They are lucky. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | नशीबवान असतात ते

Featured Books
Categories
Share

नशीबवान असतात ते

नशीबवान असतात ते?       

          *म्हातारपण, बालपण व तरुणपण..... खरंच रमणीय असावं. असं सर्वांनाच वाटत असतं. तसं पाहिल्यास तरुणपण व म्हातारपण हे प्रत्येकालाच येत असतं असं नाही. काहीजण काळाच्या ओघात लवकरच आपली पृथ्वीवरील जीवनयात्रा संपवून निघून जातात. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला हे तरुणपण व  म्हातारपण येत असतं, ते खरंच नशीबवान असतात. कारण तरुणपणातच व म्हातारपणातच खरं बालपण अनुभवायला मिळत असतं.*         बालपण....... काय असतं बालपण की ज्या बालपणात रमणीयता असते. आनंद असतो त्या बालपणात. तरीही कंटाळा येतोय. त्याचा. वाटत असतं की आपण मोठे व्हायलाच हवे. कारण मोठे झाल्यावर कोणाची कटकट तर नाही ना राहणार. परंतु जसे आपण मोठे होतो. तशी जबाबदारी मागं येते व जबाबदारीची कटकट सोबतीला येते. मग वाटत असतं की आपलं बालपणच बरं होतं की ज्या बालपणात आपण मोकळे होतो. आईवडील रागावत होते तरी जबाबदारी नव्हती. ना पत्नीची कटकट असायची ना मुलाबाळाची. तसंच पत्नीवर्गांना वाटत असतं की आपल्याला बालपणात पतीची कटकट नव्हती ना मुलाबाळांची ना सासू सासऱ्यांची. हे तरुणपण असंच की कटकटींनी भरलेलं.        ते तरुणपण व त्या तरुणपणातील ती दुःखदायक परिस्थिती. कधी वेदना अनुभावयास मिळतात. असं का होतं? त्याचं कारण आहे कर्म. बालपणात आपल्याला कळत नसल्यानं आपल्या हातून कळत न कळत चुका होतात. आपला खेळ सुरु असतांना काही प्राण्यांचे निष्पाप बळी जात असतात. जे चतूर पकडायला आपण जातो. त्याच्या शेपट्यांना धागे बांधतो. कधी सरड्यांना तंबाखूजन्य पदार्थ चारतो. कधी बेडकांना दगडं मारतो. कधी माकडांचा कळप हाकलतो. कधी काजव्यांना बाटलमध्ये बंदिस्त करतो. कधी रंगीत फुलटाखरु पकडतो. कधी विनाकारण मुंग्यांना मारतो. हा आपला खेळ असतो. परंतु यातून पाप घडत असते. ते आपल्याला कळत नसतं. त्याच आपल्या बालपणातील कर्माची शिक्षा आपल्याला तरुणपणात मिळत असते. ते तरुणपण आपलं अतिशय दयनीय व वेदनादायक स्वरुपात जात असते. तसंच म्हातारपणाचंही आहे. म्हातारपण हे याच डालपण आणि तरुणपणातील कर्मावर आधारीत आहे. तरुणपणात जर आपण आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकले तर आपल्याही म्हातारपणात आपली मुलं आपल्याला वृद्धाश्रमात टाकतीलच व आपल्या म्हातारपणातील नातवंडांसोबत खेळण्याचा विरंगुळा आपल्यापासून हिरावून घेतीलच. तसेच आपण आपल्या तरुणपणात कोणा लाचारांना त्रास दिला, तर त्याचीही शिक्षा ही आपल्याला म्हातारपणात भोगावीच लागते. जे म्हातारपण नरकयातनेपेक्षाही मोठं वाटते. महाभयंकर वेदनादायक.          ते तरुणपण व त्या तरुणपणात सतत येणारा तो बालपणाचा विचार. ते कुठंतरी विधाता ऐकतं व आपल्याला कालापकाल म्हातारपणात घेवून जातं व कर्म परत येतं यानुसार आपल्याला पुन्हा एकदा बालपण येतं व आपण बालपणातील क्लुप्त्या करु लागतो. तेव्हा लोकं म्हणतात की या म्हाताऱ्याला म्हातारचाळ लागली काय, परंतु ती म्हातारचाळ नसते तर ते परत आलेलं बालपण असतं. ते म्हातारपण की त्या वयात आपण निवांत बसलेलो असतांना आठवत असतं बालपण व बालपणातील खेळलेले ते भातूकलीचे खेळ. ते चक्करबिल्ले, कंचे, नदीत पोहायला जाणे, भोवरे खेळणे, विटीदांडू खेळणे, टायर चालवणे, दंगामस्ती करणे, फुलपाखरु पकडणे, सरड्याला तंबाखू चारणे. बेडकाला खडे मेरणे, माकडं पळवणे. इत्यादी साऱ्याच गोष्टी. त्याच गोष्टी आपण नातवंडासोबत शेअर करीत असतो. आपला नातू आला की आपली क्रिकेट सुरु होते. कधी कंचे तर कधी चक्करबिल्ले सुरु होते. त्यातच काही गोष्टींनाही पेव फुटत असतं. