Quotes by पूर्णा गंधर्व in Bitesapp read free

पूर्णा गंधर्व

पूर्णा गंधर्व

@zonunzqz6284.mb
(22)

जोवर बुद्धिमत्तेवर भावनिकता विजय मिळवत राहील ; तोवर प्रगती आणि शांती साध्य होणार नाही.
★पूर्णा गंधर्व

-पूर्णा गंधर्व

Read More

डेटा विषाणू
कार्यालयीन कामासाठी , शिक्षण, मनोरंजन तथा संप्रेषणासाठी(communication) इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे. संप्रेषणाच्या अनेक माध्यमांमध्ये फेसबुक ,इंस्टा आदी अनेक माध्यमाद्वारे प्रसारित होणारी माहिती ,लेखन ,फोटोस व व्हिडिओस जर संयम व विवेकाने पारखले नाहीत तर तो डेटा विषाणू प्रमाणे ठरू शकतो.
बरीच माहिती ही अभ्यासपूर्ण ,प्रेरणादायी, उपयोगी व मनोरंजक असते ,यात शंका नाही. जी माहिती वादग्रस्त नाही, उद्बोधक आहे,सत्य आहे; ती स्तुत्य आहे. परंतु , काही पोस्टद्वारा करण्यात येणारे विश्लेषण, स्पष्टीकरण यांखाली कोणत्याही वैध वेब लिंक्स, संदर्भ ग्रंथ, मूळ पुस्तकांची /लेखकांची नावे आदी यांचा उल्लेख नसतो. (संदर्भावरून माहितीची वैधता ठरते)काहीवेळा अवैज्ञानीक ,कालबाह्य,असंबद्ध ,अतार्किक दाखले दिलेले असतात. हे त्या लिहिणाऱ्या/प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक मत ,निरीक्षण आणि जबाबदारी असते. परंतु साहजिकच माहितीच्या विश्वासार्हतेबाबत संदेह व संभ्रम असल्यास मूळ शास्त्रज्ञांचे सिद्धांत, मूळ संदर्भ ,धार्मिक ग्रंथ, संहिता यांचा पडताळा व अध्ययन करूनच माहितीचे स्वीकरण करावे, त्यास अनावश्यक अवधान व वेळ देऊ नये, श्रध्दा ,भावना दुखावू देऊ नये.
आपल्या लेखनाबद्दल वाद उत्पन्न होत असतील तर, त्या माहितीचे स्पष्टीकरण, वैध संदर्भ देणे ,अथवा ती माहिती डिलिट करणे ही लेखन कर्त्याची नैतिक जबाबदारी असते. व्हायरलच्या या युगात अशा विवादास्पद पोस्ट, माहिती प्रसारण आणि भावनिक आव्हानांमुळे समाज स्वास्थ्य बिघडल्याची उदाहरणे ही आहेत. अशा विवादास्पद, संदेह जनक महितीकडे वाद न घालता ,दुर्लक्ष करून संयमाचा परिचय द्यावा,स्वतः च्या वेळेचा आदर करावा. वस्तुतः कोणतीही तुलना प्राणी/पक्षी – मानव ,सून – मुलगी ,स्त्री – पुरुष ,निसर्गातील निर्जीव घटक – सजीव ही अयोग्य असते. (मानस शास्त्रात व्यक्तिभेद ही संकल्पना आहे) परंतु, काही सुधारात्मक परिवर्तनासाठी त्याचे उपयोजन केल्यास कुणा एका घटकाची तौलनिक हानी होणार नाही ,वा दुसऱ्या घटकाचे अवास्तव उदात्तीकरण होणार नाही याचे भान राखावे. प्रसारित होणारी चित्रे, व्हिडिओस याबाबतही विवेकबुद्धी जागरूक ठेवावी.
अनेक आदरणीय संत, लेखक, विचारवंत यांची ग्रंथसंपदा निः संशय श्रेष्ठ व कालातीत आहे.परंतु, या महान विभूतींनी (श्री व.पू.काळे, श्री पू.ल.देशपांडे ) त्यावेळी विशिष्ट संदर्भात /प्रसंगाला अनुसरून (कधी काल्पनिक कथा)लिहिल्या आहेत.त्याचा विपर्यास, चुकीचा संदर्भ घेणे आणि त्यावरून आता वाद घालणे हे त्यांच्या सद् अभिवृत्तीस व स्मृतींना यातना देणारे ठरेल. एखादी सामाजिक घटना, निर्णय यावर अभिव्यक्त होताना ,तज्ज्ञांद्वारा त्याची चिकित्सा, पार्श्वभूमी ज्ञात करून घ्यावी.निषेध, विरोध हा सार्थ ,निःपक्ष असावा. तारतम्य सोडून उन्माद अवस्थेचे प्रदर्शन करू नये.
माहिती ,भावना प्रकटीकरणच्या या प्रभावी माध्यमाचा संयमाने व आदर्श वापर करण्यावरून आपल्या ठायी असणारी सद् अभिरुची, सद् बुद्धी ,एकूणच निकोप व्यक्तीमत्व दिसून येते .
माझी वैयक्तिक धारणा मी लेखनातून कुणावरही लादत नाही. आपले लिखाण सर्वमान्य ,सर्वग्राह्य व्हावे हा अट्टाहास कशासाठी? महितीमधला तथ्यांश ,सत्यता आणि सद् हेतू मी पारखते. ओळींमागचा अर्थ मला उमगतो. माझ्या वैयक्तिक जीवनाची व सामाजिक जीवनाची मी सरमिसळ करीत नाही. स्वतः च्या व इतरांच्या ही privacy चा respect/ सन्मान करते. आपल्या ठायी असणारा माहितीचा संचय म्हणजे मला ज्ञान वाटत नाही.समाजाप्रती ते मार्गदर्शक, , प्रबोधक ठरावे तेव्हाच त्याची उपयुक्तता सिद्ध होईल.लाईक्स आणि स्टिकर्स च्या कलेक्शनपेक्षा समाजोपयोगी माहितीच्या प्रसारणामधून मिळणारा शुद्ध, सात्विक आनंद हा मला अनुपम्य वाटतो.
★पूर्णा गंधर्व

