. काम बंद पडलेच पण आर्थिक नाड्या आवळल्यामुळे भाऊंच्या तोंडचंपाणी पळालं....... केस कधी निकाली निघेल …… तो पर्यंत काहीच करता येणार नव्हतं. तरी साहेब चांगले होते.त्यानी भाऊना गुलदस्त्यात न ठेवता या कामाला आता भविष्य नसल्याचे स्पष्टच सांगून टाकले.
भाऊनी कामदाराना बोलावून या गोष्टीची स्पष्ट कल्पना दिली. जमलेला सिलीपाट विकून काय रक्कम येईल त्यातून भागेल तेवढी मजूरी मिळेल .उरलेली रक्कम जमेल तेव्हा जमेल तशी देईन. थोडा विलंब झाला तरी कोणाची एक पै ही बुडवणार नाही अशी खात्री दिली. दोन तीन महिने गेले.भाऊंची झोपच उडालेली होती. खूप विचार करूनत्यानी मळ्यातली शेत जमीन विकायला काढली. बोलवा फुटल्यावर भाऊंना निकड आहे हे जगजाहीर असल्यामुळे येणारी गिऱ्हाईकं पडत्या भावाने बोली लावायचे. जोतो मातीमोल भावाने जमिन ती दुपिकी मळे जमीन बळकावयला टपला होता.खरं तर त्यावेळच्या बाजारभावाने व्यवहार झाला असता तर भाऊंची नड भागली असती. आता योग्य गिऱ्हाईक मिळेपर्यंत गप बसणं एवढंच त्यांच्या हातात होतं. गणेशचतुर्थीत गुरववाडीतला मिलिट्रीवाला सदा गुरव फंड घेवून गावी आला. सदा मिलिट्रीत सुभेदार होता. ब्रम्हदेशात युद्धावर असताना मांडीत गोळी लागली नी त्याची नोकरी संपली. पणत्याला फंड भरपूर मिळाला होता. तोपुढे दहा- बारा वर्ष पठाणी व्याजाने कर्ज देण्याचा धंदा करी. अशाच एका कर्जदाराला वसूलीसाठी गुंडांकरवी मारझोड करण्याच्या प्रकरणात ऋणको मेला. ते प्रकरण कसंबसं रहाती खोली विकून त्याने गाशा गुंडाळला नी तो गावी रहायला आलेला होता.
सदा गुरवाची फारशी शेती वाडी नव्हती म्हणून शेत जमिन घ्यायची असं ठरवूनच तो गावी आलेला होता. त्याला भाऊंची मळे जमिन विकायचीआहे ही वार्ता कळली. तो तत्काळ समक्षभाऊना भेटला. त्याने भाऊंच्या अडचणीचा गैरफायदा न घेता वाजवी बोली केली. चार दिवसात रोख रक्कम मोजून त्याने व्यवहार पुरा केला. त्याच दिवशी बळीला ही बातमी लागल्यावर तो रातीच्या वेळी भाऊना भेटायला आला. सदाने दिली त्यापेक्षा जादा रक्कम द्यायची लालूच दाखवली. गावातल्या पैसेवाल्यांची ही ठरलेली नीती होती. एखाद्याची वस्तू विकायची आहे हे कळल्यावर त्याला ती विकण्याची कितपत निकड आहे याची बित्तंबातमी काढून रुपयाची वस्तू दोन आण्यांपासून मागायला सुरुवात करायची. नाना भाकडं सांगून, त्या वस्तूत काहीना काही न्यून काढून त्याचा बुद्धिभेद करायचा शिकस्तीचा यत्न करायचा. चार खेपा घालूनतो कितपत जेरीला आला आहे ? शेजाऱ्या पाजाऱ्याला वश करून घेवून कोण कोण गिऱ्हायकं येवून गेली, त्यानी काय आकडे फोडले या तलासावर रहायचं नी दरवेळी थोडी थोडी बोली वाढवायची. काहीजण तर मोठ्या जमिन व्यवहारांमध्ये अशी माहिती काढण्यासाठी पैसे देऊन खबरे नेमीत.
काही जण स्वत: मागणी करून आल्यावर आपल्या वगीतल्या दोन जणाना बनावट गिऱ्हाईकं बनवूनपाठवीत . ते लोक अजून दर सांगत. बरीच गिऱ्हाईक येवून कोणीच ठराविक मर्यादे पलिकडे बोली करीत नाही म्हटल्यावर विकणारा जेरीला यायचा नी त्यातल्या त्यात चार पैसे देणाऱ्याशी व्यवहार करून मोकळा व्हायचा.जेंव्हा खूप मोठ्या व्यवहारात पैसे देवून खबरे सोडलेले असत ते मालकाचा नेट संपत आल्याची खूण गाठ पटल्यावर आप्ल्या खरेदीदाराला सावध करीत . काहीवेळा एखादा बोली करून व्यवहार ठरवून सस्कार देवून गेला की हे खबऱ्ये आपल्या खरेदीदाराला सांगत. तो मग टाकोटाक रक्कम घेवून यायचा नी सस्कार देवून गेलेल्या माणसा पेक्षा थोडीशी जादा रक्कम देवून चोरावर मोर व्हायचा. निरक्षर...हातावर पोट असलेली, परिस्थितीने गांजलेली, किंवा हव्यासी- खऱ्या खोट्याची बूज नसेली , स्वार्थासाठी काहीही करायला तयार असलेल्या वृत्तीची माणसं जादा पैशासाठी दिलेला शब्द बिनदिक्कत मोडणं सोडा प्रसंगी इमान विकायला कचरत नसत. (क्रमश:)