.
कथा: "एक साधं कौतुक…"
"अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे , कालचा भात उरलाय अजून," सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहॆ ते पण लावून ठेव.
"हो आई, लक्षात ठेवलंय."
सुनबाईने सौम्य हसून उत्तर दिलं.
ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण , नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.
पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं.
नविन जवाबदाऱ्या. नविन घर सगळ व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळ नवन.
त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —
"मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं."
ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलं.
तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,
"सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा."
सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले.
"म्हणजे… खरंच?"
"हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती."तूझ्या हाताला चव आहॆ. तुझी आई सुगरणच आहे ना?
ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.
पहिल्यांदा, एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं.
त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं.
"माझं काम कुणीच ओळखत नाही," ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.
त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांच्या पाठ थोडी वाकली होती,सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली .
"आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझा तर दमछाक होतो, पण तुमचं हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे."
सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या.
"अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीये."
"सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं."
सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.
त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला.
"घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस."
कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला.सुनबाईने एक दिवसशेजराच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
"इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस!"
तो थोडा गोंधळला. पण हसला. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.
दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या.
मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं.
सासूबाईंनी भांडं हातात घेत म्हणाल्या,
"तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे ह्या रंगांत."
ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं.
ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, "तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असं आहे!"
आणि एक संध्याकाळ…
सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते.
अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं…
सुनबाईच्या एका वाक्याने —
"बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल!"
त्यांनी खळखळून हसत पेन उचलला,
ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली.
हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…
जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं.
जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.
जिथं प्रत्येक वाक्यात "मी सांगितलं होतं" ऐवजी, "मस्त केलं!" असं ऐकायला यायचं.
घरात एक नवीन वळण आलं होतं.
घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं.
एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा.
सासूबाई म्हणाल्या,
"सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगते का?"
"सांगा ना आई!"
"मी लग्न होऊन ह्या घरात आले, तेव्हा तुझी आजचे सासू म्हणजे माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचं नाही म्हटलं."
"मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना?"
"नाही गं. तेव्हा असं वाटायचं – 'आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको.' पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता."
सुनबाई शांत झाली.
सासूबाई पुढे म्हणाल्या,
"म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं."
त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं:
“कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे…
ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे."
काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या.
"ताई, माझी गोजिरी कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीये. ऐका ना."
गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली,
"अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस."
मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली.
सुनबाईने तिला जवळ घेतलं.
"अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच, छान वाटली."
गोजिरीचे डोळे चमकले.
सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –
"बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय."
त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –
“तू छान केलंस…”
“अगदी बरोबर वेळेवर आलास…”
“आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”
“तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”
कौतुकाचं ते वातावरण…
कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची.
कारण त्या घरात आता "कौतुक" ही नित्यनेमाची परंपरा झाली होती."कौतुक – एक जादुई शब्द…"
कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही.
कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं.
एक साधं "वा!", "छान केलं!", "तुझ्यामुळे जमलं!" असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं.
ते शब्द नसतात… ते आश्वासक साक्षी असतात —
म्हणून जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात. ते दोनच शब्द. जगणं बदलतं.
माणूस फुलतो.
कारण कौतुकाचा तो क्षण…
तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो — हलकासा, पण खोलवर उमटणारा क्षण असतो.
तृप्ती देव 🅒︎🅟︎copyright