कांदे पोहे
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला साधे असतात... पण त्यात दडलेली भावनांची खोली इतकी असते की काळजात घर करून जातात.
"पाहणं" – हा शब्द जरी उच्चारला तरी घरात एक वेगळीच उत्सुकता, साशंकता, अनामिक ओढ आणि थोडं चिंतेचं सावट पसरतं.
पण त्या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट मात्र नेहमी असते — कांदे पोहे.
हो, फक्त पोहे नाहीत... कांदे पोहे.
जणू पाहणं म्हणजे केवळ दोघांना एकमेकांना पाहणं नाही, तर पोह्यांच्या निमित्ताने एकमेकांच्या स्वभावाची, चवांची, भावना ओळखण्याची पहिली वाटचाल.
पाहण्याचा कार्यक्रम घरात उत्साहाचं, आनंदी वातावरण होतं. दिवाणखान्यात पाहुणे अगदी वेळेत येऊन स्थानापन्न झाले होते. सुमनच्या आई वडिलांनी त्यांचे स्वागत केलं. गप्पा ओघ सुरू झाला होता. पण लक्ष सगळ्यांचा
सगळे जण सुमनची वाट बघत होते. आई-बाबा, थोडेसे संकोचलेले, थोडेसे आनंदी.
सुमनने दारात उभी राहून सगळ्यांना गोड हसत स्वागत करत नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर सौम्यता होती. ती नजरेनं आईकडे काहीसं विचारतच आत वळली. काही वेळाने ती पुन्हा हळूहळू बाहेर आली – पण यावेळी हातात पोह्यांनी भरलेला ट्रे होता. सुवासिक फोडणीचा वास घरभर दरवळला.
ती एकेक करून सगळ्यांच्या हातात कांदेपोह्याची प्लेट देत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक नम्रपणा आणि आपलेपण दाटून आलं होतं.
तेवढ्यात मुलाच्या आजी – साधारण सत्तरीच्या, पण तशाही वयात डोळ्यांत खट्याळ चमक असणाऱ्या – त्या विचारू लागल्या,
“अगं बाई, या पाहण्याच्या कार्यक्रमात पोह्यांचं एवढं महत्त्व असतं ते कशासाठी गं? काय विशेष असतं या कांदेपोह्यांत?”म्हणजे आमच्या काळात ही कांदे पोहे हा पाहण्याचा प्रोग्राम असायचं आणि आजही. तुला काय वाटत? आजच्या पिढीची काय विचार आहॆ?
सुमन थोडीशी लाजली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या लाजेपलिकडे एक सजगता होती – विचारांची, जाणिवांची. ती थोडीशी पुढे सरसावली आणि म्हणाली:
“आजी, हे कांदेपोहे म्हणजे फक्त एक पदार्थ नाही. ही एक भावना आहे... एक प्रतीक आहे जुळणाऱ्या नात्याचं.
पाण्यात भिजलं की नरम होतात , पण त्याचा स्वतःचा पोत, त्याचं मूळ स्वरूप कायम राहातं.
जसं नव्या नात्यांतही होतं – आपल्याला लवचिक व्हावं लागतं, समजूतदार व्हावं लागतं… पण त्यातही आपलं ‘स्वत्व’, आपली ओळख जपणं तितकंच महत्त्वाचं असतं.
कांदा – डोळ्यात पाणी आणणारा, पण चव वाढवणारा. प्रत्येक नात्याला थोडासा संघर्ष लागतोच ना?
भाजलेले शेंगदाणे – खुसखुशीत, थोडे खरडे वाटणारे, पण खरेखुरे… जसे माणसांचे गुण-दोष.
लिंबाचं आंबटपण – जरा झणझणीत, पण जिभेवर उठून राहणारं – जसं काही क्षणांचं मतभेद.
साखरेचा गोडवा – छोट्या क्षणांतलं प्रेम.
मिरचीचं तिखटपण – संवादातला थोडासा खवखवट पण जिवंतपणा.
आणि वरून कोथिंबीर – सौंदर्य. आणि त्यावरची फोडणी – म्हणजे आई-वडिलांच्या, सासरच्या संस्कारांची चव.
या सगळ्या वेगवेगळ्या चव एकत्र आल्या, तरी त्या एकमेकांवर कुरघोडी करत नाहीत… उलट, एकत्र मिसळल्यावर एक सुंदर, सुसंवादी चव तयार होते – जशी आयुष्याची थाळी.
म्हणूनच, लग्नानंतरचं आयुष्यही असंच असावं – वेगवेगळ्या स्वभावांचं, पण एकजीव, एकत्र, आणि पूर्ण!”
ती बोलून थांबली तेव्हा काही क्षण खऱ्याखुऱ्या शांततेचे होते. एक गहिवर सर्वांच्या मनात उसळून गेला. आजी हसल्या. त्या हळूच म्हणाल्या,
“बाळा, तू पोहे नाही वाटलेस... तू तर आयुष्य वाटलंस! एवढा विचार करणारी सून मिळणं म्हणजे आम्हा म्हाताऱ्यांचं भाग्य. जवळचा मुहूर्त ठरवाच. उगाच वेळ नको घालवायला.”
हळूहळू एकेक चेहरे खुलले. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. सुमनने नकळत जे दिलं होतं – ते पोहे नव्हते, ते विश्वास होतं.
पोह्यांसारखं मनही कधी कधी भिजतं – आठवणींमध्ये, नात्यांत, भावना ओलावतात. पण खरं कौशल्य असतं ते – त्या ओलाव्यात आपली गरिमा टिकवून ठेवण्यात.लग्नाच्या आनंदाची साक्षी
आजचा हा आनंदाचा, उत्सवाचा आणि नव्या जीवनाच्या सुरुवातीचा दिवस आहे.
मुलगा आणि मुलगी, दोन कुटुंबांची, दोन आत्म्यांची भेट होतेय. त्यांच्या जीवनात नवी गोडी, नवी चव येतेय.
या लग्नाच्या कार्यक्रमाला एक खास महत्त्व आहे — कांदे पोहे!
हो, कांदे पोहे जेवणाचा एक सोपा पण गोड पदार्थ, जो केवळ भूक भागवतो असं नाही, तर आपल्या संस्कृतीत लग्नाच्या अनेक क्षणांची साक्षीदार आहे.
म्हणूनच आजही कांदे पोह्यांचे महत्त्व आहे.
म्हणून जेव्हा कोणीतरी विचारतो, “कसं ठरलं तुमचं लग्न?”, उत्तर असतं — “कांदे पोहेचा कार्यक्रम झाला!”
कारण कांदे पोहेच्या साक्षीनेच दोन मनं एकजीव होतात, आणि संसाराला गोडवा येतो!
कधी कधी एक साधा कांदापोहेचा घाससुद्धा, दोन अनोळखी जीवांमधलं अंतर मिठीत बदलतो.
तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड