हर्षदला आज ऑफीसला जाण्यासाठी उशीर झाला होता. लवकर न उठवल्यामुळे तो बायकोवर चिडचीड करत होता. त्याने घाई - गडबडीमध्ये आवरलं. आणि तो बाईकवर ऑफीसकडे जायला निघाला. ऑफीसकडे जाणारा शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांची खूप वर्दळ होती. त्यामुळे हर्षद खूप वैतागला होता. एका सिग्नलवर त्याच्या बाईकच्या पुढे दुसरा बाईकस्वार येवून थांबला. तो पुढे येवून थांबल्यामुळे हर्षदला त्याचा खूप राग आला.
हर्षद स्वत:च्या मनाशीच पुटपुटला.
‘ किती मुर्ख लोक आहेत. एवढी घाई करायला यांना कोठे जायचे असते काय माहित ? ’
त्या बाईकस्वाराने हर्षदचे ते शब्द ऐकले. हर्षदचे ते शब्द आपल्यालाच उद्देशून असल्याचे त्याच्या लक्षात आले. ‘मूर्ख’ हा शब्द तर त्या माणसाच्या खूप जिव्हारी लागला.
तो रागातच हर्षदला म्हणाला.
“ मूर्ख कोणाला म्हणतोस ? तूच मूर्ख आहेस.”
तो माणूस वाद करण्यासाठी गाडीवरून खाली उतरणारच होता. तेवढयात सिग्नल सुटले. त्यामुळे तो माणूस निघून गेला. पण जाताना तो हर्षदकडे रागाने पाहून म्हणाला.
“ तुझ्या सारख्या मूर्ख माणसाच्या नादी लागायला मला वेळ नाही.”
त्या माणसाचे ते शब्द हर्षदच्या खूप जिव्हारी लागले. हर्षदने त्या माणसाचा पाठलाग केला. पण तो माणूस मुख्य रस्ता सोडून मधल्या रस्त्याने निघून गेला. त्यामुळे हर्षदने त्या माणसाचा पाठलाग करणे सोडून दिले.
असे प्रसंग हर्षदच्या आयुष्यात रोजच घडत होते. त्याच्या ऑफीसमध्ये कामासाठी आलेल्या लोकांशी त्याचे फारसे पटत नसे. तो सर्वांशी बोलताना कटु शब्द वापरत असे. आपल्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावत असेल याचा तो विचार करत नसे. ऑफीसमधील स्टाफ, शिपाई व इतर सर्वचजण त्याच्या अशा कटु व मन दुखावणाऱ्या शब्दांमुळे त्याच्याशी अंतर ठेवून वागत असत. त्यामुळे त्याला ऑफीसमध्ये एकाकीपणा जाणवत असे.
दुपारची वेळ होती. हर्षदने शिपायाला पिण्यासाठी पाणी द्यायला सांगीतले. आज ऑफीसमध्ये पिण्याचे पाणी आले नाही. असे शिपायाने सांगीतले. आणि तो शिपाई तेथून निघून गेला.
थोडया वेळाने हर्षदच्या बाजूला बसत असलेल्या आनंद नावाच्या सहकाऱ्याने त्याच शिपायाला पाणी मागीतले. त्यावेळी त्या शिपायाने ऑफीसच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये जावून स्वत:च्या पैशाने पाणी बॉटल विकत घेतली. आणि आनंदला आणून दिली. ही बाब हर्षदच्या लक्षात आली. तो शिपायावर खूप चिडला. तो त्या शिपायाला घालून पाडून बोलू लागला.
“ तू मुद्दाम मी सांगीतलेले काम टाळतोस. शिपाई आहेस. त्यामुळे औकातीत राहायचे.”
हर्षदच्या अशा जहरी शब्दांमुळे त्या शिपायाचा स्वाभिमान दुखावला गेला. तो हर्षदला म्हणाला.
“ सर व्यवस्थित बोला. औकातीचं काढू नका. मला तुम्ही पगार देत नाहीत. खरंच ऑफीसमध्ये पाणी नव्हतं. मी आनंद सरांना बाहेरून पाणी आणून दिलं आहे.”
शिपाई उलट बोलल्यामुळे हर्षदला राग आला. तो त्या शिपायाच्या अंगावर धावून गेला. पण आनंदने मध्यस्थी करुन त्या दोघांचे भांडण मिटवले. शिपायाला दुसऱ्या कामासाठी तेथून बाहेर पाठवून दिले.
