भाग १
नमस्कार मित्रांनो,
आजची ही कथा एखाद्या स्पूकी , क्रिपी किंवा भयावह जगाचे दार उघडल्या जाणाऱ्या एखाद्या नंबरवर आधारित आहे. तर करू सुरुवात कथेला.
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, दिड महिना अगदीच रिकामा वेळ असणारे शाळकरी मूले आपल्या गावी जाण्यासाठी उत्साही होते. मे आणि जूनच्या महिन्यातील मित्र मंडळी त्यांना भेटणार जे होते, मित्रांनो काही ही म्हणा वर्षांतून एकदा भेटणाऱ्या मित्रमंडळीवर आपला जास्तच जीव असतो, तसाच जीव नैत्राचा आणि पावनीचा त्यांच्या गावी असणाऱ्या मैत्रीणी निता आणि दिपावर होता. वर्षातून दोन महिने भेटायच्या आणि खूप धमाल करायच्या.
नैत्रा शाळेला सुट्टी लागली म्हणून तिच्या आईच्या सुनिता च्या सारखीच मागे लागली होती, गावी जाण्यासाठी तिच्या मागे पुढे धिंगाणा घालत होती. सुनिता ही शिक्षिका असल्याने तिला ही नेत्रा प्रमाणे सुट्टी होती. नेत्राचे वडील त्यांच्या पासून दूर दुसऱ्या शहरात कामानिमित्त राहत होते, ते तिथूनच अजून चार ते पाच दिवसांनी गावी येण्यासाठी निघणार होते. सुनिताने ही मग उद्याच गावी जायची तिकटे काढून घेतली होती. जरा दोन तीन आधी जाऊन उन्हाळ्याच्या वस्तू किस, पापड, बटाटाच्या चकल्या, साबुदाण्याची चकली अश्या करून नवऱ्याला घालण्याचे तिचे मन होते, आणि रजाही होतीच (बायका अशाच असतात). मग तिने सासुबाईंना फोन करून कळवले की ती येत आहे आणि चार दिवसांनी नेत्राचे वडील पण येतील. सासुबाईंना ही आनंद झाला, आणि उन्हाळ्याच्या वस्तू करण्याची तयारी त्या करतील असेही त्या म्हणाल्या, दोघींचे फोनवर बोलणे चालू होते की नैत्राची छोटी खोडकर बहिण पावनी उठून रडू लागली , तिला असे रडताना ऐकून मात्र सुनिता थोडी दचकली, अचानक हिला काय झाले, असे चेहऱ्यावर भाव घेऊन ती जागची उठली आणि सासुबाईंना नंतर फोन करते सांगून ती तिच्या जवळ गेली, " काय झाले पिल्लू, असे का रडतय, गंधे स्वप्न पाहिले का!" सुनिता तिच्या लाडोबाला जरा लाडातच विचारत होती.
" आई, दिदिला सांगना , हॉरर व्हिडीओ बघते आणि मला रात्रीचे गंधे स्वप्न पडते." पावनी आपल्या लाडक्या स्वरात तिच्या बहिणीची तक्रार सांगत होती.
सुनिता एक रागीट नजर नैत्राकडे टाकली, नैत्रा मान खाली घालून तिची ती रागट नजर झेलत होती. सुनिता तिला फक्त ओरडून बाजूला झाली, तर पावनी पुन्हा रडत आपल्या बोबड्या स्वरात बोलू लागली, " आई, तिला मारना, नाय तर ती पुन्हा बघेल .' एवढीशी चिमुरडी दम देत बोलत होती. सुनिता ला तिचे हसू ही येत होते , पण तिच्यासमोर हसायचे म्हणजे परत रडगाणे चालू झाले असते. तिने खोटाच एक धपाटा नेत्राला घातला आणि स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे नैत्रानेही थोडे खोटेनाटे रडून घेतले आणि मग आपल्या बहिणीला आलिंगन देत म्हणाली, " पावू, मी पुन्हा भोकाडी नाय बघणार." दोघीही बहिणी बराच वेळ प्रेमाने आलिंगन देत राहिल्या. मग सुनिता ने दोघींना हाक देऊन त्याचा आवडता पनीर पराठा खायला दिला.