Read More

 

Desire/ कामना,

Maslo ,Garret, गोल्डसन आदी अनेक आदरणीय मानस शास्त्रज्ञांनी गरजा, प्रेरणा यांचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले आहे. जसे जन्मजात (Innate motives), biological जैविक प्रेरण यात तहान भूक, श्वसन ,उत्सर्जन, कामना, निद्रा आदी चा समावेश आहे. या सर्व गरजा सर्व सजीवांठायी नैसर्गिक असल्या व कामना हे जैव प्रेरण असले तारीहीमनुष्य या सजीवासाठी कामना पुर्ततेसाठी विवाह हा एकमेव वैध मार्ग;  न्याय, संस्कृती द्वारा निहित आहे . कारण, मनुष्यास इतर सजीवांहून भिन्न करणारा  बुद्धी हा अलौकिक घटक निसर्गानेच बहाल केलेला आहे. बौद्धिक घटकामुळेच  माणूस हा इतर पशुहून भिन्न किंबहुना श्रेष्ठ ठरतो. केवळ म्हणून प्रारंभिक अन्न साखळीत शेवटच्या स्थानावर असणारा मानव आज सर्वात वरच्या स्थानावर विराजमान आहे.

  याशिवाय ,श्वसन ,भूक ,तहान,निद्रा , उत्सर्जन या जैव प्रेरणांइतकी कामना ही  अत्यावश्यक तात्काल पुर्ती योग्य गरज  नाही. या ऊर्जेचे नियंत्रण, दमन, अन्य  विधायक मार्गाकडे रूपांतरण सहज शक्य आहे. मानसिक आरोग्य उत्तम असल्याचे ते एक साधारण लक्षण आहे. समाजसेवा, कला- कसब, वाङमय, शौर्य, खेळ, वात्सल्य, श्रध्दा भाव ,योग अशा ध्येयाने प्रेरित होऊन, अविवाहित वा वियोगाउपरांत संतुलित किंबहुना आदरणीय जीवन व्यतित करणाऱ्या थोर व्यक्ती(स्त्री, पुरुष) भूतकाळात आणि  वर्तमान काळातही आहेत.

   मनुष्यठायी असणाऱ्या सर्व उर्जाचे सकारात्मक रूपांतरण ,दमन वा अन्य सुयोग्य मार्गाकडे वळविणे याचे अद्ययावत ज्ञान प्राचीन संस्कृती आणि आधुनिक मानस शास्त्र या दोहोंना आहे. मूर्ती/वास्तू कला, काव्य ,श्रम ,व्यायाम, शौर्य ह्या विधायक मार्गाने श्रुंगार भावना उत्सर्जित करता येतात.