थोडया वेळाने हर्षदच्या बॉसने त्याला केबिनमध्ये बोलवले. कामामध्ये चुका झाल्यामुळे त्याने हर्षदची चांगलीच कान उघडणी केली. हर्षदला त्याच्या बॉसचा खूप राग आला होता. कारण बॉस त्याला खूप घालून पाडून बोलला होता.
‘ तू खूप मूर्ख आहेस. तुला अक्क्लच नाही. एक काम धड करत नाहीस. पगार मात्र वेळेवर लागतो.’ अशा त्या बॉसच्या मन दुखावणाऱ्या शब्दांनी हर्षद खूप दुखावला गेला. एक सणसणीत चपराक बॉसच्या गालावर मारावी. असा विचार क्षणभर त्याच्या मनामध्ये आला. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वत:ला सावरलं. कारण त्याच्या मागे बँकेचे लोण होते. त्याचे हप्ते फेडायचे बाकी होते. नोकरीचं काही कमी जास्त झालं तर घर चालवण्याचे वांदे होणार होते. मग लोण कोठून फेडायचे? असा विचार करुन तो शांत झाला. त्याचं मन खूप अस्वस्थ झालं. काय करावं त्याला सूचेना. त्याच्या मनाची घालमेल होऊ लागली. आनंदने त्याच्या मनाची अशी दु:खी अवस्था ओळखली.
ऑफीसमध्ये हर्षदचं आनंद सोडता इतर कोणाशीच जमत नव्हतं. याउलट आनंदचे सगळया सोबतच जिव्हाळयाचे संबंध होते. आनंद हर्षदच्या जवळ गेला. बॉसने बोललेल्या अपशब्दाबद्दल हर्षदने त्याला सांगीतले.
हर्षद म्हणाला. “ आज सकाळपासूनच माझा दिवस चांगला गेला नाही. सकाळी बायकोवर चिडचीड झाली. त्यानंतर ऑफीसला येताना सिग्नलवर एका माणसाबरोबर भांडण झालं ? दुपारी शिपायाबरोबर भांडण झालं. आता थोडया वेळापूर्वी बॉसबरोबर भांडण झालं. आजचा दिवस खूपच खराब गेला.”
आनंद त्याला म्हणाला, “ आज यशवंतराव चव्हाण नाटयगृहामध्ये एक नावाजलेले व्याख्याते येणार आहेत. त्यांचे व्याख्यान खूप चांगले असते. ऑफीस सुटल्यानंतर आपण तिकडे जाऊ.”
हर्षदला त्याचे बोलणे पटले. ऑफीस सुटल्यानंतर ते दोघेही त्या व्याख्यानाला गेले.व्याख्यान नुकतेच सुरु झाले होते. आजच्या व्याख्यानाचा विषय होता शब्दांची जादू.
अक्षर, शब्द, वाक्य, भाषा याबद्दल व्याख्याते बोलत होते. बोलता - बोलता ते शब्द, वाक्य म्हणजे काय? असे प्रश्न श्रोत्यांना विचारत होते. अर्थपूर्ण अशा अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. आणि अर्थपूर्ण अशा शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. अशी उत्तरे श्रोते मंडळीकडून मिळत होती. सर्व सुरळीत चालू होतं. मध्येच ते व्याख्याते काहीशा रागात ओरडले.
“ तुम्ही सर्वजण मूर्ख आणि बावळट आहात. तुम्हाला काडीची अक्कल नाही. तुम्हाला काहीच येत नाही.”
व्याख्यात्यांच्या अशा उद्धट बोलण्याने सगळा हॉल शांत झाला. त्या हॉलमध्ये वेगवेगळया क्षेत्रामधील नावाजलेले आणि प्रतिष्ठीत लोक होते. मूर्ख आणि बावळट अशा शब्दांमुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. ते सर्वजण त्या व्याख्यात्याकडे आश्चर्याने आणि काहीशा रागाने पाहू लागले. काही लोकांना खूप राग आला. काहींना वाटलं या व्याख्यात्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा. काहीजण उठून त्यांना भांडण्याच्याच तयारीत होते.
तेवढयात ते व्याख्याते म्हणाले.
