हे काम तर एवढं शाश्वत झालेलं होतं की कितीही मोठा पाण्याचा प्रवाह आला असतातरी रस्ता शाबूत राहिला असता.काम निम्मे झालं तेव्हा साहेबांची व्हीजीट झाली . त्यावेळी गटारातलं पाणी खालच्या अंगाने निचरा करायची ही युक्ती त्याना भलतीच आवडली. कोकणातल्या जानपद निरक्षर माणसांचं हे तांत्रिक कसब तज्ज्ञ इंजिनीअरलाही मागे टाकणारं आहे असे प्रशंसोद्गार त्यानी भाऊंसमोर काढले. नवीन बदलेल्या एस्टिमेट प्रमाणे पुढच्या कामाचा टप्पा बदलेला होता. काम सुरू असताना बळी नेहेमीप्रमाणे नजर करायला आली तेंव्हा तो भाऊना म्हणाला कि, “ ह्या फुडचा वाडीव काम तुमका माज्यामुळा मिळालेला हा. तवां तां काम तुमी माका द्येवचा. मागच्या येळी लयथोडो शिलीपाट तुमी माका देनार म्हणून कबूल करून माका टांग मारलास....... आता ह्या फुडच्या भागात राईच्या कडणीन लय शिलीपाट मिळणारो हा. तेच्यार म्हणशा तरमाजोच हक हा...... तो दुसऱ्या कोणाक देवक् मिळनार नाय..... मी आदीच सांगॉन ठेवतय...... मी बरो तर ढुंग़णाची लंगटी सोडून द्येयन् पन वाकड्यात जायत तेका नागडो करून गावभर धिंड काढीन...... आमीभंडारी म्हंज्ये बायको द्येव पण बढाय सोडणार नाय...... ह्या येळेक माका ढाकलावन् तिसऱ्याक शिलीपाट नी खुटवळ दिलस तर तू पण हस नी मी पण हय....... तुजे डेपो जाग्याक नाय कुसवले तर मी नावाचो बळी भंडारी नाय.....”
ह्या टप्प्यातल्या कामात अंदाजाच्या बाहेर दिवस गेले नी मजूरीही वाढली होती. दरड खणताना पडलेल्या मुळव्यात चार हाती, पाच हाती सिलीपाटात जाणारा गोलटा भरपूर गावला होता. गोलटा पंधरा लोड नी खुटवळ जेमतेम वीसेक डेपो झाले . पण खुटवळाच्या दुप्पट तिप्पट दर सिलीपाटाला मिळे. त्यामुळे बऱ्यापैकी मिळकत झाली असती. पण मध्येच बळीचा कोलदांडा आला. दोन दिवसानी भाऊ बळीला भेटायला गेले. आपण खुटवळ नी सिलीपाट घालायच्या बोलीवर आगावू उचल घेतलेली असल्यामुळे आपला नाईलाज आहे असं त्यानी सांगून टाकलं. त्यावर तुमका पैशेच हवे हुते तर माका भेटायचा ना? माका काय भिकारीसमाजलास? मागच्या येळेक मी तुमका सांगलं हुतय की कवापन जरवर पडली तर माका सांगा....... त्यावर भाऊ बोलले की तुम्ही दर पाडून सांगितलात..... माझा हात दगडाखाली गावलेला आहे मला चार पैसे जादावमिळाले तर माझी आंग वाटावणी होईल.......यात काय चूक आहे? हे बोलणं सुरू असताना रखमा दुधाचा ग्लास घेवून आली. “ मी इषय आयकतय...... भाऊंचा कायपण चुकलेला नाय..... जो चार पैशे जादा देनार तेच्याशीच कोनव झालो तरी यवार करनार ना? तुमका हा ह्यो धंदो आवरताना मुस्कील..... गेल्या वर्साचो निम्मी म्हाल पडोन हा आनी भाऊंच्या शिलीपाटार तुमचो डोळो कशक म्हंतय मी...तेंचा ते कायव करूनेत..... “रखमाने बळीला सुनावले. बळी जग दुनियेसमोर दादागिरी दाखवीत असला तरी ह्या मागारणी समोर नांगी टाकीत असे.
