The day of the mantra in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | मंतरलेले दिवस

Featured Books
Categories
Share

मंतरलेले दिवस

प्रिय ..

काल तीस वर्षे झाली आपल्या सहजीवनाला 

खरेच विश्वासच बसत नाहीये .

असे वाटते काल का परवा तर झालेय आपले लग्न ..!

सावरीच्या नाजुक अलवार कापसा सारखे उडाले नाही हे दिवस ..

आपल्या प्रथम भेटीतच जाणवला होता मला तुझा “उमदा “स्वभाव 

का कोण जाणे पहिल्या भेटीतच खात्री झाली होती माझी की तु मला खुप सुखी ठेवशील 

तशी  फारशी काही अपेक्षा नव्हती माझी जोडीदारा विषयी ..

पण त्या अपेक्षांच्या पलीकडे जावून खुप भरभरून दिलेस मला सारे काही तु ..!!

ही सगळी खट्टी मिठ्ठी ..(खट्टी कमी आणी मिठ्ठी .जास्त )..वर्षे खूप आनंदात गेली 💕

तसे तर सामान्य माणसासारखेच होते आपले ही आयुष्य .

पण अनेक अडचणी मधून सुद्धा तुझी भक्कम साथ फार मोलाची ठरली 

कुठल्याही नात्यात एकमेकांना “समजून घेणे “फार महत्वाचे असते 

आणी आपण तर एकमेकात सामावूनच गेलो होतो !!

मला खुप “अप्रूप आहे तुझे तुझ्या स्वभावाचे तुझ्या “दिलदार आणी प्रामाणिक वृत्तीचे !!

माझ्या दृष्टीने तु माझा “कोहिनूर “हिराच आहेच 

शिवाय तुझ्या सारख्याच  गुणी, सुंदर, आणी हुशार अशा 

“आपल्या  मुलाची” मी आई आहे याचा ही मला अभिमान आहे !

मी फार देव देव करणारी नाही ..पण 

आपल्या कामाला, निष्ठेला, विचारानाच मी देव मानते 

तरीही त्या आकाशातल्या देवाची  मी कायम “ऋणी “ राहीन तुझ्या सारखा जोडीदार 

बहाल केल्या बद्दल ..!!

तसे तुझे माझे नाते काही वेगळेच आहे 

आज इतकी वर्षे झाली तरी आपल्याला एकमेकांचा कंटाळा अजिबात येत नाही 

पण आज काल का कोण जाणे आपल्या रोजच्या नोकरी धंद्याच्या त्याच त्याच रुटीन चा खुप कंटाळा आला होता 

जणु वाहते पाणी तुंबून बसावे ना तसे झाले होते .....

तुला माहीत आहे मला ते एक हिंदी गाणे खुप आवडायचे 

   छु मंतर हो आजा चल गुम हो जाये 

नजरोमे हम ना आये 

ढुंढे जहा ..हम ही ना जाने हम् है कहा.... चल दोनो  !!

असे वाटायचे खरेच कुठेतरी गायब व्हावे ..

आणी ती संधी अचानकच आली ..

त्या छोट्या गावी प्रमोशन वर मी जायचे ठरले तेव्हा ..खरे तर तो निर्णय घ्यावा का नाही 

यावर आपण ..खुप विचार केला होता ..

आणी तु अगदी ठाम होतास ..

“तु नको काळजी करू ..जरी अनोळखी गाव असले तरी जाऊ आपण 

नवे आयुष्य जगायची संधीच दिलीय ..जणु बाप्पाने आपल्याला ..!

आणी दोन तीन वर्षात तर आपल्या घरी इथेच तर परतायचे आहे “

असे तु समजावून सांगितलेस मला 

मग मात्र खुप उत्सुकता वाटली तिकडे जायची ...

“आपल्या आयुष्यात आपण कधीच दोन खोल्यात नव्हतो राहिलो 

आपले स्वतःचे घर सुद्धा आपण कीती मोठ्ठे बांधलेय ना !!

इथे मात्र छान अगदी आपल्या पुरत्याच सुंदर दोन खोल्या मिळाल्या 

प्रथम ते छोटे घर पाहिल्या 

पाहिल्याच आपल्याला आवडले 

आपण अगदी हरखून गेलो !!