“ पाहिलंत. शब्दांमध्ये किती ताकद असते. आज आपले व्याख्यान ‘शब्दांची जादू’ याच विषयावर आहे. आणखी थोडावेळ जर मी तुम्हाला अपशब्द वापरले असते. तर तुम्ही मला येथेच झोडपून काढले असते.”
त्यांच्या बोलण्याने त्यांना काय सुचवायचे होते. ते सुज्ञ श्रोत्यांच्या लक्षात आले. संपूर्ण हॉलमध्ये हशा पिकला.
व्याख्यात्यांनी हसत सर्वांची माफी मागीतली. आणि ते पुढे म्हणाले.
“ या जगात असा एकही माणूस नसेल की ज्याला त्याच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतर चांगले वाटते. लक्षात ठेवा. गरीबातील गरीब माणूस, अधिकारी किंवा शिपाई, वयस्क् किंवा लहान मूल कोणीही असूद्या. प्रत्येकजण स्वत:वर प्रेम करत असतो. स्वत:विषयी वापरलेले अपशब्द कोणीच सहन करु शकत नाही. प्रत्येकाला भावना असतात. अपशब्द वापरल्यामुळे प्रत्येकाचा स्वाभिमान दुखावला जातो. तुम्ही एखाद्याला अपशब्द वापरता. त्यावेळी तो व्यक्ती काही कारणामुळे तुम्हाला उलट उत्तर देत नाही. त्याची काहीतरी मजबुरी असते. किंवा तो तुमच्यापेक्षा कनिष्ठ असतो. पण तो त्याला बोललेले अपशब्द कधीच विसरत नाही. एक वेळ तुम्ही त्याला काय बोलला आहात हे तुम्ही विसराल. पण तो कधीच विसरत नाही. तुमच्या विषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो. तुमच्या बद्दलची आदराची भावना त्याच्या मनातून निघून जाते. त्यामुळे कोणालाही बोलताना मन दुखावेल असे शब्द वापरू नयेत.आणि हो. तुम्हाला जसे शब्द सहन होतील. तसेच शब्द इतरांशी बोलताना वापरा. तुम्हाला कोणी शिव्या दिल्या. तुम्हाला बोलताना कोणी अपशब्द वापरले. तर तुम्हाला दु:ख होते. त्याचप्रमाणे इतरांनाही होते. स्वत:वरुन इतरांच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. सर्वांशी प्रेमाने वागा. तुम्हाला इतरांकडूनही प्रेमच मिळेल.”
हॉलमधील सर्व श्रोत्यांना व्याख्यात्याचे म्हणणे पटले. सर्वांनी जोरात टाळया वाजवल्या. व्याख्याते पुढे बोलू लागले.
“ पण इतकही गोड बोलू नका की समोरच्याला डायबिटीज (मधुमेह) होईल.”
पुन्हा संपूर्ण हॉलमध्ये हशा पिकला. व्याख्याते पुढे बोलू लागले. “ सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उगाचच लोकांना वरुनवरुन गोड बोलू नका. लोकांशी बोलताना मनातून चांगले शब्द वापरा. कारण तुम्ही चांगले आहात. कपटी लोक मनात अढी ठेवून गोड बोलतात. आणि आपला हेतु साध्य करतात. कालांतराने ही गोष्ट समोरच्याच्या लक्षात येते. तुम्ही चांगले आहात. त्यामुळे इतरांशी बोलताना मनातून चांगले बोला.वायफळ बडबड करु नका. आवश्यक तेवढेच बोला.”
व्याख्यात्यांचे बोलणे सर्वजण एकाग्रतेने ऐकत होते. व्याख्याते आपल्या बोलण्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते. ते पुढे बोलू लागले.
“ शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपण चांगल्या शब्दांमुळे कोणाचेही मन आणि जग देखील जिंकू शकतो. चांगल्या शब्दांमुळे भांडण थांबवू शकतो. चांगल्या शब्दांमुळे तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतो. चांगल्या शब्दांमुळे सर्वांना आपलंस करु शकतो. चांगल्या शब्दांमुळे न होणारं कामही होतं. याउलट वाईट शब्दांमुळे भांडणे होतात. वाईट शब्दांमुळे नाती तुटतात. वाईट शब्दांमुळे माणसं दुरावतात. वाईट शब्दांमुळे लोक नाराज होतात. वाईट शब्दांमुळे होणारं कामही होत नाही. अशा प्रकारे आपण शब्द दोन प्रकारे वापरु शकतो. शब्दांमुळेच चांगलं होतं. आणि शब्दांमुळेच वाईट होतं.”
