आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेनला अजून थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही चौघं तिथेच एका बाकावर थांबलो.
तेजी आणि राज एका बाजूला एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मी त्यांना विचारलं, “चहा पिऊया का?”
ते दोघं काहीच बोलले नाहीत. कदाचित त्यांच्या मनात लग्नानंतरचं आयुष्य, जबाबदाऱ्या आणि घरच्यांचा विचार चालू असावा. मीही त्यांना त्रास न देता तिथल्याच एका टपरीकडे चहा घ्यायला निघालो.
माझ्यामागे वरषा आली. "माझ्यासाठी नाही विचारलंस चहा?" ती थोड्या मिश्कील पण हळुवार स्वरात म्हणाली.
"अरे, सॉरी… लक्षच नव्हतं. थोडा वेगळ्या विचारात होतो," मी थोडं लाजून म्हणालो.
ती हसली — तसं सगळंच जरा हलकं वाटलं.
चहा घेतला, आणि आम्ही दोघं गप्प बसलो.
ती राज आणि तेजीकडे पाहात म्हणाली, “खूप सुंदर दिसतात दोघं, नाही का?”
मी मान हलवली. बोलायचं काही उरलं नव्हतं.
मग ती माझ्याकडे पाहात थोड्या गंभीर सुरात म्हणाली,
“एक गोष्ट सांगू, आकाश?
प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो.
जो दुसऱ्याच्याच प्रेमात आहे, त्याच्यामागे धावण्यात शेवटी फक्त त्रासच मिळतो.”
मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत ना उपहास होता, ना अती सहानुभूती — फक्त समजूत होती.
त्या एका वाक्यानं माझ्या मनात फारसा गोंधळ कमी झाला.
कधी कधी आयुष्य आपल्याला थांबायला सांगतं — थोडा वेळ घ्यायला, स्वतःसाठी.
चहा संपला. थोड्याच वेळात त्यांच्या ट्रेनची घोषणा झाली. राजचा मित्र तिथे आला. त्यानं त्यांना तिकीट दिलं, थोडे पैसेही दिले आणि पुढचं काय करायचं, कुठे उतरायचं, हे सगळं स्पष्ट केलं.
राज आणि तेजी दोघंही ट्रेनमध्ये चढले. ते त्यांच्या जागेवर बसले.
मी खिडकीपाशी गेलो.
“काळजी घ्या. काही लागलं तर फोन करा,” एवढंच बोललो.
ते दोघं हसून मान हलवली.
ट्रेन हलली… आणि हळूहळू माझ्या डोळ्यासमोरून त्यांच्या चेहऱ्यांचा फ्रेम दूर जात गेला.
मी काही वेळ तिथेच थांबलो. एकटाच एका बाकावर बसून राहिलो.
तेवढ्यात पाऊस सुरू झाला.
मी हललो नाही. अंग भिजत होतं, पण मन... ते आधीच पुसट झालेल्या आठवणींमध्ये कोरडं होतं.
पावसाच्या थेंबांनी फक्त शरीर ओलावलं होतं — मनावर त्यांचा काहीही परिणाम नव्हता.
आजचा पाऊस मला जरा वेगळा वाटत होता. नेहमीसारखा नव्हता.
आजचा पाऊस बाहेर होता, पण माझ्या आत शांतता होती. त्रास नव्हता, रडणंही नव्हतं — फक्त एक शांत स्वीकार.
पाऊस अजूनही थांबला नव्हता. मी तसाच बाकावर बसून होतो. शरीर भिजलेलं होतं, पण मन त्याहूनही अधिक ओलावलेलं होतं. डोक्यावर पावसाचे थेंब पडत असताना, अचानक सावली जाणवली.
वर्षा माझ्या डोक्यावर छत्री धरून उभी होती.
"एवढं भिजतोस काय? चल उभा राहा," ती म्हणाली.
मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा गंभीर नव्हता, पण सहानुभूतीनं भरलेला होता.
मी उभा राहिलो. छत्रीखाली आम्ही दोघं थोडंसं एकमेकांशी भिडत उभे होतो. माझा हात तिच्या हातात गेला, नकळत.
तीनं सोडलाही नाही.
त्या क्षणी, माझ्या मनात तिच्याबद्दल जे काही पेरलेलं होतं — एक आपुलकी, एक समजूतदारपणा, आणि आता... प्रेमाची पहिली जाणीव — ते सगळं हळूहळू पाण्याच्या थेंबांसारखं स्पष्ट होत गेलं.
तेजी गेली होती. तिच्यासोबत गेलं होतं माझं भूतकाळाचं प्रेम.
आता छत्रीखाली जे उभं होतं... ते होतं वर्तमान — आणि कदाचित भविष्य.
मी तिचा हात हळूच सोडला.
छत्रीखाली उभं असलेलं ते शांत सावलीचं जग जणू एका क्षणात दूर सारलं.
"वर्षा... मला माफ कर. तू खूप चांगली आहेस. पण... माझं मन आजही तीथेच आहे — तेजीकडे.
मी तुझ्यावर अन्याय करू इच्छित नाही.
माझं प्रेम... अजूनही तिच्यासोबतच आहे."
मी तिला सरळ आणि प्रामाणिक सांगितलं.
ती काहीच बोलली नाही. फक्त माझ्याकडे पाहत राहिली. डोळ्यांत थोडासा धक्का, थोडसं ओझं, पण कुठेही राग नव्हता.
फक्त एक शांत स्वीकार होता.
मी वळलो. चालत तिथून निघून गेलो.
पावसाचे थेंब अजूनही पडत होते. आता माझ्या डोक्यावर छत्री नव्हती. पण त्याची गरजही नव्हती.
मागे वळून पाहिलं…
ती तिथंच उभी होती — त्याच छत्रीखाली, माझ्या दिशेनं पाहत.
तो क्षण… न बोलता सगळं सांगून गेला.
कधी कधी काही माणसं आपल्याला मिळण्यासाठी नसतातच...
फक्त आपलं मन समजून घेण्यासाठी येतात.
तेजी गेली होती.
वर्षा थांबली होती.
आणि मी... त्या पावसात भिजत, स्वतःला शोधत पुढे निघालो होतो.
समाप्त.