धाकू नी बाबल्या हे इमानी होते. कामगारांवर त्यांचा चांगलाच वचक होता. जरा कोणी दुर्लक्ष हलगर्जीपणा करताना आढळला तर दोघेही त्याला फैलावर घेत. “तीन सीजन पुरणारा ह्या काम भाऊंच्या म्हेरबानीन मिळालेला हा. ह्या काम चांगला झाला तर भाऊंची पत वाढात नी आणकी आणकी कामा तेंका मिळती. ते तगले तर आपल्याक कायमचे रोजमुरो मिळात. तवा आपल्या घरचा समजून आंग मोडून काम करूक व्हया...... भाऊ काय सदी आमच्यार नदर करूक ऱ्हवणार नाय. पन आमी तेचे मुखत्यारी आसंव ... इला काय नी ग्येला काय असला हलगर्जीपान आमका खपणार नाय. आमका ह्या सांग़ॉची येळच येवक् देव नुको....... ” हे त्यांचं सांगणं असे. येण्या जाण्याच्या वेळा दुपारी जेवणं नी विश्रांतीची वेळ अगदी वक्तशीरपणे पाळली जाई. कामाचा झपाटा बघून भाऊ भलतेच खूश झाले होते. जेवताना तोंडी लावण्यासाठी अधून मधून फोडणीच्या मिरच्या, दोन तीन दिवसानी मडकी भरून ताक दिलं जायचं. पंधरवडा झाल्यावर आयतवारी कोंबड्याचं मटण देण्याचा भाऊचा विचार होता. तसं धाकू बाबल्याकडे बोलल्यावर त्यानी भाऊला चांगलंच सुनावलं. “ गडी पैरी काम करतहत ती काय म्हेरबानी नाय. खरा म्हणशातर ह्येंका कायमचा काम खंय मिळणार हा ? आता म्हणशा तर निक्ती सुरवाती झालेली हा. आमी दोगव् जण बारीक लक्ष ठेवन् ऱ्हवलाहाव म्हणून गडी पैरी आंग मोडून काम करतंहत... नायतर ह्येंच्या गांडीत लय मोडी हत........ ”
तोंडात साठलेली पानाची गुळणी थुकून बाबल्या पुढे बोलायला लागला. “ ह्ये हरामी तुमका कदी डबऱ्यात घालती तां कळनार पन नाय... ह्या रंगावर तुमी भुलो नुको नी अर्द्या हळकुंडान पिवळे होव नुको. मजुरीच्या भायर् येक तांबडे पैसो दुकू द्येव नुको...... येकदा फुकट खावची तीच व्हैवाट पडात..... अर्दा आदिक तरी काम मार्गी लागॉने....... सरकारात्सून तुमचे हिसाब येवने ..... मग्ये लय थोडा बगुया.... ” धाकू म्हणाला , “ तुमी गणेश चवतीच्या टायमाक बिनबूड हिसाब दिलास ना तरी सगळे खुस व्हती.... तुमी लोन्चा मिर्ची नी ताक पानी द्येतास ना ताच लय हा.... पन ह्येच्या फुडे आनकी काय जादाचा द्येव नुको...... तेना वायट् पायंडो पडता....... मान्साक जादा खावक् मिळाला ना की तेची चरबी नी गांड मस्ती वाडता....... काम नाय वाडणार तां उलटा कमी होयत्......... तुमी ललऊ आपले पाय जमिनीर घट ठेवन् ऱ्हवा..... तुमका परचित्च घेवची असात तर फुडचे पंदरा दिवस मिरचीचा फासूक पन दाकवू नुको...... मग्ये ह्येच कामगार कसे टोमने मारतात तां बगा, आज पावत खालानी त्येचो हगॉन गू झालो..... तेची याद नाय ऱ्हवनार ... ह्ये उल्टा आयकवती....... आमची मिर्ची लोन्चा बंद केलानी हा....... आता येवड्या चाळीस पन्नास माणसांक दोन फाका द्येवची म्हटली तरी दीड पायली मिरशांग लागता नी त्येच्या भायेर तेल मीठ म्होवरीचो सराजम लागता...पन खाणारो काय म्हननार.... मिरचीची दो दोन फाका देयत् ती पन बंद केलानी........ ” त्या जानपद कुळवाड्यांचे भावरथी नी दूर गामी विचार ऐकल्यावर भाऊ अक्षरश: सर्द झाले. त्यानी कान उघाडणी केल्यावर भाऊना वास्तवाचे भान झाले. एकेक दिवस पाठी पडतो आहे तसतसा खर्चाचा आकडा वाढत चाललेला आहे. पहिला टप्पा पुरा होवून खर्चाची रक्कम हाती येईतो खर्चाची नवीन त्रैराशीके मांडायची नाहीत नी धाकुच्या म्हणण्याप्रमाणे जमिनीवर पाय घट्ट रोवून रहायचं. असा पक्का निर्धार भाऊनी केला.