मग ते सारे थोडे थोडे संसाराचे साहित्य आणणे 

काही विकत ...काही आपल्या शहरातल्या घरातून आणणे 

नवीन फ्रीज नवे गॅस कनेक्शन .थोडे नवे छोटेखानी फर्निचर 

त्या दोन खोल्यात आपल्याला आवश्यक तितके सामान आपण घेतले 

त्यानंतर मग किराणा माल भरणे ..

तो तर सारा आपल्या शहरातल्या घरात होताच .

छोट्या छोट्या डब्यातून तो घेऊन आलो होतो आपण 

अगदी एखादा “लुटुपुटीचा भातुकलीतला.संसार असावा ना अगदी तसा ..!

तसे तर मी दिवसभर नोकरीनिमित्त घराबाहेर असायचे 

मग निदान घरी परत आल्यानंतर तरी एकमेकाचा सहवास मिळावा म्हणून आपण ठरवले की अजिबात 

टी व्ही घ्यायचा नाही या घरात ..

त्या गावात भांडी घासणे  ,कपडे धुणे ,अशा कामासाठी बाई मिळत नसे 

मग घरचे काम सारे मलाच करावे लागत असे .

तु पण जमेल तसे माझे काम हलके करीत होतास 

घरच्या सर्व कामात तुझी मदत तशी नेहेमीच असायची 

पण या छोट्या गावात तुझी मदत खूप मोलाची होती 

तू आधीच काम करून दमतेस आणखी घरकाम नको करूस असे तू मला म्हणायचा

खरे तर तुझी सोबत असणे हीच एक मोठी मोलाची मदत वाटे मला

फक्त नोकरी आणि स्वयंपाक इतकीच जबाबदारी मी घेत असे 

सकाळी दहा वाजता घराबाहेर पडलेली मी संध्याकाळी सातपर्यन्त घरी यायची 

संध्याकाळी माझी वाट बघत तु त्या आपल्या घराच्या दर्शनी खिडकीत मोबाईल वरची गाणी ऐकत बसून असायचास 

दिवसाचा  सारा वेळ तु तुझे थोडे काम करीत घरी असायचास 

तु सुद्धा तुझे विश्व तिथे तयार केले होतेस 

स्वतःच्या व्यवसायातील छोटी मोठी कामे करीत तु तिथे बरीच माणसे सुद्धा जोडली होतीस 

तुझ्याशी बोलणे, तुझा सल्ला घेणे याची त्या लोकांना खुप अपूर्वाई होती 

त्या लहान गावात जिथे एखादे देऊळ , बाग , अथवा सिनेमा गृह पण नव्हते 

शिवाय आपल्या कडे तर टी व्ही पण नव्हता ..

पण तू कधी एका शब्दाने पण असे कधी बोलून दाखवत नसे 

आणि आपला वेळ गाणी ऐकणे, थोडे इंटरनेट पहाणे, लोकांना भेटणे यात अगदी मज्जेत घालवायचास 

तुझे तिकडचे आपल्या शहरातले व्यवसायाचे सर्व साम्राज्य सोडून तु माझ्यासाठी इथे आला होतास 

पण याचा तुला जरा देखील इगो नसायचा !!

दिवसभरात दोन तीन फोन तर तुला मी करीत असायचेच 

पण कधी तरी एखादे वेळा राहून गेले तर तू एखाद्या लहान मुला सारखा रूसत असे 

मग मीच हसून तुझी समजूत काढायचे !!!

संध्याकाळी बँकेतून निघण्यापूर्वी एक फोन केला की मी घरी जाताच चहा आणि खाणे तयार असे 

मग आपण दोघे आलो की छान चहा घेत गप्पा करीत असू 

त्या गावात खुप लवकर संध्याकाळ होत असे 

मग आपण ही आपले जेवण खाण लवकर आवरून घेत असु..

प्रचंड उकाडा असे तेव्हा ..त्या दिवसात 

आपल्या वरच्या मजल्यावर गच्ची होती 

अगदी स्वच्छ सुंदर आणी प्रशस्त्

अशी ..

गंमत म्हणजे तिथे एक सुंदर बाक पण होता बसायला 

मग आपण दोघे रात्री तिथे जाउन बसत असू 

सभोवताली असलेला गावाचा लुकलुकता प्रकाश ..

सुंदर गार गार वारे वाहात असे ..

आकाशात कधी चंद्राची सुंदर कोर ..

आणी थोड्या चांदण्या असत 

काही वेळा ..वारे इतके जोराचे असे 

की आपण अगदी एकमेकांचा हात हातात पकडून बाकावर बसत असू ..

