Two sons from two daughters in Marathi Short Stories by Trupti Deo books and stories PDF | दोन कन्यादानातून मिळालेले दोन पुत्र

Featured Books
  • म्युट नवरा

    "'म्युट' नवरा" “तो बोलतो… पण त्याच्या मौनात”कधी कधी...

  • विहीर आणि पोहरा

    गावाच्या शेवटच्या टोकाला एक साधी, पण खोल विहीर होती. विहिरीभ...

  • थर्ड डिग्री

                 थर्ड डीग्री            --------------         ...

  • मोबाईल

      रोजच्या सवयीप्रमाणेच आजही रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्...

  • रात्र दोनची जन्मकथा

    "रात्र दोनची जन्मकथा"---१. प्रारंभ – रात्र आणि रस्तारात्रीचे...

Categories
Share

दोन कन्यादानातून मिळालेले दोन पुत्र

कथा: दोन कन्यादानातून मिळाले दोन पुत्र.

गणपतराव आणि रमाबाई काळे यांचं छोटंसं पण प्रेमळ जग होतं. गावाच्या शाळेत दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं घर म्हणजे ज्ञान, साधेपणा आणि मायेचा संगम. परिस्थिती फारशी सुस्थितीत नव्हती, पण नात्यांतली श्रीमंती त्यांच्याकडे मनसोक्त होती.
 एक साधा आयुष्य पण आनंदाने जगत होते. आनंदाचा कारण म्हणजे

त्यांच्या संसारातील.दोन गोंडस मुली – संध्या आणि नीला.पण गणपतरावांच्या मनात मात्र एक सल लपलेला होता – “मुलगाच नाही आपल्याला… म्हातारपणाचं काय?” पण रमाबाई त्यांना सावरत म्हणायच्या, “आपल्या मुलीच आपला आधार बनतील. आपण त्यांना घडवूया असं की जग आपल्याला म्हणेल – धन्य आहेत ही पोरं आणि त्यांचे आईवडील!”

संध्या आणि नीला यांच्या लहानपणी घर किलबिलाटानं गजबजलेलं असायचं. दिवाळीला दोघी रांगोळी काढायच्या, उन्हाळ्यात बर्फाच्या गोळ्या विकायला हट्ट करायच्या. रमाबाई दिवसभर शाळा, घर आणि पोरींची काळजी यात रमलेल्या असायच्या.ते बालपणाचा विश्व वेगळा होत.

गणपतराव प्रत्येक रात्री झोपताना पोरींना गोष्टी सांगायचे. एकदा संध्या म्हणाली, “बाबा, भाऊ असता तर खेळायला मजा आली असती ना?” त्यावर गणपतराव थोडं गप्प झाले. रमाबाईनं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि कुशीत घेतलेलं ते वाक्य त्यांना कायमचं आठवत राहिलं – “आपल्या मुली आपली मुलं ठरतील बघा.”

संध्या अभ्यासात चुणचुणीत होती. कविता लिहायची, निबंध स्पर्धा जिंकायची. तिचं स्वप्न होतं – शिक्षिका व्हायचं. नीला मात्र विज्ञानाच्या दुनियेत रमली होती – इंजिनिअर व्हायचं तिचं ध्येय होतं. घरचं आर्थिक गणित कोलमडत होतं, पण रमाबाई म्हणायच्या, “कर्ज करेन पण पोरींचं शिक्षण थांबवणार नाही.” दोघींच्या शिक्षणाचा स्वप्न मी पूर्ण करेन.

गणपतरावांनी कधी , कधी रात्री शिकवण्या घेतल्या, पण पोरींच्या पुस्तकातली एकही ओळ न चुकता भरली गेली.मुलीचं आहे म्हणून त्यांच्या शिक्षणातत्यांना काही कमी पडू दिल नाही.त्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे.शिक्षण पूर्ण झालं.

संध्या शहरात शिक्षक झाली आणि तिचं लग्न शरद नावाच्या समंजस शिक्षकाशी झालं. नीला इंजिनिअर झाली आणि तिचं लग्न सागरशी – एका IT इंजिनिअरशी झालं. दोघंही जावई एकमेकांहून सरस – समंजस, नम्र आणि घरात माणूसपण जपणारे.

लग्नाच्या दिवशी रमाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा गणपतराव म्हणाले, “रमा, बघ, आपण दोन कन्यादान केलं. देव माणसं ओळखून देतो. आपली परीक्षा घेतो, पण मग अशी फळं देतो की हृदय भारून येतं.”