आत्तापर्यंत चाललेलं काम बजेट प्रमाणे आणि चोख पार पडत होते. जमेची बाजू म्हणजे कवळ दोनशे पेक्षा अधिक भारे आणि खुटवळ फुल्ल तीन ट्रक एवढे ढीग झाले होते. रस्त्याची रुंदी, कडेच्या चराची मापे भाऊ अधून मधून जातीनिशी मोजून बघीत असत. मुळात मापाची कांडी सरस अस्ल्यामूळे खोट काढण्या सारखे काहीच नव्हते. काम उठायला लागले तस तसे भाऊना हुरूप यायला लागला होता. दीडेक महिन्यान काहीच हासभास नसताना बळी भंडाऱ्याने भेटायला बोलावणं पाठवलं. नेहमीच्या प्रघातानुसार धाकू आणि बाबल्या याना सोबत घेवून संध्याकाळी काम उरकल्यावर भाऊ बळीला भेटायला गेले. “येवा भाऊनु.....” बळीने खड्या आवाजात हाकारले. मग होवऱ्याच्या दिशेने मोहरा वळवून त्याने आवाज दिला, “ग्ये धकट्ये , आयकल...... घाटे भाऊ इलेहत , तेंका वयच् साकार टाकून दूद हान बगू..... ”भाऊ ओशाळं हसत म्हणाले,“ बळी नाना, दूद कशाक..... फकस पानाची चंची द्येवा..... ” त्यावर गडगडाटी हसत बळी म्हणाला, “असा कसा, तिनसानच्या येळेक भटजी काका दारात इले...... तेच्यात तुमी म्हंजे आता सादेसुदे असामी ऱ्हवलेले नाय, तुमी मोटे कंट्रक्टर... मामलेदारापासून अंमलदारापावत तुमची वट.... मी आपलो फाटको भंडारी.... दारात चार दुबत्यो म्हशी हत, वंयच दुदाचो घोट घ्येवा नी गोड तोंडान घरी जावा.....”
भाऊंसाठी चांदीच्या मोठ्या ग्लासातून गरम दूध घेवून बळीची दुसरेपणाची मागारीण आली. गोरीपान, उंच आणि भरल्या अंगाची दागिन्यानी मढलेल्या रखमा भंडारणीला बघून भाऊ चक्रावूनच गेले. ती कायम सुपभर दागिने घालून वावरते असं ते ऐकून होते आज प्रत्यक्ष नजरेला आलं. गळ्यात बेंबटापर्यंत लोंबणारी पुतळ्यांची माळ. त्यातली एकेक पुतळी त्याकाळी असलेल्या ढबू पैशाच्या आकाराची नी दीड तोळ्याच्या भरीची सहज होती. जाडजूड गंथन , चौपदरी मोहनमाळ, तासाच्या भरीव मण्यांचा पूर्वकाळी राजेरजवाडे घालीत तसला पाचपदरी सर. दोन्ही दंडात सोन्याच्या वाकी, दोन्ही हातांमध्ये मनगटा पर्यंत सोन्याच्या बांगड्या पाटल्या . दोन्ही हातांच्या चारही बोटात आंगठ्या नी वळी आणि कमरेला चार आंगळं रूंद चांदीचा कमरपट्टा....... देवादिकांच्या चित्रात दागिन्यानी मढलेली लक्ष्मी दाखवतात तशी पन्नास -साठ तोळे सोनं अंगावर वागवणारी रखमा समोर उभी राहताच अकल्पित पणे नमस्कार हो वहिनी.... असे शब्द भाऊंच्या तोंडातून बाहेर पडले. त्यावर लाजून , “ग्ये बायमाज्ये.... भावजीनूं तुमी भट , आमी तुमच्या पाया पडायचा.......” असं म्हणत ग्लास ठेवलेली थाटली तिने भाऊंच्या हाती दिली. भाऊ हसत म्हणाले , “तिनसानच्या येळेक तुमी लक्षुमी सारक्यो सजोन इलास..... घरातली बाईल ही लक्षुमीच आसता..... ” मनोमन सुखावत रखमा माघारी वळली. गरमा गरम दूध पिवून भाऊ पान जमवायला लागल्यावर कसलीही लांबण न लावता बळीने थेट मुद्द्याला हात घातला. (क्रमश:)