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा अमूक अमूक करीत होतो. असे सारेच फुशारकीचे बोल आपल्या नातवंडासमोर सुरु असतात. तसंच नातवंडासमोर आपल्याला खेळायला रमायला आवडतं. कारण आपलं बालपण परत आलेलं असतं.          बालपण व म्हातारपण चांगलं मिळणं हे भाग्याचं चांगल्या भाग्याचं लक्षण आहे. ज्याचं भाग्य चांगलं आहे व जो खरंच नशीबवान असतो, त्यालाच म्हातारपण व बालपण चांगलं मिळत असतं. सर्वांना बालपण व म्हातारपण चांगलं मिळत नाही. आता कोणी म्हणतील की कसे बोलतात लेखक महोदय, बालपण तर सर्वांनाच मिळत असतं ना. ठीक आहे, बालपण सर्वांनाच मिळत असतं. परंतु ज्यांचे मायबाप लहानपणीच मरण पावतात. त्यांच्या नशिबात कुठं येतं बालपण. बिचाऱ्यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बालपणातच कामं करावी लागतात. कधी बाप किंवा आई यापैकी एक मरण पावल्यास सावत्रपणाचा त्रास सहन करावा लागतो. ज्यातून बालपण हिरावलं जातं. कधी कचरा वेचत वेचत उकिरड्यावर जिंदगी काढावी लागते. अशावेळेस कुठं आले ते कंचे खेळणे, तो चक्करबिल्ला आणि ती टायरं चालवणं, ते क्रिकेट खेळणं आणि ते भोवरे खेळणं. कधी पोहायला जाणं वा भोवरे खेळणं. या साऱ्याच गोष्टी नसतात जीवनात. जेव्हा बालपण असतं व बालपणात आईवडीलांचा आधार नसतो.          बालपणाचा विचार केल्यास बालपण असं होवून जातं की ते संपावं असं वाटतं, आईवडील नसले तर...... कधीकधी जरी एखाद्याचे आईवडील जीवंत असले तरीही बालपण संपावं असं वाटतं. कारण आईवडील सारखे आपल्या मागं अभ्यासाचा तकादा लावत असतात. वाटत असतं की मोठे झाल्यावर कोणीच आपल्या मागं असा तकादा लावणार नाहीत. कोणीच अमूक हे कर, तमूक हे कर. असं म्हणणार नाही. आपण आपल्या स्वतःच्या मनाचे मालक असणार. परंतु तसा विचार करणं चुकीचं होतं. हे तरुणपणातच कळतं. जेव्हा आईवडील हेच खरे आपल्या जीवनाचे शिल्पकार आणि आधारस्तंभ होते याची जाणीव आपल्याला होते. तेव्हा वाटतं की काश! रम्यच होतं ते बालपण.         आनंदी व रमणीय बालपण. हे झालं बालपणाबाबत. तरुणपण आल्यावर जेव्हा बालपण आठवतं. तेव्हा हळूच आपल्याजवळ सरकत येतं म्हातारपण. ते केव्हा येतं हे साधं कळतही नाही. अन् जेव्हा म्हातारपण येतं. तेव्हा पुन्हा आपल्यावर म्हातारपणासारखीच बंधनं येतात. आपली मुलगी, आपला जावई, आपला मुलगा, आपली स्नुषा, सारखे आपल्यावर रागावत असतात. अमूक अमूक करु नका, अमूक खावू नका. अशी सारीच बंधनं. मग त्यांच्याच मनानं वागावं लागतं. त्यांचे सतत टोमणे ऐकावे लागतात. वाटत असतं की हे टोमणे ऐकण्याऐवजी मेलेलं बरं. परंतु मरणही येत नाही. अतिशय जीवघेणा त्रास होत असतो म्हातारपणात. परंतु तो सगळा सहन करावा लागतो. असं वाटत असतं की एकप्रकारे बालपणातील त्रास परवडला की त्या बालवयात सगळे लाड करायचे. परंतु म्हातारपणात कोणीच आपल्याला चांगले म्हणत नाहीत. सगळेच टोमणे मारतात व सगळेच रागावतात. आपण आपल्या मनाचे मालक नाहीत. आपली स्वतंत्रताही हिरावली गेली आहे.          