वर्षं सरत गेली. घर आता शांत झालं होतं. गणपतराव थोडं थकले होते. रमाबाईंच्या गुडघ्याला त्रास सुरू झाला. एक दिवस गणपतरावांना अचानक चक्कर आली. रमाबाई घाबरल्या. संध्या आणि शरद काही तासांत पोहोचले. शरदनी सगळं हॉस्पिटलचं काम हातात घेतलं.

“आई, तुम्ही फक्त बाबांची काळजी घ्या. बाकी मी बघतो,” शरद शांतपणे म्हणाला.

नीला आणि सागरही तात्काळ परतले. सागरने व्हीलचेअर, फिजिओथेरपी, औषधांची यादी – सगळं काळजीपूर्वक पाहिलं. नंतर परत रोज दररोज संध्याकाळी तो व्हिडीओ कॉल करून बाबा-माईंची विचारपूस करत राहिला.

गणपतराव एका संध्याकाळी म्हणाले, “हे जावई नाहीत ग रमा! हे तर आपलेच मुलंच आहेत. आपण देवाला म्हणायचं नाही की आपल्याला मुलगा नाही म्हणून. पण आपल्याला एक ऐवजी दोन मुलं दिले देवाने.

. खरेखुरे. ज्या विश्वासानं आपण कन्यादान केलं, त्याच विश्वासानं त्यांनी आपलं आयुष्य आपलं मानलं.”

एक दिवस संध्याच्या घरी सण होता. गणपतराव आणि रमाबाईही तिथे होते. परी, शरद-संध्याची मुलगी, रमाबाईंच्या कुशीत खेळत होती. शरद त्यांच्या पायांजवळ बसून म्हणाला, “आई, आज तुमचं औषध वेळेवर घेतलं ना?” रमाबाई हसून मान डोलावतात.

त्या क्षणी त्यांचं मन भरून आलं. डोळ्यांतून हळुवार पाणी ओघळलं.

“दोन कन्यादान केलं... पण आज वाटतं की दोन पुत्र लाभले आहेत. हे नातं रक्ताचं नाही, पण प्रेमाचं आहे. मी जर पाठीवर हात ठेवला असता, तर सागर आणि शरद माझा हात धरायला आधीच उभे असते. .”

आता दोघेही वृद्ध दाम्पत्य रोज संध्याकाळी अंगणात बसतात. परी आजीच्या केसात फुलं माळते, शरद आणि सागर रोज व्हिडीओ कॉल करतात, सणासुदीला हजेरी लावतात. कोण म्हणेल की “मुलगाच नाही”?

गणपतराव आज एका कार्यशाळेत बोलताना म्हणाले,
“लोक विचारतात – ‘तुमचं वय झालं, आधारच काय ?’

“माझ्या घरी मुलगा नाही… म्हणून लोकांना वाटायचं – म्हाताऱ्या झाल्यावर कोण पाणी देणार ह्यांना?
पण मी सांगतो – दोन कन्यादान केलंय मी! आणि त्या कन्यादानातून आम्हाला दोन पुत्र लाभलेत!
हो, जावई म्हणता त्यांना जग… पण ते आमचे मुलगेसारखे उभे राहिलेत.

एका वेळेस माझी जुनी गाडी विकली… पोरींचं शिक्षण थांबू नये म्हणून.
आज तीचं पोरी आणि त्यांचे नवरे, आमचं म्हातारपण सांभाळतायत.
दोन पायांनी उभं राहायला एक मुलगा लागतो म्हणतात… मला चार खांद्यांची साथ मिळाली!

म्हणूनच सांगतो –
'कन्यादान' हे देणं नाही…
ते ‘पुन्हा लाभलेलं मातृत्व आणि पित्याचं भाग्य’ असतं…!”

गणपतरावांचं हे वाक्य संपेपर्यंत सभागृहात एकदम शांतता पसरली.

आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला… पण त्या टाळ्यांमध्ये एक गलबललेला आदर, एक नम्र नतमस्तक होणं दडलेलं होतं. मी म्हणतो, ‘आहे ना! दोन कन्यादानातून आम्हाला दोन पुत्र मिळालेत!’”

कधी कधी, कन्यादान हे केवळ परंपरा नसतं... ते भविष्यात मिळणाऱ्या आधाराचं बीज असतं.

आज समाजात असे जावई फार कमी असतील,
पण जे आहेत — ते म्हणजे त्या घरासाठी देवाचं वरदानच!

"म्हणूनच, ज्या घरात जावई ‘मुलग्याच्या’ जागी उभे राहतात,
तिथं नात्यांची मुळे खोल जातात,
आणि प्रेमाचं वटवृक्ष उभं राहतं —
हात धरायला सावलीसारखं, आणि ओलावा द्यायला मायेच्या पावसासारखं!"

सौ तृप्ती देव

भिलाई छत्तीसगड