  पौगंडावस्थेतील मुलांचे स्वप्न रंजन, अतिरिक्त शारीर ऊर्जा,मानसिक उर्मी यांचा व्यय करण्यासाठी कथा /काव्य, मैदानी खेळ, विविध स्पर्धा, श्रम दान,सेवा, योगा यांचा समावेश त्यांच्या दैनंदिनीत करावा,त्यांना प्रशिक्षित करावे असे शैक्षणिक मनोविज्ञान सांगते.

  कोणत्याही नैसर्गिक क्षमता ,गरजा ,प्रेरणा या सुयोग्य ,समाजमान्य रीतीने अभिव्यक्त करणे,प्रगट करणे हे सुदृढ मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. सामाजिक आरोग्यसुद्धा याद्वारे अबाधीत राहते.

 म्हणूनच परंपरा असो वा विज्ञान मानवास संतुलित किंबहुना “माणूस “बनण्याचाच संदेश देतात.

★ पूर्णा गंधर्व

Read More

   विद्यापीठीय पदव्या, गुणवत्ता ,बुद्धिमत्ता(IQ)  यासोबतच यशप्राप्तीसाठी गरज आहे ती भावनिक बुद्धिमत्तेची.

 "Emotional intelligence as the ability to  sense , understand and effectively apply the power and acumen of emotions as a source of human energy, information and influence." Robert Copper and Arman Sawafs.

   योग्य ती स्व जाणीव ,चिंता ,तणाव यांचे व्यवस्थपन, अंतर्मनातील संघर्ष आणि समूहांतर्गत संघर्ष यावर मात करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेची गरज असते. याचा पाया बाल्यावस्थेत , विद्यार्थीदशेत घातला गेला पाहिजे .जेणेकरुन अपयशाने होणारे खच्चीकरण ,नशा, अपराधिक मानसिकता,आत्महत्या, पलायन आदि गंभीर समस्या भविष्यात उद्भवणार नाहीत. किशोरवय हा तर शारीरिक, मानसिक अवस्थाबदलाचा काळ .त्यावेळी भावनिक तटस्थता नसेल तर याचे परिणाम  जीवनावर दूरगामी होतात .कुटुंब ,समाजाव्यतिरक्त बालपणी सहाध्यायी व पुढें सहकारी, उच्च अधिकाऱ्यांशी समायोजन adjustment  करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता हवीच .

 म्हणून मुलांना आपल्या क्षमतांची ,मर्यादांची ओळख ,जाणीव करून उचित वर्तनासाठी प्रबलन reinforcement आणि चुकांचा परित्याग करण्यास शिकवावे. सुंदर स्वप्ने बाळगण्यात काही गैर नाही पण आपल्या आवाक्यातील ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करावा . अभिव्यक्ती  सादरीकरण मुळे सभाधारिष्टय निर्माण होऊन संकोच ,भीती,लज्जा दूर होईल .

  जीवनाप्रति ,समाजाप्रती सकारात्मक दृष्टी ठेवावी. प्रगतीच्या अनेक संधी तंत्रयुगात उपलब्ध आहेत म्हणून खचू नये. बदल  हा संरचनेचा स्थायी घटक आहे तो स्वीकारण्याची सज्जता ठेवावी . क्षोभ,  उद्रेक , अवसाद  नियंत्रित करण्याचे ध्यान, साधना हे पारंपरिक व समुपदेशन counselling , मानसोपचार हे वैद्यकीय उपाय घेण्यास संकोचू नये .

 अन्यथा ध्येय साध्यक्षमता, जिद्द असून तंत्रयुगात उपलब्ध आधुनिक साधने असूनही; अंतर्मनातील संघर्ष आणि ध्येय अनुकूल व्यक्तींच्या अभावामुळे  समीपस्थ लक्ष्य स्वप्न होऊन राहील . उत्तम बुध्यांक IQ लाभून ही emotional fool चा ठप्पा लागून यश हुलकावणी देत राहील 