शेजारी असलेल्या टुरिंग टॉकीज मधल्या सिनेमातील गाणी सुद्धा मधुनच ऐकु येत असत 

आणी मग अर्धा एका तास आपल्या निवांत गप्पा होत असत ..

विषय खरे तर अगदी साधे साधे असत 

पण एकमेकांच्या बरोबर असताना त्या गप्पा पण रोमांचक वाट्त असत

त्या दिवसात सकाळी जाग पण लवकर येत असे 

खरे तर उकाड्याने रात्री झोप खुप .डिस्टर्ब होत असे  ..

आणि आपण तर एकदम थंड आणि आल्हाददायक प्रदेशातून इकडे आलो होतो 

त्यात इतक्या गरम वातावरणात राहायची कुठे सवय होती आपल्याला?

पण तरीही उठले की फ्रेश वाटत असे ..

मग आपला नेहेमीचा फिरायचा शिरस्ता ..

त्या छोट्या गावात बायका फारशा बाहेर नसत ..

त्यात मी जरा थोडी फॅशन करणारी शहरातली  बाई अगदी उठून दिसत असे 

आपली “जोडी “फिरायला निघाली की लोक “टकमक “पाहत असत 

पण मग हळूहळू ..सारी ओळखीची झाली ..

रस्त्यात ओळख दाखवून गप्पा मारू लागली .

ही जोडी शहर गावातली शिकलेली आणि मोठ्या हुद्द्याची असुन आपल्याशी आपुलकीने बोलतात 

याचे त्या लोकांना खुप “अप्रूप वाटत असे ..

आपल्याला मात्र त्यात फारसे काही मोठेपण वाटत नसे 

आपण सर्वांशीच मोकळेपणी बोलत असू .

सुट्टी दिवशी कधी बाजारात चक्कर 

तर कधी मित्र मंडळीना गोळा करून गप्पा करीत असू ..

दर पंधरा दिवसांनी आपल्या शहरगावी चक्कर असेच 

या गावचे  काही कडू गोड अनुभव घेत आपण रहात होतो 

एका वृत्त पत्रात मी एक “कॉलम” लिहीत असे ,

तिथे लोकांना तो खूप आवडत असे 

तुला याची फार अपूर्वाई असे .,,

माझे छापून आलेलेसर्व लेखन छान कात्रणे काढून जपून ठेवणे आणि आपल्या शहरातल्या घरी गेले की एका स्वतंत्र फाइल मध्ये नेऊन लावणे 

हे तर तुझे खूप आवडते काम असे ..

पण त्या “गावाने आपल्याही मनात एक “आठवणींचा गाव "मात्र नक्की निर्माण केला 

दोन वर्षे कशी संपली समजलेच नाही आपल्याला 

         आणि मग एक दिवस आली माझी बदली झाल्याची बातमी .. खूप खुश झाले मी 

इथे आल्यावर काय करायचे कोणती शाखा मागायची ही सुद्धा तयारी सुरू झाली .

थोडे दिवस झाले पण काहीच घडेना ..

आपल्या गावी कधी जायला मिळेल हे नक्की समजेना 

आज उद्या करीत महिना भर गेला तरी काहीच होईना 

मग समजले की अंतर्गत काही प्रॉब्लेम मुळे अजून चार महीने तरी सुटका नव्हती .

मन खूप खट्टू झाले माझे 

मग रोज वाटायचे जाऊदे ही नोकरी ..सोडून जाउ परत गावी 

त्या काळात माझ्या मनाला उभारी द्यायचे फार मोठे काम तू करीत होतास 

थोडे दिवस थांब ...हे ही दिवस जातील असे तुझे सांगणे असे 

आणि खरेच अचानक काय सूत्रे फिरली कोण जाणे पण ..माझी सुटका झाली तिथून 

आणि मग आपण आपल्या गावी परत आलो 

आता पुन्हा जुन्या रुटीन lला गाडी आली आहे आपली 

अजून ही एखादा चित्रपट पहावा तसे ते दिवस माझ्या डोळ्या समोरून सरकून जातात 

त्या दिवसाच्या नवीन अनुभवासाठी मी तुझी खूप आभारी असेन. केवळ तू असल्यानेच तो काळ सुखाचा गेला होता आणि ते मंतरलेले दिवस आपण बघितले 

तुझीच .....