दुसऱ्या दिवशी सुनिता ने स्वतःची चार चाकी काढली, गावी साडी नेसूनच यायचे असा सासुबाईंचा हट्टच होता, तशी सुनिताचे आणि साडीचे वाकडेच होते, म्हणून तिने रेडी टू विअर साड्या आणल्या होत्या , ज्यामुळे तिला थोडेसे कम्फर्ट जाणवत होते. ती आता दोन्ही मुलींना चारचाकीमध्ये बसवून गावाच्या दिशेने निघाली. रस्त्यात थांबून एका फुडमॉल मध्ये तिघींनी थोडेसे खाल्ले, मग तिथेच फ्रुटीचे दोन लहान बॉटल तिने दोघींना घेतल्या. अजून तासभराच्या अंतरावर गाव होते. खाल्ल्यामुळे दोघी मुलींना झोप लागली होती, प्रवास आता संपुष्टात येतच होता की एक काळे मांजर गाडीला आडवे गेले, धडकल्याचा आवाज जोरात झाला , तशी सुनिता दचकली, तिने घराकडे जायच्या वळणावर गाडी थांबवली आणि खाली उतरून तिने चोहोबाजूंनी व्यवस्थित पाहिले, पण कुठे काहीच नव्हते. ती भेदरलेल्या अवस्थेतच पुन्हा गाडीत जाऊन बसली व तिच्या घराच्या दिशेने निघाली. घराजवळ सुनेची गाडी बघून सासुबाई आनंदाने बाहेर आल्या, पण सुनिता चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव पाहून त्याही चिंतीत झाल्या, " पोरी, काय झाले अशी का घाबरली आहेस." न रहावून सासुबाईंनी विचारले.
" काय नाय आई, असेच कदाचित प्रवासामुळे दमली आहे." सुनिता ने साफ विषय टाळला, आल्या आल्या सासुबाईंना किंवा सासरच्या लोकांना तिला त्रास द्यायचा नव्हता, " आई, मी मुलांना घेऊन जरा हात पाय धूऊन मग येते आत." सुनिताच्या बोलण्यावर सासुबाईंना आक्षेप घ्यायचे कारण नव्हते कारण त्या ही सगळ्या गोष्टी मानत होत्या. सुनिता ने आपल्यासोबत नैत्रा आणि पावनीचे हात पाय धुतले आणि मग घरात प्रवेश केला. सुनिता अजूनही त्या माजरीच्या प्रसंगातून बाहेर आली नव्हती. तिने लागलीच स्वयंपाकघरात जम बसवला आणि तेवढ्या वेळासाठी डोक्यातील विचारचक्र मंदावले आणि मनापासून स्वयंपाक करण्यासाठी ती सज्ज झाली.
इकडे नैत्रा आणि पावनी त्यांच्या मैत्रीणींकडे आल्या आणि त्यांच्या सोबत खेळू लागल्या. नैत्रा आणि निता एका वयाच्या तर पावनी आणि दिपा एका वयाच्या. नैत्राप्रमाणे निताला ही हॉरर व्हिडीओस बघायची आवड होती. त्यातूनच त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता, (नॉट टू डायल) चा आणि त्यांच्या मनात त्याचे कूतहूल निर्माण झाले, दिपा आणि पावनी एकत्र ब्लॉक्स खेळत होत्या. या दोघी आतल्या रूममध्ये गेल्या आणि निता ने तिच्या आईचा मोबाईल सोबत घेतला होता. निताकडे चक्क नॉट टू डायल ची लिस्ट च होती (आज कालची मूले पण) ती लिस्ट नैत्रासमोर धरत त्यांनी सूरू केला नको त्या उद्योगाचा थरार....