आता त्या व्याख्यात्याचा शब्द ना शब्द श्रोत्यांना पटु लागला होता. शब्दांची ताकद श्रोत्यांना कळू लागली होती. त्यामुळे सर्व श्रोते मंत्रमुग्ध होवून त्या व्याख्यान ऐकत होते.
व्याख्याते पुढे बोलू लागले.
“ मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एखाद्या अनोळखी गावात गेलात. तेथे तुम्ही एखाद्याला अमुक अमुक पत्ता विचारलात. पण तुमची विचारण्याची भाषा उग्र असेल. तर समोरच्या माणसाचा स्वाभिमान दुखावला जाईल. कदाचित तो तुम्हाला चुकीचाही पत्ता सांगेल. पण तोच पत्ता तुम्ही प्रेमळ भाषेत विचारलात. तर ती व्यक्ती तुम्हाला कधीच चुकीचा पत्ता सांगणार नाही. उलट एखादेवेळी तुम्हाला त्या ठिकाणी पोहचवायलाही येईल. हीच खरी शब्दांची ताकद असते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहत असाल. काही माणसं अशी असतात की त्यांचे सगळयांशीच चांगलं जमतं. आणि काही माणसं अशी असतात की त्यांचे कोणाशीच जमत नाही.”
व्याख्यात्याचे बोलणे ऐकून हर्षदच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला वाटलं हे व्याख्याते आपल्या विषयी आणि आनंद विषयीच बोलत आहेत. मी कोणाशीच चांगलं बोलत नाही. त्यामुळे माझं कोणाशी जमत नाही. त्यामुळे मी नेहमी दु:खी राहतो. याउलट आनंद सर्वांशी चांगलं बोलतो. त्यामुळे सर्वजण त्याच्याशी चांगलं बोलतात. सगळयांशी त्याचं चांगलं जमतं. आणि त्यामुळेच तो नेहमी आनंदी राहतो. आज दुपारी आपण शिपायाला पाणी मागीतलं. तर शिपायाने आपल्याला पाणी नाही म्हणून सांगीतलं. त्याला आनंदने पाणी मागीतले. तर त्या शिपायाने स्वत:च्या पैशाने बॉटल विकत घेवून आनंदला बाहेरुन पाणी आणून दिलं. कारण आनंद त्याचाही आदर करतो. म्हणूनच लोक त्याचा आदर करतात. हर्षद अशा विचारात असतानाच तो व्याख्यात्यांच्या बोलण्याने पुन्हा भानावर आला.
व्याख्याते पुढे बोलत होते.
“ निसर्गही आपण त्याला जे देतो. त्याच्या दुप्पट आपल्याला परत करतो. आपण त्याचा ऱ्हास केला. त्याला नुकसान पोहचवलं. तर तोही आपल्याला नुकसान पोहचवतो. काही दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये वाहून प्लास्टीकच्या बॉटल व इतर कचरा आला होता. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामध्ये समुद्राची काही चूक नव्हती. आपणच त्यामध्ये घाण टाकली होती. तीच समुद्राने परत केली होती. याउलट तुम्ही निसर्गाचे चांगल्या प्रकारे संवर्धन केले तर निसर्गही तुम्हाला भरभरून देतो. त्याचप्रमाणे मानवी स्वभावाचंही असतं. आपण दुसऱ्याला त्रास दिला. दुसऱ्याचं मन दुखावलं. तर आपल्यालाही त्रास होणार व आपलेही मन दुखावणारच. त्याच माणसाकडूनच त्रास होईल असे नाही. तर दुसऱ्या कोणाकडूनही होणार. पण होणार हे नक्की. ”
मनातून येणारी वाक्य धडक मनाला भिडतात. व्याख्याते मनातून श्रोत्यांना सांगत होते. त्यामुळे त्यांचे शब्द श्रोत्यांच्या मनाला भिडत होते.
व्याख्याते पुढे बोलू लागले. “ एक प्रयोग करा. तुमच्या आयुष्यातील वाईट माणसं डोळयासमोर आणा.”