बळीने मग पुढच्या कंत्राटात भागीदारी द्यायचा विषय काढला, त्यावर भाऊ बोलले की, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी. हे जोखीमदारीचे काम आहे. तुमचा हट्टच असेल तर ते काम नव्याने वाढवलेले आहे. ते साहेबाना सांगून माझ्याऐवजी तुम्हाला द्यायला सांगा. माझी काही हरकत नाही. जिल्हाबोर्डावर तुमचे पाहुणे आहेत..... त्याना मध्यस्त घालून या वाढीव कामाचा मक्ता तुम्हाला द्यायला सांगा. माझी काही तक्रार नाही. आजपर्यंत केलेल्या कामाचा हिशोब मला देवून पुढचे संपूर्ण काम तुम्हाला दिलेनी तरी माझी काही हरकत नाही. मी तसं लिहून द्यायला तयार आहे. पण मला कोणाशीही भागीदारीत हे काम जमणार नाही. पाहिजे तर चारदिवसानी आपण दोघानीही रत्नागिरीला जावून साहेबाना समक्षच भेटूया नी काय तोसोक्षमोक्ष लावूया. मला तुमच्याशी दुष्मनी ठेवायची नाही. मी काय तुमच्या तोंडातला घास काढून घेतलेला नाही. हे ऐकल्यावर बळी वरमला. भाऊनी सुचवल्याप्रमाणे वाढीव कामाचा मक्ता आपल्याला मिळण्यासाठी रत्नगिरीला जावून साहेबाना भेटायचा तोडगा त्याला मान्य झाला.
बळीशी बोलणं झाल्याप्रमाणे भाऊ नी तो दोघेही रत्नागिरीला गेले. बळीचेपाहुणे अनायासे ऑफिसमध्ये आलेले होते.त्यानी साहेबाना भेटून वाढीव कामाचे स्वतंत्र टेंडर काढून ते काम बळीला द्यायचा पर्याय सांगितला. त्यावर साहेबानी त्यातली कायदेशीर अडचण मांडली. मूळ कामात वाढघट झाली तरी मक्तेदार बदलता येत नाही. तसेच या रस्त्याच्या कामात फेरबदल झाला , त्याप्रमाणे नवीन प्लॅन एस्टीमेट करून त्याला वरून मंजुरीही आली. तसा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट ही देवून झाला. आता त्यात बदल करणं शक्य नाही. साहेबानी स्पष्टच सांगून टाकल्या मूळे तो विषय तिथेच मिटला. त्यानंतर चार दिवसानी बळीचा निरोप आला म्हणून भाऊ पुन्हा त्याला भेटायला गेले. “ हयसून फुडचा काम कसा काय व्हणार ता माका सांगा...... त्यात माका चार आणे भागी देवा..... मी तुमच्या कामात बिगो घालणार नाय ..... उलट तुमकाआगाव खर्चाक मागशा तेवडी उचल मी द्येयन...... पन माका भायरो करू नुको...” अशी गळ तो घालायला लागला. त्यावर यातल्या अडचणी स्पष्ट करून भाऊनी नाही म्हटल्यावर बळी भडकला.
“ ह्या वाडीव काम तुका माज्यामुळे मिळालेला हा..... ह्येतू किती मिळकत हा त्येचो माकाअंदाज हा...... माज्या पावण्यान म्हायती काडलेली हा....तुका फायदो होव साटना शानु काका देसायानी कंत्राटाचो खर्च वाडीव दाकवलानी हा....... खटपट मी क्येली नी फायदो तू एकल्यान खानार काय रे भटा..... मी तुका तसो सोडनार नाय तुजो शिलीपाट जाग्याक पेटवून द्येयन...... तू माका समाजलस काय?” बळी हमरातुमरीवर आल्यावर रखमा बाहेर आली. बळी समोर उभी राहून ती म्हणाली, “ ह्ये गरीब भटगडी गप आयकोन घेतत म्हणून कायव घमेंडी मारशा काय? पैशाची लय चरबी इली तुमका ? देवाच्या जा मिळालेला हा ह्या पुरत नाय म्हनून भाऊंच्या तोंडातलो घास काडून घेनार तुमी? आं येकडी चरबी वाडली तुमची? खंय फेडशा ही पापा...... दोन झील तुजे दारुडे निपाजले...काय कामधंदो करीत नाय...... नुसती दारू खावन् नी रांडबाजी करून बापसाची कमाई उदाळतं हत तेंका आरेखता येयत नाय तुका. (क्रमश:)