भाग २
नमस्कार मित्रांनो,
निता ने नैत्रासमोर लिस्ट धरली तसे काही सेकंदापूरती नैत्रा शहारली , करायचे की नाही हेच तिच्या डोक्यात. आईला कळले तर आई बदडून काढेन हे तिला माहिती होते, पण हे खरे असेल कशावरून , तिने भिती बाजूला ठेवून निता कडून मोबाईल घेतला आणि पहिला नंबर लिस्ट मधला डायल केला, पहिला नंबर डायल करून तिने स्पिकर मोड चालू केला, पहिला बराच वेळ शांत गेला आणि मागून आवाज आला की हा नंबर अमान्य आहे, (मी इथे कुठल्याही नंबरचा उल्लेख करणार नाही) . त्याचक्षणी दाराचा ठोठावण्याचा आवाज दोघींच्या कानावर आला, दोघीही दचकल्या चेहऱ्यावर चोरी पकडल्याचे भाव साफ दिसू लागले. नैत्राने पटकन फोन बंद करून मोबाईल साईडला ठेवून दिला. तसे निता ने दार उघडले तर समोर तिची आई सविता उभी होती, " काय ग, काय चाललंय दार बंद करून." सविता जरा दमदाटीने म्हणाली.
" आआआई, ते आम्ही मोबाईल मध्ये गेम खेळत होतो." निता जरा सावरत म्हणाली.
" मग तुला एवढा घाम का फुटलाय , खरे सांग हॉरर व्हिडीओ पाहत होतीस ना!" सविताने दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्याप्रमाणे दोघी सविताकडे बघत होत्या.
" आपल्याला सहन होत नाही ते बघता कशाला, किती घाम आलाय दोघींना पण." सविता आता काळजीच्या सुरात म्हणत होती.
" हो ताई (काकी), आता आम्ही नाही बघणार असा व्हिडीओ, यावेळी साठी माफ करा." नैत्रा तिच्या घाबरलेल्या स्वरात बोलत होती आणि ती तिथून लगेच घरी जायला निघाली. इकडे बेडच्या कडेला असलेल्या त्या मोबाईल मधून डायल स्क्रीनवरचा तो अशुभ नंबर आपोआप पुसला जात होता.
नैत्रा घरी आली तेव्हा घाबरलेलीच दिसत होती, काहिही न घडता एवढे भय , पण खरच काही घडले असते तर हेच विचार तिच्या मनात येत होते. ती थोडे शांत होण्यासाठी कार्टून चॅनेल लावून बसली होती काही वेळाने ती आधीच झालेला प्रसंग विसरून कार्टून बघण्यात मग्न झाली इकडे सुनीताचाही स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि सासू-सासर्यांना ती जेवणासाठी बोलवायला किचन मधून बाहेर येत होती तेव्हाच टीव्ही समोर बसलेली नेत्रा तिला दिसली तिचं रूप तिला काहीतरी वेगळंच आटू लागलं तशी पुढे होऊन ती नेत्राच्या जवळ आली तर नेत्रा खुनशी नजरेने टीव्हीकडे पाहत असल्याचा तिला दिसलं तिचं रूप पाहून सुनिता काही वेळासाठी स्तब्ध झाली ती अशीच उभी असताना बाहेरून पावनी घरात येऊन तिला बिलगून उभी राहिली , " आई, भूक लागली आहे, जेवायला दे ना." या पावनीच्या आवाजाने तिची तंद्री तुटली.
"अं . हं. हो बाळा आजी आजोबाबांना बोलावून आण ." असे म्हणत ती पुन्हा किचन मध्ये गेली. नैत्राकडून तिचे लक्ष पूरते हलले आणि तिने जे पाहिले ते सुध्दा तिच्या विस्मरणात गेले अगदी काही क्षणात .
पावनी आजी आजोबांना घेऊन घरात आली, तसे आजोबांनी नैत्राला ही जेवणासाठी आवाज दिला, नैत्राने मानेनेच होकार देऊन हात पाय धुण्यासाठी बाहेर असलेल्या नळाखाली हात धूवायला गेली, न जाणे ती बोलली असती तर या लोकांना सहन झाले असते का!
