Unsaid things in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | न सांगितलेल्या गोष्टी

The Author
Featured Books
Categories
Share

न सांगितलेल्या गोष्टी

जीवनात जसं आपण विचार करतो तसं कधीच होत नाही; काहीतरी वेगळंच होतं. तसंच काहीसं माझ्या सोबत झालं.
तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, मनामध्ये तिच्याबद्दल काय आहे ते सांगण्यासाठी मी तिच्या शहराला गेलो होतो.
प्रवास आठ तासांचा होता, पण त्या पूर्ण प्रवासात — तिला कसं बोलायचं, काय बोलायचं, सुरुवात कुठून करायची, इतक्या वर्षांनी भेटतोय म्हणून ती ऐकल्यावर काय बोलेल, तिचं उत्तर काय असेल, ती माझ्या मनातील भावनांची कदर करेल का, तिला माझ्या भावना समजतील का — अशा अनेक प्रश्नांनी मला भांबावून सोडलं होतं.

मी माझ्याच कल्पनांमध्ये हरवून गेलो होतो. त्या गोड स्वप्नांमध्ये मी खूप काही विचार केलं होतं, पण तसं काही झालंच नाही.
मी तिच्या शहरात पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला होता. नुकताच पोहोचलो असल्यामुळे फ्रेश होऊन थोडा नाश्ता केला आणि तिला फोन केला —
“मी इथे मुंबईला आलो आहे, खास तुला भेटायला, तुला माझ्या भावना सांगायला. तू भेटशील का मला?”

कुठे भेटायचं, भेटल्यावर काय करायचं — चहा घ्यायचा की कॉफी — असं बोलणार होतो, पण तिने फोन उचलल्यावर एक अनोळखी व्यक्तीशी बोलतोय असं वाटलं.
जणू ती मला ओळखतच नाही! आणि तिने लगेच फोन कट केला.

त्या एका कॉलवर सगळं संपलं होतं — माझं तिच्यासाठी केलेलं, तिच्यासाठी केलेला प्रवास, तिला बोलायची जमवलेली हिंमत, आपल्या भेटीचा विचार, प्रवासात रंगवलेली स्वप्नं — सगळं.

तिने असं का वागावं याचं दुःख होतंच, पण आता मी पुन्हा कधीच आयुष्यात माझ्या मनातील भावना तिला सांगू शकणार नाही, याचंही दुःख झालं.

“जाऊ दे, बोलू नको,” असं स्वतःलाच म्हणालो. “मुंबईला आलोच आहे तर थोडं मुंबई दर्शन तरी करू.”
तिच्यासोबत फिरायचं होतं, पण आता एकट्याने फिरायचं होतं.

असं विचार करून, तसाच पावसात मी Marine Drive ला गेलो.
खूप सुंदर दृश्य होतं. तिथे खूप लोक आले होते —
जो तो आपल्या आपल्या गोष्टींसोबत तिथे आला होता. कोणी प्रेमात, कोणी हौसेनं, तर काही लोकांसाठी तो रोजचा नियम होता.

तिथे एका जागी बसून मी त्या समुद्राकडे पाहत होतो.
ज्या समुद्राचा कुठेच अंत दिसत नव्हता.
छोट्या छोट्या होड्या घेऊन काही मासेमार त्या समुद्रात जाताना दिसत होते.
मी त्या होड्यांकडेच पाहत होतो — त्या जसजशा लांब जात होत्या तसतशा लहान होत होत्या.
आणि एक क्षण आला की त्या क्षितिजापर्यंत जाऊन दिसेनाशा झाल्या.

त्या होड्यांकडे पाहून माझ्या मनात विचार आला —
त्या होड्या आता आपल्याला दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं अस्तित्व संपलं आहे.
माझ्या आणि तिच्या नात्याचंही तसंच नाही का?
आपल्यातला दुरावा वाढला आहे, म्हणून नातं दिसत नाही, पण म्हणून ते संपलं असं नाही ना?

काही काळानंतर त्या होड्या परत येतील —
त्या सोडून गेलेल्या किनाऱ्यावर पुन्हा येतील.
तसंच कधीतरी आपल्या नात्यातलाही दुरावा संपेल,
आणि मी माझ्या भावना पुन्हा तिला सांगू शकेन...

त्या होड्यांसोबत मी त्या जगाला प्रकाश देणाऱ्या भास्करालाही क्षितिजावर मावळताना पाहिलं,
आणि तसाच तिथे बसून राहिलो —
त्या होड्यांची वाट बघणाऱ्या किनाऱ्यासारखा.