सर्वांनी तसा प्रयोग केला. जे लोक अपशब्द वापरतात. किंवा जे लोक वाईट वागतात. अशी माणसं सर्वांच्या डोळयासमोर आली.
“ आता चांगली माणसं डोळयासमोर आणा.”
सर्वांनी तसा प्रयोग केला. जे लोक चांगले बोलतात. किंवा जे चांगले वागतात. अशी माणसं सर्वांच्या डोळयासमोर आली.
व्याख्याते म्हणाले, “ पाहिलंत. ज्याप्रमाणे तुमच्याशी बोलतात. लोक ज्याप्रमाणे तुमच्याशी वागतात. त्याप्रमाणे तुम्ही त्यांना चांगले किंवा वाईट ठरवता. लोक दोन प्रकारचे असतात. चांगले आणि वाईट. त्याचप्रमाणे शब्दही दोन प्रकारचे असतात. सुख, समाधान, शांती, आनंद, विवेक, प्रेम हे शब्द आपल्या मनात सकारात्मक भाव प्रकट करतात. दु:ख, दारिद्रय, नैराश्य, लोभ, इर्षा, खुन, दरोडा हे शब्द आपल्या मनात नकारात्मक भाव प्रकट करतात. त्यामुळे आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी नेहमी चांगल्या शब्दांचा वापर करा.
त्या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोत्यांना शब्दांची किंमत कळली होती. आणि सगळयांपेक्षा जास्त हर्षदला कळली होती. त्याच्या लक्षात आलं. आपण दुसऱ्यांना अपशब्द वापरतो. काही लोक गप्प बसतात. काही लोक उलट बोलतात. मग भांडण होतात. त्यामुळे आपलीच शक्ती खर्च होते. आपल्याच मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. आनंद ऑफीसमध्ये येणाऱ्या लोकांशी चांगलं बोलतो. त्यामुळे लोकही त्याच्याशी चांगलं बोलतात. ते लोक आपले शत्रू नाहीत. तरीही आपण मन दुखावणारे शब्द बोलून उगाचच शत्रुत्व ओढवून घेतो.
आता व्याख्यान संपलं होतं. ते दोघेही सभागृहाच्या बाहेर आले होते.
आनंद हर्षदला म्हणाला.
“ कसं होतं व्याख्यान ? ”
हर्षद म्हणाला, “ मी यापूर्वीच या व्याख्यात्यांते व्याख्यान ऐकायला पाहिजे होते. माझ्या वाईट बोलण्यामुळे माझे खूप लोक शत्रु झाले आहेत. तसेच जवळचे मित्रही दुरावले आहेत.”
आनंद म्हणाला, “आताही काहीच बिघडलेलं नाही.”
हर्षद म्हणाला, “ कसं काय? ”
आनंद हसून म्हणाला, “ सगळं सुरळीत करायला आता तुला शब्दांची जादू माहित झाली आहे. ”
हर्षदच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. दुसऱ्या दिवशी तो प्रसन्नतेने उठला. सकाळपासूनच तो सर्वांशी प्रेमाने बोलला. त्याचा परिणाम समोरील व्यक्तीही त्याला प्रेमाने व आदराने बोलू लागल्या. काही दिवसातच त्याचे दुरावलेले मित्र त्याच्या जवळ आले. आता सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागत होते. कारण आता तोच सर्वांशी प्रेमाने बोलत होता. तो आता कोणाचेच मन दुखवत नव्हता.
एके दिवशी त्याच सिग्नलवर त्याला त्याच्याशी भांडण झालेला बाईकस्वार भेटला. आनंदने त्याला मागच्या प्रसंगाची आठवण करुन देत त्याची माफी मागीतली. त्या व्यक्तीनेही ‘ मी त्यावेळी घाईत होतो. चूक माझीच होती. असे म्हणून हर्षदची माफी मागीतली. त्याचवेळी हर्षदला सकारात्मक शब्दांचा प्रभाव जाणवला. त्याला खूप समाधान मिळाले. आता हर्षद सर्वांशी प्रेमाने बोलतो. त्यालाही समोरून लोक प्रेमाने बोलतात. आता आनंदी राहण्यासाठी त्याला एक जादू मिळाली होती. आणि ती जादू म्हणजेच सकारात्मक आणि चांगल्या शब्दांची जादू होती.