अलिकडील काळात जे बालपण म्हातारपणात येत असतं, ज्याला म्हातारचाळ म्हणतात. तेही हिरावलं गेलं आहे. म्हातारपणातील विरंगुळा संपलाच आहे. लोकं आपल्याला म्हाताऱ्यांची कटकट नको म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकत आहेत. तसंच बालपणही संपलेलं आहे. बालपणात लहानपणी खेळले जाणारे खेळ आता दिसत नाही. आम्ही ते खेळ खेळतच नाही. शहरात तर नाहीच नाही. अन् एखाद्यावेळेस खेळतो जर म्हटलं तर त्याला गावंढळ अशी उपाधी मिळते. ग्रामीण भागातूनही हे खेळ हद्दपार झाले आहेत. आता ती लहापपणची बैलगाडी दिसत नाही. त्या तरोट्याच्या पेंढ्या दिसत नाहीत. ती आमची मैत्रीण दिसत नाही की जी आमच्यासोबत राहून बाहुला बाहुलीचे लग्नसोहळे करायला मदत करीत होती. ते नवरी नवरदेवाचे खेळ आता दिसत नाहीत. अलिकडील काळात त्या खऱ्या बाहुलाबाहुलीच्या विवाहावर नव्हे तर खोट्या आमच्या  खेळावर बंदी आणली आहे. त्यातच पहिल्या पावसात भिजणं आता दिसत नाही. पावसात भिजल्यास आता आजारी पडायचा धोका असतो. शिवाय आता आमचं बालपण घराच्या चार भिंतीत कैद आहे. आमची जिंदगी मोबाइल पाहण्यात व टिव्ही पाहण्यात कैद आहे.          म्हातारपण व बालपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. परंतु आज बालपणातील विरंगुळा जसा संपलेला आहे, तसंच संपलेलं आहे आता म्हातारपण. कारण म्हातारपणात आम्ही विचार करतो की आम्ही म्हातारपण आमच्या नातवंडासोबत काढू. परंतु तो आमचा विचार असतो. आमच्या लेकराचा नसतोच. ते आमची इच्छा नसतांना आम्हाला वृद्धाश्रमात टाकत असतात व आमच्या म्हातारपणातील विरंगुळा आमच्याजवळून जबरदस्तीनं हिरावून घेत असतात. विशेष सांगायचं झाल्यास ती मंडळी खरंच नशीबवान असतात की ज्यांना चांगलं बालपण लाभतं व त्या बालपणात त्यांचे लाड पुरवले जातात. ज्यांचे आईवडील जीवंत असतात. तसंच म्हातारपणाचंही आहे. ते म्हातारे खरंच नशीबवान असतात की ज्यांची लेकरं त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत. त्यांची सेवा करतात. अन् खासकरुन ते नशीबवान असतात की ज्यांची जोडीदार त्यांच्या उत्तर आयुष्यातही त्यांच्या सोबतीला असते. तो जोडीदार जीवंत असेल तर म्हातारपणही स्वर्गासारखंच रमणीय वाटत असतं आणि तो जोडीदार जर आपल्या म्हातारपणाच्या पुर्वीच सोडून गेला तर ते सर्व म्हातारपणातील जीवन दुःखदायक आणि कंटाळवाणं वाटतं. ज्याला नरकयातना म्हणतात. महत्वपूर्ण बाब ही की बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. ह्या आपल्या आयुष्यातील घडामोडी. या घडामोडीत आनंद प्राप्त होणं वा ते जीवन आनंदात जाणं. या गोष्टी आपल्या कर्मावर आधारीत असतात. आपलं तरुणपणात कर्म चांगलं असेल तर आपल्याला चांगलं म्हातारपण मिळत असते. अन् बालपण हे पुर्वजन्मातील कर्मावर आधारित असते. आपलं पुर्वजन्मात कर्म चांगलं असेल तर बालपण चांगलं जाते. म्हणून कर्मच चांगलं करावं. ज्यातून बालपण, तरुणपण व म्हातारपण चांगलं जाईल. त्याचा तिटकारा व तिरस्कार वाटणार नाही. तसंच ते संपूच नये असे वाटेल. तेच स्वर्गासारखं वाटेल. यात शंकाच नाही.      

    अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०