“प्रवास संपतो, प्रतीक्षा कधीच नाही.”


पाऊस थांबूनही वातावरणात ओली हवा होती.
मी Marine Drive वरून हळूहळू उठलो आणि परत चालायला लागलो.
मनात एकच प्रश्न घोळत होता—

“ती एवढी बदलली कशी?”

कधी काळी जिच्या एका ‘हॅलो’वर मन आनंदानं भरून यायचं,
आज तिच्या शांततेनं मनाला पोकळी जाणवत होती.

स्टेशनकडे जाताना मी स्वतःलाच पटवून देत होतो—
“जाऊ दे… आयुष्यात सगळं आपल्या मनाप्रमाणे होत नाही.”

पण मनाला पटत नव्हतं.
कारण या सगळ्यात मी हरलाच नव्हतो…
मी थकलो होतो.

रात्रीचं मुंबई स्टेशन धावपळीत गजबजलेलं होतं.
लोक इकडे तिकडे धावत होते—
त्यांच्या आयुष्यात बहुतेक माझ्यासारखे प्रश्न नव्हते.
मी एका कोपऱ्यात बसलो आणि पाण्याची बाटली काढली.

तेवढ्यात फोनचा व्हायब्रेशन झाला.
मी पटकन स्क्रीन पाहिली.
तिचा नंबर नव्हता.

पण मेसेज होता—
“एकदा भेटू शकतोस का? बोलायचं आहे.”

त्या एका ओळीने माझ्या आत पुन्हा काहीतरी हललं.
काय बोलायचं तिला?
माफी?
स्पष्टीकरण?
की खरंच काहीतरी अजून बाकी आहे?

मी दीर्घ श्वास घेतला आणि फक्त एवढंच टाईप केलं—

“कुठे?”

मेसेज पाठवल्यावर मनात अक्षरशः वादळ उठलं.
काय होणार आहे हे माहित नव्हतं…
पण एवढं नक्की—

जिथे प्रवास संपला असं वाटलं होतं,
कदाचित तिथूनच काहीतरी नवीन सुरू होणार होतं.


 मी “कुठे भेटायचं?” असा मेसेज पाठवून hardly दोन मिनिट झाले असतील…
आणि तिचं रिप्लाय आलं—

“चर्चगेट स्टेशनच्या बाहेर. 10 मिनिटांत पोहोचते.”

मेसेज वाचल्यावर माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली.
भीती?
उत्सुकता?
की काहीतरी संपणार की सुरू होणार याची अनामिक चाहूल?

मी चर्चगेटकडे निघालो.

रस्ता उजेडात होता, पण माझ्या मनात मात्र प्रकाशापेक्षा प्रश्न जास्त होते.

स्टेशनच्या बाहेर आलो तेव्हा
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ती उभी होती.

नेहमीसारखी शांत, साधी, तिच्या त्या मितभाषी नजरा—
त्या नजरा कधी खुशाल बोलत असत
आणि कधी मला आयुष्यभराचे प्रश्न विचारत.

मी तिच्या जवळ गेलो.

“हाय,” इतकंच म्हणालो.

ती थोडी वेळ माझ्याकडे पाहत राहिली.
दिसण्यात काही बदल नव्हता…
पण नजरेत खूप अंतर होतं.

ती हलक्या आवाजात म्हणाली—

“फोनवर अशा रीतीने बोलले… त्याबद्दल सॉरी. मी… I was not in the right state of mind.”

माझं मन थोडं हललं.
पण मी काही बोललो नाही.

ती पुढे म्हणाली—
“इतक्या वर्षांनी तू भेटायला आलास… पण माझं आयुष्य आता तसं राहिलेलं नाही. Everything has changed.”

मी शांतपणे विचारलं—
“मी एवढंच विचारतो… तू मला खरंच ओळखत नाहीस असं का बोललीस?”

त्या प्रश्नावर ती एक क्षण थांबली.
आणि मग म्हणाली—

“कारण मला भीती वाटली.
तू माझ्या आयुष्यात परत आलास तर…
मी ज्यापासून दूर गेलेय, ते सगळं पुन्हा समोर येईल असं वाटलं.”

“काही गोष्टी आपण बोललो असतो… तर चांगल्या झाल्या असत्या,” मी हळू आवाजात म्हटलं.

ती हसली… पण ते स्मित खूप तुटक होतं—
“हो. पण आयुष्य नेहमी वेळेवर उत्तरं देत नाही ना.”