नैत्रा आली , सगळे जण जेवायलाही बसले, सुनिता वाढत होती त्याच तिच्या सासुबाई म्हणाल्या, "राहू दे ग पोरींना वाढ , बाकी आम्ही घेऊ." (अशी सासू पाहिजे) . मग वाढून घेतल्यावर सामान्य पद्धतीने जेवणारी नैत्रा अचानक घास तोंडात अक्षरशः कोंबू लागली, तिला असे खाताना पाहून सुनिताचा घास हातातच राहिला, तिला काय करावे सुचेना, तेव्हाच सासुबाईंनी तिला आवाज दिला, " पोरी, शुध्दीवर ये." त्यांच्या आवाजासरशी सुनिता नैत्राजवळ गेली आणि तिचे वाईटरित्या चालणारे हात तिने थांबवले , " नैत्रा, काय चाललय तुझे, हेच शिकवलय का मी तुला." (एकट्या बाईने पोरींना सांभाळणे कठीण असते राव, नवरा दूरदेशी असला की , आणि वरून तिला बोलणारे पण असतात, सुदैवाने सुनिताच्या सासूबाई तश्या नव्हत्या) . सुनिताचा पकडलेला हात नैत्राने जोरात हिसकावला आणि पुन्हा वेड्यासारखे खाऊ लागली. सुनिता तिला पुन्हा हात लावणार तोच नैत्राने आतापर्यंत खाली घातलेली मान वर उचलली , तिचे ते निखाऱ्यासम लाल डोळे पाहून सुनिताची पाचावर धारण बसली, तिचे ते लाल डोळ्यांचे तेज तिला सहन झाले नाही, तिला असे डोळे धरताना पाहून ते ध्यान जोरजोरात हसायला लागले, ते हसणे अगदी विखारी आणि विषारी होते. एखाद्या पालीसारखे ते भिंतीला चिकटून उभे राहिले, नऊ वर्षाच्या नैत्रामध्ये कसलातरी भयंकर शिरकाव झाला आहे, हे समजायला त्या कोणालाच वेळ लागला नाही, सगळे तिच्यापासून अंतर राखून उभे होते. खासकरून पावनी, कारण तिला आपल्या बहिणीला असे पाहून प्रचंड भिती वाटली. त्याही घाबरलेल्या अवस्थेत सुनिता तिला बोलली, " ककककोण आहेस तू, माझ्या मुलीला का धरले आहेस."
सुनिताच्या ह्या प्रश्नावर ते ध्यान पुन्हा वेड्यासारखे हसू लागले, आणि म्हणाले, "तिनेच मला फोन करून बोलावले आहे, आता तिला मी माझ्या राज्यात घेऊन जाणार आहे." पुन्हा एक गडगडाटी हास्य आणि सोबतच या तिघांची झालेली भयानक अवस्था..
भाग ३
नमस्कार मित्रांनो,
एक सावळासा, उंचीला बरा अंगात सफेद टि शर्ट , एक लेदर जॅकेट आणि खाली काळी जिन्स घालून एक इसम बस स्टॉप वरून चालतच निघाला होता. शहरी पेहरावात त्याला पाहून जो तो त्याला न्हायाळून बघत होता, अजय आपल्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी दोन दिवस आधीच गावी येत होता. रात्रीचे नऊ वाजून गेले होते, घराजवळच्या मातीच्या पायवाटेने तो आता घराजवळ पोहचला होता की त्याच्या कानावर विचित्र हसण्याचा आवाज घूमला. तो सरळ घराच्या उंबरठ्यावर धावतच पोहचला. आतला प्रकार पाहून त्याच्या ही घशाला कोरड पडली.