पूर्णा गंधर्व

Read More

 . आजचा विषय एक स्व रचित रूपक कथेवरून सोपा करून सांगता येईल .एक राजा दोन जुळ्या मुलांपैकी एकाला सर्व कला आणि विद्या यांचे प्रशिक्षण देतो. दुसऱ्याला व्यापार आणि व्यवसाय प्रशिक्षण देतो .नंतर राज्य कारभार एकत्र मिळून संभाळण्यास सांगून वनात निघून जातो. पण राजा निघून गेल्यावर दोघे भाऊ राज्य अर्धे वाटून घेतात. कालांतराने एकाच्या राज्यात सुख ,समृद्धी आणि त्यांच्या पुर्ततेची साधने विपुल प्रमाणात येतात .राजा आंनदी होतो पण त्याचवेळी गुप्तचर बातमी आणतात ,की राज्यातले नागरिक नगर सोडून बाजूला  भावाच्या राज्यात जात आहेत. संपत्ति, सुख साधने उपलब्ध असूनही लोक नगर का सोडत आहेत? असे काय असेल आपल्या भावाच्या राज्यात? हे जाणून घेण्यासाठी राजा वेष बदलून भावाच्या नगरीत जाण्यास निघतो .अर्ध्या वाटेत आपल्या नगरीत वेष बदलून येत असलेला त्याचा भाऊ त्याला दिसतो. त्यालाही समान प्रश्न पडला आहे आणि तोही उत्तर शोधण्यासाठी आपल्या नगरीत येतो आहे ,असे त्याला समजते आणि तो आश्चर्य चकित होतो.

    या बोध कथेवरून मानवी मनाचे बरेच पैलु स्पष्ट होतात .आपल्याजवळ जे आहे त्यात संतोष न मानता दुसऱ्या कडील संचिता कडे मन धाव घेते. मानवी मनाची तुप्ती ही अज्ञाताकडे ,आप्राप्त ध्येयाकडे जाण्याची असते. ही अस्वस्थता योग्य मार्गाने वळविल्यास ;नवं निर्मिती कडे किंवा शोधन discovery घडवून आणते ,साक्षात्कार घडविते .यासाठी गरजेचे आहे की ध्येय प्राप्तीच्या आपल्या ईच्छा , अपेक्षाना योग्य वळण लावावे.

   दुसरा पैलु असा की , धन आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाच्या संतुष्टीसाठी आवश्यक आहेत . त्या योग्य रित्याही प्राप्त होऊ शकतात .त्यांपासून पलायन म्हणजे असंतृप्तता होऊ शकते. शिवाय दोन्ही भाऊ एकमेकांच्या सहकार्याने याची पूर्तता करू शकत होते .म्हणून सहकार्यात्मक वृत्तीला ध्येयप्राप्ती साठी महत्त्वाचे मानावे .

धन मिळविल्याने भौतिक गरजा पूर्ण होतात (अन्न वस्त्र निवारा आदी ) .सुखसोई ची पूर्तता झाल्याने दिव्य ज्ञानाच्या दृष्टीने मनुष्याची वाटचाल होऊ शकते. 

  शेवटी महत्त्वाचा बोध म्हणजे असूया , स्पर्धा , आणि इच्छे पासून मुक्त मन हाच खरा सुखाचा मौल्यवान खजिना होय .

◆ पूर्णा गंधर्व

Read More

 

Live in or leave it

स्वतः च अस्तित्व ,करिअर /भवितव्य निर्माण करण्यासाठी small town सोडून शहरांकडे येण्याची ओढ तशी जुनीच.पण जुन्या काळी मात्र थोडंसं बस्तान बसल्यावर ‘कुटुंब’किंवा ‘ मंडळी’ गावाकडून आणल्यावर सेटल झाल्याचा आणि जन्म सार्थकी लागल्याचा आनंद लाभायचा. त्यातही चाकरमान्याचा अर्धा जीव गावाकडच्या मातीत रुजलेला. भवितव्यापेक्षा पोटाचा प्रश्न मार्गी लागला हेच खरं कर्तृत्व वाटायचं. आता life style बदलली आहे.नैतिक मूल्यांपेक्षा पैशाचं मोल वाढले.