आम्ही दोघे काही क्षण तिथे शांत उभे राहिलो.
मुंबईच्या रात्रीचे आवाज आमच्यातील शांतता तोडत होते,
पण आतली पोकळी मात्र अजून खोल जात होती.

मी शेवटी विचारलं—

“तुला आता माझ्याशी बोलायचं आहे… की हा शेवटचा संवाद आहे?”

तिने माझ्या डोळ्यांकडे पाहिलं.
खूप वेळ.

आणि मग ती म्हणाली—

“शेवट नाही… पण सुरुवातही नाही.”

त्या एका वाक्याने माझ्या हातातील सर्व उत्तरं निसटून गेली.
 त्या एका वाक्याने माझ्या छातीत काहीतरी घट्ट आवळलं.
मला काय बोलायचं, कसं प्रतिक्रिया द्यायची… काहीच सुचत नव्हतं.

मी शांतपणे विचारलं—
“मग तुझं खरं उत्तर काय आहे?”
“मला का दूर ढकललं तू?”

ती दीर्घ श्वास घेत म्हणाली—

“कारण मी स्वतःलाच अजून समजून घेत नाहीये.”

मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
ती पुढे म्हणाली—

“माझ्या आयुष्यात कुणीतरी आहे आता…
पण ते तसं प्रेम नाहीय जे मी मनापासून स्वीकारलं आहे.
ना मी त्याच्यात पूर्ण आहे, ना तो माझ्यात.”

मी एकदम शांत झालो.
असं काहीतरी असेल याची कल्पना होती, पण इतक्या स्पष्टपणे ऐकणं जड होतं.

ती पुन्हा बोलली—

“तू परत आलास, म्हणून जुन्या गोष्टी जाग्या झाल्या.
आणि मला हा संघर्ष नको होता.
म्हणून फोनवर… तसं बोलले.
मी रागावले नव्हते… मी घाबरले होते.”

त्या क्षणी मला तिची नजर एका लहान मुलासारखी वाटली—
जिला काय बरोबर, काय चुकीचं समजत नव्हतं,
फक्त आपल्यालाच न दुखवण्याचा प्रयत्न करत होती.

मी शांतपणे म्हणालो—
“तू असं म्हणतेस की सुरुवात नाही…
म्हणजे माझ्यासाठी अजून दार बंद नाही का?”

ती पुन्हा थोडं स्मितली—
“दार बंद नाही… पण त्यातून चालत जाण्याची हिम्मत अजून झाली नाही माझी.”

मी काही बोललो नाही.
फक्त तिच्या शब्दांनी माझ्या मनाचा भार हलका झाला.
दुखावलं होतं, पण स्पष्टता मिळाली होती.

थोड्या वेळाने ती म्हणाली—
“चला… चलतं बोलूया. इथे उभं राहून सगळं अधिक जड होतंय.”

आम्ही स्टेशनजवळच्या रस्त्यावर शांतपणे चालू लागलो.
मुंबईच्या रात्रीचा गोंधळ, रिक्षांचे हॉर्न, समुद्राची दूरवरून येणारी हवा—
या सगळ्यात तिचा आवाज मात्र खूप हलका, खूप शांत होता.

ती म्हणाली—

“तुझ्यातली एक गोष्ट माझ्या आजही आठवते—
तू कधीच मला काही बदलायला म्हणाला नाहीस.
मी जशी आहे, तशी मला स्वीकारलंस.
आजही तसंच आहे का?”

मी सरळ उत्तर दिलं—
“हो. आजही तसंच आहे.”

ती थांबली.
थोडं माझ्याकडे पाहिलं.
आणि म्हणाली—

“मग वेळ दे.
मी स्वतःला शोधते…
कदाचित त्यानंतर तुला उत्तर देऊ शकेन.”

त्या वाक्याने सगळं काही बदललं नाही…
पण किमान काहीतरी संपलंही नाही.

रात्र वाढत चालली होती.
आम्ही दोघे एका कोपऱ्यावर येऊन थांबलो.

ती म्हणाली—
“इथून मी जाते.
तू सावकाश जा.
आणि… धन्यवाद.
इतक्या प्रामाणिकपणे बोलल्याबद्दल.”

मी फक्त हसून म्हणालो—
“कधीही.”

ती वळली…
हळूहळू दूर जाऊ लागली.
रस्त्याच्या लाईटखाली तिची सावली लांब होत गेली.
आणि एक क्षण आला
जेव्हा ती गर्दीत मिसळली
आणि दिसेनाशी झाली.

मी मात्र अजूनही तिथेच उभा होतो—
तिच्या शब्दांच्या सावलीत.