अचानक समोर अजयला पाहून सुनिता चा बांध सुटला आणि ती धावतच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली, " अहो, बघाना आपली नैत्रा कशी करतेय." सुनिता ला धड बोलताही येत नव्हते. तशीच घाबरलेल्या अवस्थेत ती अजय ला खेटूनच राहिली. अजय पण पूर्ण सुन्न झाला होता, आश्चर्याचा धक्का द्यायला आलेला पण आता त्यालाच धक्का बसला होता. जेवणाची ताट वाढलेली तिथेच एक पाण्याचा भरलेला ग्लास होता तो त्याने गटगट प्यायला. ते ध्यान आपले काळे बटबटीत डोळे घेऊन सगळ्यांकडे नजर टाकत होते. पाण्याने जरा हूशारी आल्यानंतर अजय त्या ध्यान्याकडे बघत म्हणाला, " कोण आहेस तू, काय हवय तुला माझ्या मूलीकडून, सोड तिला." अजय अगदी तावातावाने बोलत होता, बोलणारच त्याच्या जिवाचा तुकडा एका अमावनीय शक्तीने जो ग्रासला होता. त्याचे ऐकून ते ध्यान म्हणाले, " ए, तिने मला बोलावून घेतले आहे माझ्या राज्यातून, मी स्वतः आलो नाही आणि मी हिला आता घेऊन जाणार आहे कायमचे." त्याचे हे वाक्य ऐकून अजय क्षणभर घाबरला पण त्याने तसे दाखवले नाही, तो पुन्हा त्याला विचारू लागला, " ती लहान मूलगी आहे एवढीशी ती तुला काय बोलणार, खेळ करून बोलावून घेतले असशील स्वतःला , आणि तिच्यावर नाव घेतोस, बाजूला हो तिच्या शरीरातून." अजय ला हे कळत होते की त्याच्याशी बोलून काहीही उपयोग नाही , पण लेकीसाठी तो सारे काही करत होता.
" ए, मी कुठेही जाणार नाही तिला नेल्याशिवाय, तू काहीही बोल मी येत्या दोन दिवसात तुझ्या मुलीला घेऊन जाणार म्हणजे जाणार, तिने स्वतः मला बोलावले आहे, त्यामुळे आता माघार नाही." ते ध्यान दात विचकत हसू लागले, तसा अंगावर एकदा काटा फुटावा तसा अजय पुन्हा ब्लॅंक होऊन गेला. आपले प्रयत्न फसत्यात हे त्याला जाणवू लागले, तसेच काहीसे आठवून तो पून्हा बोलला, " तुला कसे बोलावले माझ्या मूलीने, तू आलास तरी कोठून!" त्याच्या या प्रश्नावर ते ध्यान पुन्हा वेडवाकडे हसू लागले आणि म्हणाले, " माझ्या नंबर वर तिने कॉल केलेला आणि "ये ना रे आवाज" असे तिनेच मला आमंत्रित केले." एवढे बोलून तो पुन्हा हसू लागला.
आता अजयला थोडी कल्पना आली होती की हा कोठून आला आहे, जर आपण कोणी याला पुन्हा त्या नंबरमध्ये घालवू शकलो तरच काहीतरी होण्याची शक्यता आहे, पण कसे शक्य करावे ते त्याला समजत नव्हते. अजय हा एकटा दुसऱ्या राज्यात कामासाठी राहत होता, त्यात त्याची ओळख बऱ्याच लोकांसोबत झाली होती. नुकताच त्याच्या एका मित्रासोबत तो उज्जैनला गेला होता, आणि त्याची विभूती योगायोगाने त्याच्या वरच्या खिशात होती. त्याने चटकन नैत्राच्या डोक्याला त्या विभूतीचे स्नान घातले आणि थोडी विभूती छोट्या पावनीला ही लावली. त्या विभूती स्पर्शाने नैत्रा थोडी किंचाळू लागली आणि तशीच खाली जमिनीवर कोसळली.
भाग ४
अंतिम भाग
नमस्कार मित्रांनो,
" हेलो, जय !, अजय बोलतोय." अजय जरा घाबरतच त्याच्या सोबतीच्या मित्राशी जयेश शी बोलत होता.
" अजय, काय झाले असा का घाबरला आहेस, ठिक आहे न सगळे, गावी जाणार होतास ना!" अजय चा काळजीचा सूर ऐकून जयेश बोलला.
तसे अजयने काल रात्रीची सगळी घटना जयेशला ऐकवली, आणि म्हणाला, " मला पटकन काही सुचले नाही, खिशात ठेवलेली पुडी मात्र आठवली आणि ती चटकन माझ्या मूलीच्या डोक्यावर मोकळी केली, मला फक्त तिला त्या अमावनीय शक्तीपासून दूर न्यायचे होते, माझ्या धाकटीला पण मी लगेच विभूती लावली, माझी भिती होती की एकीला सोडल्यावर दुसरीचा ताबा नको घ्यायला त्या अभद्रने, मला जे सुचले ते मी तात्काळ केले." एवढे बोलून अजय एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला.
