Vivaah - 2 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | विवाह - भाग 2

Featured Books
Categories
Share

विवाह - भाग 2


           
विवाह (कादंबरी)
            अंकुश शिंगाडे

         काय चुकलं होतं त्या दोघांचं ते कळत नव्हतं. त्यांच्याच नशिबाला ते भोग का आलेत. तेही कळत नव्हतं. नियतीनं त्यांच्याच जीवनात ते दुःख का आणलं तेही कळत नव्हतं.
         देवचं काहीच चुकलं नव्हतं. तो तिला काहीही बोलला नव्हता. तरीही त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. कारण काय होतं कळत नव्हतं.
          देवचं तिच्यावर निरतिशय प्रेम होतं. विवाहानंतर ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते आनंदातच होते. आनंदातच बागेत जाणे, गप्पागोष्टी करणे, भेल, आईस्क्रीम खाणे. इत्यादी गोष्टी ते नित्यनेमानं करीत होते. अशातच माशी शिंकली. कोणं आग लावली त्यांच्या जीवनात, ते कळलंच नाही. त्यानंतर ती अचानक विक्षिप्तपणे वागायला लागली होती. ज्याची परियंती तिच्या सोडून जाण्यात झाली. 
          देवची पत्नी त्याला अचानक सोडून गेली होती. त्यानंतर तिला आणण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. परंतु यश आलं नाही. शेवटी खजील होवून नाईलाजानं देवनं दुसरा विवाह केला. जो गांधर्व विवाह होता. ज्याला समाजाची मान्यता नव्हती. परंतु त्याची मान्यता होती. जो विवाह जीवनभर तुटू शकला नाही. तो गांधर्व विवाह असूनही. 
          देवचे दोन विवाह झाले होते व त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव मंजू होतं. मंजूशी त्यानं राजरोषपणे विवाह केला होता. परंतु ती टिकली नसल्यानं त्याला नाईलाजास्तव दुसरा विवाह करावा लागला. करुणा तिचं नाव होतं व ती देवची पत्नी झाली होती. तो तिला पत्नी मानत होता. परंतु ती.... ती त्याला पती मानत नव्हती. कारण त्यानं तिच्याशी विवाहच केला असला तरी तो गांधर्व विवाह होता. तो राजरोषपणे झालेला विवाह नव्हता आणि तो करणार तरी कसा. त्याला राजरोषपणे विवाह करण्यात अडचणी येत होत्या. त्यात पहिली अडचण होती संविधान. 
          तिचं नाव करुणा होतं व ती एक समजदार युवती होती. ती दया घ्यायची. तिला कोणीही दुःखात वा संकटात असलेलं पाहावंसं वाटत नव्हतं. शिवाय दुःखात असलेल्या लोकांची ती दया घेवून त्याला मदत करीत असे. ते बाळकडू तिला तिच्या आईवडीलांकडून मिळालेलं होतं. त्यामुळंच जसा देव तिला संकटात दिसला व त्याचं दुःख तिला जाणवलं. तसा तिनं निर्णय घेतला की तिच्या आयुष्याचं काहीही झालं तरी चालेल, परंतु ती त्याचेशी विवाह करेल. त्यामुळंच तिनं देवशी विवाह केला होता. 
          देव हा साधा भोळा व सामान्य व्यक्ती होता. तो दारु पाणी पित नसे वा कोणतीच नशा करायचा नाही. त्याचं राहणीमान साधं होतं व तो कपडेही भरजरी घालत नव्हता. तसाच काळ बदलला होता. परंतु तो बदलला नव्हता. 
          देवचा पहिला विवाह झाला होता. जेव्हा विवाह झाला तेव्हा तो अगदी आनंदात होता. त्याच्या आनंदाचं कारण होतं संकट. देववर महाभयंकर संकट आलं होतं विवाहाच्या पुर्वी. विवाहाच्या काही दिवसापुर्वी देवच्या वडिलाचं निधन झालं होतं. त्यानंतर अचानक कोसळून गेलेल्या संकटातून सावरता सावरता त्याचे दिवस गेले होते.
          देवचा विवाह झाला होता व तो अगदी आनंदात होता. तसं पाहिल्यास तिही आनंदातच होती. तिलाही तो आवडतच होता. परंतु तो आनंद काही दिवसच टिकला. काही दिवसानंतर त्या दोघांचं पटेनासं झालं व त्यात ती आईवडीलांकडं निघून गेली होती.
