घरातील शाळा व पालक शिक्षक

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे बदल बघायला मिळाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आले. शाळकरी मुलांसह इतर लोकांनाही लॉकडाऊन म्हणजे काय असते ? याची माहिती नव्हती. पण कोरोनामुळे लॉकडाऊन या शब्दासोबत कॉरंटाईन, पॉजिटिव्ह, निगेटिव्ह, कंटेंटमेंट अशा शब्दाचीही ओळख झाली. अगदी सुरुवातीला हा काहीतरी प्लेगसारखा महामारीचा भयानक रोग आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी घरी राहणे हेच सुरक्षित आहे, म्हणून सुरुवातीच्या काळात सर्वांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सरकारला सहकार्य केले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होती. मात्र जसे दिवस सुरू लागले तसे या कोरोनाविषयी लोकांच्या मनात असलेली भीती जरा कमी होऊ लागली म्हणून त्याचा परिणाम असा झाला की, एका महिन्यात जेवढे बाधित झाले होते तेवढे रुग्ण आज एका दिवसात सापडत आहेत. कोरोनाचा अटकाव न झाल्यामुळे त्याचा अनेक गोष्टीवर परिणाम झाला. उद्योगधंदे बंद झाले. वाहतूक सेवा बस आणि रेल्वे बंद झाली. तसे शाळा-विद्यालये देखील बंद झाली. एप्रिल महिन्यात शाळकरी मुलांच्या परीक्षा होणार होते ते सर्व रद्द झाले, उन्हाळी सुट्टी देखील संपली. जून महिना सुरू झाला की शाळेला सुरुवात होईल असे वाटले पण शासन कोणतेही रिस्क उचलायला तयार नव्हते आणि पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला राजी नव्हते. असे करता करता ऑगस्ट महिना देखील संपला पण शाळा सुरू होण्याची काही चिन्हे नाहीत.
गुरुविना शिक्षण आजपर्यंत कोणी विचारात घेतले नव्हते. पण या कोरोनाने गुरुविना शिक्षण घेण्यास सर्वाना मजबूर केले. कोरोना काळात पालक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरू बनले. शाळेत जाता येत नाही तर घरात बसून अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली म्हणून पालकांना त्यांचे शिक्षक बनणे गरजेचे झाले. यानिमित्ताने शिक्षक मुलांना शाळेत कसे सांभाळतात ? याची प्रचिती पालकांना नक्कीच आले असेल. शिक्षित, अशिक्षित, जागरूक किंवा जागरूक नसलेल्या अश्या सर्वच पालकांना या कोरोनाच्या काळात आपल्या मुलांसाठी थोडा वेळ द्यावाच लागत आहे. अनेक घरातून याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारीचे सूर ऐकायला मिळत आहेत तर काही ठिकाणी पालक आपल्या मुलांकडून चांगले काम करवून घेत आहेत. शिक्षक मंडळी नेहमी म्हणत असत की, शाळेतील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि खेळीमेळीचे ठेवण्यासाठी शिक्षक प्रेमळ असणे आवश्यक आहे. हेच तत्व आज घरासाठी लागू पडत आहे. घरातील वातावरण हसत खेळत ठेवले तरच मुले प्रसन्न राहू शकतात अन्यथा त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मुलांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी प्रेमळपणाने वर्तन ठेवून त्यांच्याकडून अभ्यासाचे काम करवून घ्यावे लागते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत त्याचा वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. शाळेचा जसा वेळापत्रक असतो त्यानुसार घरातील शाळा याचे वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी केले तर निश्चितच फायदा होऊ शकतो. सकाळची वेळ वाचनासाठी उत्तम असते म्हणून दोन तास मुलांना वाचण्यासाठी द्यावे. त्यात देखील रोजचा विषय ठरवून दिल्यास सर्व विषयांना न्याय देता येईल. त्यानंतर सकाळी दहा ते एक या वेळात ऑनलाईन अभ्यासासाठी राखीव ठेवावे. एक ते चार या वेळात मुलांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची मुभा द्यावी, जसे की टीव्ही पाहणे किंवा अन्य काही खेळ खेळणे. सायंकाळी चार ते सहा ही वेळ लेखन क्रियेसाठी द्यावे. सहा ते आठ या वेळात काही मैदानी खेळ घराच्या परिसरात खेळण्यास द्यावे आणि रात्री दहाला झोपी जाणे. असा वेळापत्रक आपल्या मुलांना पालकांनी तयार करून दिल्यास मुलांचा नित्यनेमाने अभ्यास होऊ शकतो. आज शिक्षकदिन त्यानिमित्ताने या कोरोना काळात शिक्षक झालेल्या अनेक पालकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ......!

- नागोराव सा. येवतीकर 9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111557513

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now