  पदव्या आणि टॅलेंट यांना शहरातच काय तो न्याय मिळेल, शहरात आपला गॉड फादर वेटिंग आहे अशी धारणा घेऊन ,हे स्थलांतरित पक्षी स्वप्नांच्या मुक्त नभातुन ,शहरांतल्या छोट्या खोल्यांमध्ये adjust होऊ पाहतात. जागेचा,जेवणाचा ,जीवनाचा संघर्ष. स्वप्नाळूपणाला झगमगती दुनिया, मोठी पॅकेजेस यांची भूल पडते. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेल्यांची sharing सुरू होते. मेट्स अँड बडीज अशी नवीन नात्यांची श्रेणी येथे आल्यावर समजते. My life, my rules अशी झिंग चढते. यश/अपयशाच्या संघर्षात sharing means caring असा गैरसमज होतो. शारीरिक ,भावनिक ,आर्थिक असा गुंता होतो. Live in चं आकर्षण वाटते. जबाबदारी शिवाय होणारी सोय. मग आधुनिकता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचा मुलामा चढवून त्यांचं justification दिलं जातं. Relationship मध्ये एकमेकांना space देणारी ,views चा respect करणारी कपल्स नंतर कधी serious होतात किंवा एक पार्टनर emotionally involved होतो. सुरुवातीचा who cares!!! वाला attitude जाऊन आता अधिकार गाजविणे, काळजी ,म्हणूनच भांडणे सुरू होतात. विभक्त होण्याचा पर्याय तर स्वतः च दिलेला असतो. वैयक्तिक समस्या आणि व्यावसायिक /करिअर नुकसान यांचं बहुधा सख्य  असावे.  दोन्ही सोबत येतात. व्यसने, पार्टीज ,शो ऑफ  यांना “चलता हैं ” बोलून दुर्लक्ष किंवा क्लास दिला जातो.

  लंबी उडान भरण्यासाठी निघताना  ,घरातल्याना आधीच छोटी सोच समजून दूर लोटलेलं असते. एकाच छता खाली असताना देखील आपल्याला समजून घेत नाहीत अशी तक्रार असतेच.आणि आता तर समोर one way असतो.  लिव्ह इन मधले कुणी एक तो/ती just leave it…. म्हणून झटकून निघून जातो. एखादी better opportunity किंवा whatever..

  मग सुरू होतं पतन.  आमिष दाखवून फसविल्याचे आरोप- प्रत्यारोप ,नैराश्य आदी मानसिक आजार, व्यसनाधीनता, कधी आत्मघाताचा प्रयत्न.

 प्रत्येक वेळी असंच घडेल ,असे नाही.येथे कोणत्याही नात्याचे समर्थन अथवा विखंडन करण्याचा माझा उद्देश नाही.  आपले नातं कसे आणि कुणाशी ,कोणत्या प्रकारचे असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. फक्त एकट्या पडलेल्या, broken relationship face करणाऱ्या कुणालाही घरचे, परिजनांनी स्नेह ,सहाय्य केल्यास त्या फेज मधून ते सहज बाहेर येऊ शकतील.तोंड फिरवल्याने ,कर्माची फळं भोगायला लावल्याने आपण त्याना गमावून बसू .व्यसनमुक्ती केंद्र, मानसोपचार यांची उपलब्धता करून द्यावी. आपले प्रियजन दूर असले तरीही संपर्काचा आणि मायेचा धागा तुटू देऊ नये. त्यांचा हितोपदेश हेच प्राथमिक समुपदेशन होय.

  पैसा, प्रसिद्धी आणि पॅकेजच्या मागे धावताना  बेगडी जीवनाची भुरळ पडू न देता, स्वतः चे आणि समाजाचे स्वास्थ्य टिकविणे ही आवश्यक आहे. जर यश प्राप्ती नंतर अपराधबोध ,क्षतीचे भय(नुकसान) आणि असुरक्षितता वाटत असेल तर तो पराभवच समजावा. आपले वर्तमानातील निर्णय, चयन उज्ज्वल भविष्याला आकार देतात. योग्य वेळी नकार, अपयशाचा स्विकार, चुकीचा सुधार आणि माघार हे निकोप जीवनासाठी आवश्यक असते. संपत्ती, प्रसिद्धी ,अधिकार, सत्ता हे यशस्वीपणाचे बाह्यस्वरूप मात्र आहे.खरं सौख्य  प्रियजनांच्या सोबतीत आणि आत्मसंतोषात आहे.