           मंजू फॅशनेबल होती. तिला साधी माणसं आवडत नव्हती. तिला विवाहही करायचा नव्हता. परंतु आईवडीलांनी विवाह करण्यावर जोर दिला. म्हणूनच तिनं देवशी विवाह केला होता. तसं तिला तोकडे कपडे वापरणं. फॅशन करणं आवडत होतं. ती सदोदीत मेकअपमध्येच राहात होती.
            देव..... एक शांत गृहस्थ होता. त्याला कोणत्याच स्वरुपाचं व्यसन नव्हतं. तो शिक्षणच घेत होता, जेव्हा त्याचे वडील मरण पावले होते. तेव्हा त्याला काही सूचत नव्हतं. शिक्षण घ्यावं की नोकरी करावी हा प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभा होता. अशातच त्यानं एका खाजगी शाळेत नोकरी पाहिली.
          ती खाजगी शाळा. ती शाळाही त्याला साजेशी अशी नव्हतीच. त्याला त्या काळात त्या खाजगी शाळेत वेतन अत्यल्प असून नाहीच्या बरोबर होतं. तेवढ्या पैशात त्याचं भागतच नव्हतं. अशातच त्याला कधी रस्त्यावर सापडलेले फाटकेतुटके कपडे घालावे लागत होते. शिवाय अन्न म्हणून रस्त्यावर पडलेला सडका भाजीपाला तो वापरत असे. तो जेव्हा भाजी बनवत असे. त्या भाजीत कधी तेल दिसायचंच नाही, ना तिखट मीठ बरोबर असायचं. तो घास तोंडात ठेवताच घास तोंडातल्या तोंडात फिरत असे. तो घास गिळण्याचीही हिंमत होत नव्हती. परंतु परिस्थितीच ती. त्या परिस्थितीवर त्याला मात करायचीच होती. कधी त्याला उपाशी राहावं लागायचं पाणी पिवून. 
          देव घरी पोळ्याही बनवायचा. सिलेंडरचं कनेक्शन घ्यायची ताकद नसल्यानं तो लाकडावरच स्वयंपाक बनवायचा. त्यासाठी लाकडंही तो परीसरात फिरुन गोळा करायचा. कधी ती लाकडं जर मिळाली नाहीत तर प्लॉस्टीक पन्न्या जाळून तो स्वयंपाक करीत असे. त्यातच पोळ्या कच्च्या बनत. ज्या पोळ्या पोटात सुख द्यायच्या नाहीत. भात बनवायचा. तोही कच्चाच रासात असे. परंतु ती परिस्थितीच होती त्याचेवर नव्हे तर नशीब. अशातच दोनतीन वर्ष निघून गेले. 
          देव नावाप्रमाणेच देव होता. त्याला आई होती व ती म्हातारी होती. त्याला तीन बहिणी होत्या. त्या बहिणींचा विवाह झाला होता. तो विवाह त्याच्या वडिलांच्या निधनापुर्वीच झाला होता. त्या बहिणी आपापल्या घरी सुखी होत्या. त्या बहिणी देवकडे वा आपल्या आईकडे लक्ष देत नव्हत्या. कदाचीत त्यांना वाटत असेल की लक्ष जर दिलं तर सारंच आपल्याला पाहावं लागेल. ज्यातून आपल्याच मागं भानगडी लागतील व आपल्याला पैशाचा खर्चही पडेल. हाच विचार करुन बहिणी त्याचेशी वाकड्या पद्धतीनं व्यवहार करीत होत्या. 
           ती परिस्थिती व त्या परिस्थितीचा सामना करता करता देवला नाकीनव येत होतं. परंतु उपाय नव्हता. उपाय तरी कोणता राहणार? मात्र देव आला दिवस गोड करीत होता. त्याची म्हातारी आईही त्या परिस्थितीबद्दल कुरकूर करीत नव्हती. अशातच त्याला नोकरी लागली व आता तो सुखी झाला होता.
          देवची नोकरी सरकारी झाली होती. त्या खाजगी शाळेच्या संचालक मंडळानं त्याला कायम केलं होतं. तरीही त्याची परिस्थिती तशीच होती. कारण त्याला जरी सरकारी नोकरी लागली असली तरी वेतन तेवढं मिळत नव्हतं. संस्थाचालक वेतन उचलत होता व तो आपल्या मर्जीनं त्याला जेवढे वाटेल, तेवढेच पैसे देवला देत होता. ज्या पैशात आवश्यक गरजाही पुर्ण होत नसत. अशातच देवचं वय वाढत चाललं होतं.