" अरे, तू रडतोयस , एवढा रूबाबदार माणूस आणि रडतोस, हे बघ तो काही नैत्राला घेऊन कुठे जाणार नाही, आपण त्याच्या जगात त्याला परत पाठवू, तू काही त्रास करून घेऊ नकोस." जयेश त्याच्या परीने समजावून सांगत होता.
" अरे जय , आपण सामान्य माणसे आहोत, आपण काय करणार यामध्ये." अजय अजूनही अगतिक होऊन बोलत होता.
" अरे अज्या, तुला आणि कोणालाच नाही माहित की मी भयकथा लिहतो आणि बऱ्याच सत्य घटना मी आणि माझ्या घरच्यांनी देखील अनुभवल्या आहेत, त्या कधीतरी ऐकवेन तुला, सध्या तुझ्या मूलीची केस महत्तवाची आहे." जयेश त्याचा सुप्त गुण सांगत बोलला.
" अरे जय, खरच का! पण मग माझ्या नैत्रासाठी काय करावे लागेल." अजय झोपलेल्या नैत्राकडे बघत म्हणाला.
" हे बघ, सध्या तरी तिच्या आणि धाकटीच्या अंगावरची विभूती पूसू देऊ नकोस, आणि तुमच्या घरातल्या देवभोळ्या माणसाचे स्मरण कर, जे ह्यात नाही आहेत, बाकी मी येऊन सांगतो." जयेश ने त्याच्या परीने तात्पुरता उपाय सांगितला.
" ठिक आहे जय, तू म्हणशील तसच करतो, तुझ्याशी बोलून मोकळे वाटले, थँक्यू." अजय खूप समाधान पावल्यासारखे बोलला.
" साल्या, मित्राला थँक्यू बोलतो, बघतो तुझ्याकडे आल्यावर, मला लोकेशन पाठव तूझे." जयेश ने वातावरण हलके करत फोन कट केला.
इकडे अजय ने त्याचे लोकेशन जयेशला पाठवले, आणि किचनमध्ये जिथे सुनिता होती तिथे गेला. सुनिता किचन आवरतच होती की अजय ने तिला हाक मारली, " सुनिता, ऐक ग जरा." अजय च्या बोलण्यावर सुनिता तिचे आवरून मागे फिरली तस तिच्या चेहऱ्यावर भलतेच भाव जाणवले, अजय एक क्षणभर तिला बघत राहिला , तो स्तब्ध उभा होता कि तितक्यात सुनिता चा आवाज आला , " काय ओ, काय झाले." तिच्या आवाजाने अजय भानावर आला, त्याला तिच्यात भलतच काही जाणवले होते.
" अं. आ.. नाही काही नाही, मी म्हणत होतो, नैत्रा आणि पावनीला आपल्याच रूममध्ये झोपू दे आज." त्याला खात्री करून घ्यायची होती आपण जे पाहिले ते खर आहे का.
" ननको, खूप दिवसांनी भेटलो आपण , जरा वेगळे झोपूयात, मला थोडे समजून घ्या, तशाही त्या आता सुरक्षित आहेत दोन दिवस." सुनिताच्या तोंडून असे ऐकून अजय तिच्याकडे बघतच राहिला.
