औपचारिकते चा मुखवटा
आजच युग म्हणजे स्पर्धेचं युग.यशाच्या मागे धावताना या युगात अनेक गोष्टी कालबाह्य होत आहेत.प्रत्येकाला या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचं आहे आणि त्यासाठी स्वतः ला सिद्ध करताना माणूस हा माणूस न राहता एक यंत्रमानव झाला आहे.त्यामुळे  साहजिकच माणसातली मानसिकता हि बदलली आहे,पण समाजात वावरतांना केवळ पैसा किंवा पद असून चालत नाही,सोबत असावी लागते ती 'नैतिकता'.पण या स्मार्ट युगात जून जाऊन सगळंच नवीन आलंय,'पत्र' जाऊन मोबाईल आले,मग मेल ,skype  इत्यादी .अगदी सगळं काही स्मार्ट झालंय. आणि याचाच परिणाम म्हणजे नैतिकतेचा स्मार्ट रूप 'औपचारिकता'.

आपल्या संस्कृतीची ,मूल्यांची जोपासना करणे ,या धकाधकीच्या जीवनात जगतांना त्या मूल्यांना अध्यात्माची ,माणुसकीची झालर देणे हि आहे नैतिकता .अगदीच सोप्या भाषेत जर नैतिकता आणि औपचारिकता या दोहोंमधील फरक सांगायचं असेल  तर तो म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखी दिलेली वागणूक म्हणजे नैतिकता आणि आपण मुळात जसे नाहीच केवळ वेळेवर आणलेला नैतिकतेचा आव म्हणजे औपचारिकता .खूप फरक आहे या दोन मानसिकतेमध्ये.


वाईट वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही.प्रत्येक कठीण  प्रसंगी आर्थिक मदतच लागते अशी  बाब नसते.गरज असते ती आपुलकीची, म्हणजेच नैतिकतेची.मध्यंतरी वाचण्यात आलं होत आणि वाचून डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या होत्या एक मध्यमवर्गीय कुटुंब.पती-पत्नी आणि २ मुले.दोन्ही मुलांच्या  शिक्षणासाठी त्या दाम्पत्याने स्वतःला अगदी झोकून दिल होत.मुलेही हुशार आणि मेहनती होती.मोठा मुलगा शिष्यवृत्ती मिळवून परदेशी गेला.आणि काहीच काळात त्याने लहान भावाला हि आपल्यासोबत बोलावून घेतलं.दोघेही लठ्ठ  पगाराची नोकरी करत होते न चुकता दर महिन्याला आई-वडिलांना पैसे पाठवीत.इकडे या दाम्पत्यांच्या शेजारी एक मुलगा राहत होता.साधारण त्यांच्या मुलाच्याच व्हायचा .पण शिक्षणाअभावी छोटे मोठे कामे करायचा.या दाम्पत्याला काहीही गरज पडली तर तो लगेच त्यांच्या मदतीला यायचा आणि भरपूर काळजी हि घ्यायचा.त्यांची मुले रोज किंवा वेळ मिळाला तशी त्यांना फोन करायची,विडिओ कॉल वरून बोलायची.सगळं काही व्यवस्थित सुरु होत आणि अचानक त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.त्या माऊलीला तर आभाळ कोसळलेलं.दोन्ही मुलांना कळवण्यात आलं.मोठा मुलगा आला आणि परंपरेनुसार त्याने वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला.शोकसभेत आलेल्या एक व्यक्तीने  त्याला लहान भावाबद्दल विचारलं कि तो का नाही आला? तर त्यावर मोठा भाऊ  बोलला "नाही,तो आईच्या वेळी येणार आहे.'
त्याच हे भावनाहीन उत्तर ऐकून त्यांची आई शून्यातच गेली.स्वतःला सावरून तिने त्या शेजारच्या मुलाला जवळ बोलावलं आणि पोटच्या पोरीला उद्देशून म्हटलं'बाळ,यांना सांग,स्वतःच्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला आळीपाळीने यावं एवढं त्यांना बंधन नाही हो.माझ्या चितेला अग्नी तूच देणार.आजपासून तूच माझा मुलगा.'
सगळ्या विचारांना हादरवून टाकणारी हि घटना खूप प्रश्न समोर मांडते.नेमकं कोण जवळच होत?दर महिन्याला पैसे पाठवणारे मुलं कि प्रत्येक हाकेला ओ देणारा तो शेजारचा मुलगा?


त्या उतार वयात खरं तर त्यांच्या सहवासाची जास्त गरज होती पण त्यांची गरज त्यांच्या मुलांना कळलीच  नाही.त्यांनी पाळली ती फक्त औपचारिकता .याउलट त्या शेजारच्या मुलाची त्या दाम्पत्याला काहीही आर्थिक मदत नव्हती पण खंबीर आधार होता.तो त्यांची मायेनी काळजी घ्यायचा आणि जगताना याची जास्त गरज असते

औपचारिकता हि बाब वाटते तेवढी सहज नाही.
जोपर्यंत या औपचारिकतेचा आपण बळी होत नाही तोपर्यंत त्याचं गांभीर्य उमजण कठीणचआहे.कारण त्या माउलीने जे अनुभवलं ते आपल्यासारख्यांना
कळणार नाही.पण लोकांनी आपल्यासोबत जस वागावं अशी आपली इच्छा असते तसेच आपणही त्यांच्याशी वागावं.कारण 'पेराल तेच उगवेल'.
आपण वेळ नाही हि सबब पुढे करून आपली मूल्ये ,संस्कार विसरत चाललो आहे.हे सगळं वेळीच बदलायला हवं नाहीतर नैतिकता तर कालबाह्य होतच आहे नंतर औपचारिकता हि राहणार नाही.आणि तो दिवस दूर नसेल जेव्हा अंत्यसंस्काराला लोक विडिओ कॉल वरून उपस्थित राहतील.

Marathi Story by Tejal Apale : 111051541
Tejal Apale 5 year ago

अभिप्रायासाठी धन्यवाद सर

Haider Shaikh 5 year ago

कटू सत्य आहे...सुरेख रित्या मांडले

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now