#पूर्णा गंधर्व ©

Read More

 

E love

  पूर्वीच्या हळव्या प्रेमाच्या भावना हातात हात गुंफणे , गालावरचं स्मित,लाजून पायाने माती उकरणे आता कधीच मातीआड झालंय.  आता चॅटिंग ,डेटिंग ,”मिटिंग” आणि finally break up ,who cares!!! प्रेमाच्या आणाभाका out dated झाल्यात. मॅरेज मटेरियल प्रेमवीरांना वाईट दिवस आलेत. होकाराची वाट पाहणे, झुरणे, विरह नावाच्या waiting साठी वेळ नसतो. कुणाशीही मनसोक्त गप्पा मारणे म्हणजे ‘’ तसलं काहीतरी असलं पाहिजे ‘’ ,(इथे हसणे, खिदळणे याला न मागता ‘प्रसिद्धी ‘प्राप्त होते.)  या शंका कुशंकांमध्ये हिंदकळणऱ्या  e love ने मैत्रीला टॅग केलंय. एखादया नखरेल  नटविनं साध्य सुध्या गृहिणीला सौंदर्य स्पर्धेत हरवावं तसं. या e love ने चितपट केलंय मैत्रीला.  एकमेकांचे चेहरे ही धड न पाहिलेल्या facebook वरच्या बघ्यांच्या गर्दीला नाव मित्रता यादी/ friends list. चॅटिंग ,डेटिंग वगैरे वगैरे…म्हणजे सर्वकाही just friends!!!

आजकाल पार्क,बीच ,मूवी ,कॉफी जुनं झालं.  कोरोनाने तर सारं इतिहासजमा केलं. बागेतला बाक ,गच्चीतली खुर्ची, दोस्तांचा कट्टा  electronic झाला ,आणि तेथेच या e love ने मैत्रीला खिंडीत गाठले आणि फसवले.  मैत्रीचा मुखवटा घालून दशावतारी सोंग निघाली. कधी मित्रांची नावं घेऊन बनावट संदेश ,पैशांची,मदतीची याचना ,बदनाम मात्र मैत्री. हे  e love मधून आलेले संशयाचे  virus मेंदू पोखरून संसारात घुसले.  मित्र /मैत्रिणींशी मारलेल्या निगुतीच्या गप्पा,  सुंदर चित्र ;चरित्र बिघडवू लागली. परिचितांच्या गोतावळ्यात मैत्रीचा कोपरा म्हणजे विरंगुळा, हौशीचा क्षण नसून “ भलतंच काहीतरी” ठरू लागले. अधिकार, ममत्व, रुसवा, समानता या सर्वांचा परिपाक म्हणजे मैत्री. पण आता ती ‘प्रेमाच्या आधीची पायरी’ इतकीच महत्वाची. मैत्रीच्या वेष्टनात ‘इश्कवाला लव’ लपवायला शिकवून मैत्रीच्या घरांदाजपणाला सिनेमावाल्यांनी देखील चूड लावली आहे.  मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं नवं नातंही त्यांनीच निर्माण केलं. अगदी दोन देशांच्या सीमारेषेएवढाच तो प्रश्न ही शेवटपर्यंत ज्वलंत ठेवता येतो म्हणून असेल.
अनेक वर्षांच्या serious relationship च्या फुग्याला मैत्रीची टाचणी टोचून हवा काढून टाकण्याचा सराईतपण आल्यावर प्रोफेशनमध्ये मुरल्यासारखं वाटत असावे.पण म्हणूनच खऱ्या मैत्रीची बारशाच्या वेळीच वधु परीक्षा सुरू होते.संशयाच्या उन्हात करपून जाते,  मनातल्या रानात एकटी पडते.

    खरी मैत्री असते ,अंगणातल्या फुलझाडासारखी .तुमच्या संसारात न येता ,सावली धरते,वाटेवर फुलांचा सडा टाकते. म्ह्णूनच, ,मैत्रीला बहरूदे मैत्रीच्या जागी. मनाच्या एका कोपऱ्यात अबाधित राहूदे  तिचं स्वातंत्र्य आणि पावित्र्य, अगदी तुळशी वृंदावनासारखं!!!

(माझ्या प्रिय रुसलेल्या मैत्रिणी साठी)

©पूर्णा गंधर्व

 

Read More

सावध व्हा ,ज्या गुन्हयातून आरोपीची कधीच निर्दोष मुक्तता होत नाही ,तो म्हणजे प्रेमाचा गुन्हा.
#पूर्णा गंधर्व

-पूर्णा गंधर्व

Read More