" अग सुनिता, तुला कळतय का तू काय बोलतेस, तुझ्यासाठी मूली महत्त्वाच्या आहेत की आपले भेटणे". अजय जरा वैतागून बोलला आणि पुढच्या क्षणाला सुनिताच्या डोळ्यात बघून हरकल्यासारखा तिच्या मागोमाग दुसऱ्या खोलीत जाऊ लागला, त्या दोघांमध्ये वेगळीच ऊर्जा जाणवत होती, सुनिता जी भित्री आणि सोज्वळ होती ती आता वेगळ्याच ऊर्जेने भारलेली दिसत होती. अजय तिच्या अमलाखाली ती म्हणेल तसाच वागत होता, रात्री अजून काही वेगळा प्रकार घडला नाही. सकाळी जरा डोके धरतच अजय उठला, रात्रीच्या प्रसंग त्याच्या पुसटसा लक्षात होता, एक हसू चेहऱ्यावर घेऊन अजय बाहेर आला आणि काहीतरी आठवल्यासारखे होऊन मुलांच्या रूमकडे आला, दोन्ही मूली आरामात झोपल्या होत्या, दोघींच्या ही डोक्याला अजून विभूती होती, ज्याने तो थोडा निश्चिंत झाला. मागून हालचाल जाणवली तसा अजय मागे वळला, मागे सुनिता उभी होती, तिच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव होते, ती अजयकडे तर कधी मुलींच्या खोलीकडे पाहत होती. अजय मात्र तिला पाहून गालात हसत होता. सुनिता त्याला असे हसताना पाहून ती अजूनच गोंधळली आणि मूलींकडे गेली.
" सुनिता, मुलींना अजून एक दिवस तरी अंघोळ घालू नकोस, विभूती राहू दे अंगावर." कालचे जयेश चे बोलणे आठवून अजय बोलला.
" होका, ठिक आहे, नाही घालत अंघोळ, तुम्ही तरी उरकून घ्या अंघोळ , मी नाश्त्यासाठी बघते." सुनिता बोलून किचनमध्ये निघून गेली.
अजय पण आता नित्यक्रम उरकण्यासाठी निघून गेला, इकडे अजयचे आई वडील ही सकाळची काम उरकून माजघरात बसले होते, अजयची आई सुनिता ला मदत म्हणून दुपारच्या जेवणाची भाजी चिरत होत्या, तसे अजयचे बाबा त्याला म्हणाले, " अज्या, नैत्रा कशी आहे?" बाबांच्या प्रश्नावर अजय बोलला , " बरी आहे आता, झोपेत आहे अजून." तसाच अजय त्याच्या आईकडे वळत म्हणाला, " आई, माझा एक मित्र येणार आहे, थोडे जेवण जास्त करशील का!" अजयची सवयच होती नम्रपणे बोलण्याची , तो कधी कोणाला पटकन बोलत नसे, त्यावर त्याची आई हसत म्हणाली, " अज्जू, अरे विनंती कसली करतोयस, बनवण्याचे आहे असे सांग सरळ, तू अजूनही तसाच आहेस बाबा." असे म्हणून अजयची आई किचनमध्ये निघून गेल्या.
काही वेळातच जयेश ची गाडी अजय च्या घरासमोर आली , त्यावेळी मूली सुध्दा उठल्या होत्या, नैत्रामध्ये आलेला मलूलपणा सहज जाणवत होता, जयेशसोबत एक कोणी महापुरुष आले होते , त्यांच्या गळ्यात रूद्राक्ष माळा , डोक्यावर दोन बिंदू असलेला कुंकवाचा टिळा आणि खांद्यावर एक पत्रकार घेतात तशी पिशवी अडकवली होती, अंगावर एक पांढराशुभ्र सदरा आणि एक पांढरीशुभ्र विजार त्यांनी परिधान केली होती. त्यांचे अस्तित्व जाणवताच किचनमध्ये असणाऱ्या सुनिता ला कायतरी होऊ लागले, तिला अजय च्या आईने पाहुण्यांना पाणी न्यायला सांगितले असताना ती तशीच स्तब्ध उभी राहिली. गुरूजी नैत्राकडे बघतच होते की त्यांना किचनमधून अजयच्या आईचा गळा धरून येणारी सुनिता दिसली. त्यांनी लागलीच आपल्या पिशवीतून विभूती काढून तिच्यावर फुंकली, " ह्याट, याचा काय होणार नाय माझ्यावर परिणाम, या बाईची कमजोरी मला सापडली आहे, तेच मी पूर्ण करून देतोय तिला, त्यामुळे तू माझे काही बिघडवू शकत नाही." त्याचा असा आवाज ऐकून अजय सोबत सगळेच घाबरले होते. अजयच्या आईचा श्वास कोंडत चालला होता. " माझ्या आईला सोड, आणि कसली कमजोरी सापडली तुला माझ्या सुनिता मध्ये, का तिला धरलयस आणि न सोडण्याचा हट्ट करतोयस." अजय त्या अमानवी शक्तीला उद्देशून बोलत होता.