          देवला सतवत होत्या त्या गोष्टी. आईचं वाढणारं वय. तिचं आणखी म्हातारं होणं. आपलंही विवाहाचं वय वाढणं. बहिणीचं आपल्याकडे असलेलं दुर्लक्ष. स्वयंपाक ताजा न मिळणं. पोळ्या कच्च्या मिळणं, भात कच्चा राहाणं व भाजी चवदार बनवता न येणं. या सर्व गोष्टीतून मार्ग काढता काढता देव चिंताग्रस्त व्हायचा. वाटायचं की आपण आता आपला विवाह करायला हवा. परंतु आपण विवाह केल्यास घरी येणाऱ्या पत्नीला कसे पोसू. तिला काय खावू घालू. आधीच आपली आबाळ. आपल्याला साधे पोटभर जेवनापुरतेही पैसे मिळत नाही. आपली आई कदाचीत ही वास्तविकता सांभाळून तरी घेते. पत्नी घेईल काय? हा प्रश्न देवच्या मनात होता. त्यातच आपण विवाह केल्यास पत्नी घरात टिकेल काय? आपला विवाह टिकेल काय? आधुनिक काळातील मुली शानदार जीवन जगायचं पाहतात. अशावेळेस आपली पत्नी कशी राहिल? असे वेगवेगळे प्रश्न देवला पडत होते. त्यावर मार्गही निघत नव्हता. निघूच शकत नव्हता. कारण त्याला मिळणारं वेतनच तुटपुंजं होतं. शेवटी त्यानं विचार केला. विचार केला की जे होईल, ते पाहिल्या जाईल. आपण विवाह करायचा. मुलगी बघायची थोडी कर्तृत्ववान. जी लहानशी नोकरी करीत असेल.
          देवनं केलेला तसा विचार. तसा विचार करताच देव विवाहासाठी मुलगी शोधू लागला. परंतु मुलगी त्याला मिळेल तेव्हा ना. तो मुलगी पाहायला जायचा फाटक्याच कपड्यातून. कारण जिथं त्याला त्याचं पोटंच भरणं कठीण होतं. तिथं तो चांगले कपडे तरी कुठून घेणार. शिवाय त्याच्यासोबत कोणी दोनचार लोकं जायलाही तयार होत नव्हते. नातेवाईकानं तर त्याच्याकडे पाठच फिरवली होती. अशातच त्याला एक व्यक्ती भेटला. तोही शिक्षकच. तो घरचा बरा होता. तो त्याच्या पाठीशी देवासारखाच उभा राहिला. आता थोडं मुलगी बघणं सोपं झालं होतं. कारण तोच आपल्या गाडीवर त्याला घेवून जायचा. आपले कपडेही त्याला मुलगी बघतेवेळेस घालायला द्यायचा.
           देवनं बऱ्याच मुली पाहिल्या. परंतु प्रत्येक मुलीनं त्याला नकारच दर्शवला. कारण तो तसा फॅशनचा काळ होता व मुलींनाही फॅशनेबलच मुलगा हवा असायचा. त्याला सरकारी नोकरी आहे असं देव मुलीवाल्यांना सांगताच त्यांचा विश्वास बसायचा नाही. कारण त्याचं मुलींच्या घरी सायकलनं जाणं, त्याचं कपडे परिधान करणं, त्याचं सुंदर न दिसणं. यावरुन त्याची परिस्थिती कळत असे. काही मुली त्याच्या बोलण्यावर विश्वासच ठेवायच्या नाहीत. 
          वेळ व प्रारब्धाची ती लढाई. देव तीच लढाई लढत होता. अशातच एक मुलगी त्याला पसंत पडली. त्या मुलीनंही त्याला पसंत केलं. ती नोकरीवरही होती. तिची खाजगी नोकरी होती. ती मुलगी एका मित्रानं दाखवली होती. परंतु तिची एक अट होती. अट होती, त्यानं किरायानं राहायला जाणं.
          देवचं स्वतःचं घर होतं. कसंतरी त्यानं स्वतःच्या हातानं बांधलं होतं. परंतु ते घर साध्या पद्धतीचं होतं. ते आजच्या काळातील फॅशनेबल मुलींना आवडत नव्हतं. म्हणूनच ज्या मुलीनं त्याला पसंत केलं होतं. तिची ती अट. सरकारी नीकरी आहे ना. मग चांगलं घर किरायानं करावं. शेवटी नाही हो च्या चक्करमध्ये ही देखील मुलगी जाईल या विचारानं त्यानं होकार दिला व विवाह पक्का झाला. परंतु त्याचा विवाह जरी पक्का झाला असला तरी त्याचेसमोर विचार होता. येणारी मुलगी पोसायची कशी? कमऱ्याचा किराया द्यायचा कसा? त्याच विचाराच्या चक्रव्यूहात देव फसला होता आणि आता तो जो विचार करीत होता. तो विचारच त्याला दिशा देणारा ठरला.