" कालची रात्र आठवते ना!" अजयकडे ते ध्यान मिश्कीलपणे बघत हसत होते. अजयला ही काही क्षणात डोळ्यासमोरून सारे निघून गेले आणि सकाळचे सुनिताच्या चेहऱ्यावर असलेले गोंधळलेले भाव ही त्याच्या लक्षात आले.
" हे बघ, माझ्या सुनिताला आणि माझ्या आईला सोड, मुळात तुझे या जगात काहीच अस्तित्व नाही आहे, तू इथे राहून सृष्टीच्या नियमाविरूध्द वागतोयस." अजय काही बाही बडबडत होता, जे त्या अमावनीय ध्यान्याला कूठूनही परावृत्त करत नव्हत.
मग गुरूजींनी शक्कल लढवून त्या अमानवीय ध्यान्याचे लक्ष नसताना सुनिताच्या गळ्यात रूद्राक्ष माळ टाकली , आणि आपल्या डोक्याचे कुंकू तिच्या डोक्याला लावले, अजयच्या आईच्या गळ्याची पकड सैल झाली, तश्या त्या बाजूला झाल्या आणि खोकू लागल्या. अजयने आईला सावरले आणि सुनिताच्या दिशेने तो पुढे गेला, गुरूजी त्वरीत म्हणाले , " एखादा वापरात नसलेला मोबाईल फोन घेऊन या." त्यांच्या या वाक्यावर अजयच्या आईने मासघरातील कपाटाकडे अंगुलीनिर्देश केला, अजय ही त्या कपाटाजवळ जात आधी खण उघडले तर चौथ्या खणात त्याला एक बंद मोबाईल सापडला, तो तडफडणारा आत्मा आता पूर्णपणे गुरूजींच्या ताब्यात होता, त्यांनी जराही वेळ न दवडता त्याला आपल्या शक्तीने मोबाईल मध्ये कैद केले व एका बंद पेटीमध्ये लागलीच तो मोबाईल ठेवून दिला, इकडे सुनिता जमिनीवर कोसळली, तिला आधार द्यायला अजय पुढे गेला . गुरूजी तो मोबाईल घेऊन बाहेर पडले आणि दूरवर दिसणाऱ्या खाडीजवळ तो मोबाईल बंद पेटीसहीत पूरून आले.
गूरूजी घरी आल्यावर म्हणाले, " बाधित लोकांनी आज अंगावर पाणी घेऊ नका, उद्यापासून तुमचे नित्यक्रम तुम्ही चालू करू शकता. एवढे सांगून गुरूजी जयेशसोबत परतीच्या मार्गाला निघाले.
" अहो, गुरूजी जेवण करून जावा, असे एकदम निघालात." अजय त्याच्या विनम्र शैलीत बोलला.
" नाही ,सध्या तुमचे घर बाधित आहे, लवकरच आम्ही खास जेवणासाठी पुन्हा येऊ, काळजी घ्या." एवढे बोलून गुरूजी आणि जयेश निघून गेले. तो दिवस चांगला गेला, आणि पुन्हा कसलाच त्रास घरात झाला नाही. सुनिताकडून चांगलाच ओरडा नैत्राला मिळाला होता.
आज दोन मैत्रीणी खाडीवर फिरत होत्या, आणि एके ठिकाणी माती उकरत त्याचे न बनणारे वाडे बनवण्याचा प्रयत्न करत होत्या, माती उकरत असतानाच एक पेटी त्या चिमकुल्यांच्या हाती लागली, सहसा निर्मनुष्य असणारा तो भाग असल्याने आपले किल्ले पडू नये असा विचार करून त्या तिथे गेल्या , आणि त्यांच्या हाती भलतच लागले, जशी त्यांनी पेटी उघडली आत एक मोबाईल फोन दिसला, ज्यावर येत होते," कॉल मी ऑन ......."
समाप्त