Marathi Quote in Motivational by मच्छिंद्र माळी

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

*** सद्गुरु ***


गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते .

विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत .
या सर्व विद्या आणि कला पोट भरण्यासाठी किंवा करमणुकीसाठी असतात . विद्या अनेक कला अनेक असल्यामुळे प्रत्येक विद्येत आणि प्रत्येक कलेत गुरु वेगवेगळा असतो . परिणामी अनेक विद्या आणि अनेक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गुरु करणे अपरिहार्य असते .
परमार्थाच्या प्रांतात मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे प्रकार आहेत . मंत्रगुरु त्यांनाच म्हणतात जे शिष्यांना किंवा साधकांना मंत्र देतात किंवा नाम देतात आणि काही कर्मकांडात्मक गोष्टी करण्यास शिकवितात . उदाहरणार्थ - भजन-पुजन , यज्ञ-याग, जप-जाप्य , तीर्थयात्रा , व्रतवैकल्ये , उपास-तापास व ग्रंथ पोथ्यांची पारायणे करणे हे होत .
विशिष्ट मर्यादेपर्यंत हे मंत्रगुरु परमार्थाला पोषक ठरतात , हे खरे , परंतु त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे हे मंत्रगुरु मुळीच उपयोगी पडत नाहीत ; इतकेच नव्हे तर परमार्थाचा पुढील मार्ग अशा मंत्रगुरुंच्या शिष्यांना किंवा साधकांना जवळ जवळ बंदच होतो .
मंत्रगुरुंना चिकटून राहून मोक्षगुरुकडे न जाणारे साधक शेवटपर्यत अज्ञानी व अडाणी राहून स्वतःचे अपरिमीत नुकसान करुन घेतात .
" गुरु केल्याशिवाय गती नाही म्हणून कोणाला तरी गुरु करुन मोकळे व्हावयाचे व एकदा तो गुरु केल्यानंतर त्याला सोडून दुसरा गुरु करणे म्हणजे महापाप " अशी परमार्थात पडलेल्या अनेक साधकांनी स्वतःची प्रामाणिक समजूत करुन घेतलेली असते . किंबहुना अशा तऱ्हेची अंधश्रध्दा साधकांच्या ठिकाणी निर्माण करण्यात व तशी ती दृढ करण्यात तथाकथित गुरुजनांचाच सिंहाचा वाटा असतो .
आपण ज्यांना सदगुरु मानतो ते जर मंत्रगुरु असतील तर अशा मंत्रगुरुंना सोडून मोक्षगुरुकडे जाण्यात पाप तर नाहीच पण महापुण्य मात्र निश्चित आहे . या सत्याची जाणीव त्यांनाच होऊ शकते , ज्यांच्या जवळ बुध्दिची प्रगल्भता असून आत्मज्ञानाची ज्यांना तहान लागलेली आहे .
थोडक्यात , आत्मसाक्षात्काराचे महाभाग्य प्राप्त करुन घेऊन जन्माचे सार्थक करण्यासाठी गुरु म्हणजे सदगुरु करावयाचा असतो , याचे भान साधकांना असणे आवश्यक आहे .
या संदर्भात खऱ्या सदगुरुंचे मार्गदर्शन फार वेगळे असते , हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे . " शहाणपण " हे अमृत देऊन प्रपंच नेटका कसा करावयाचा हे सदगुरु शिकवितात , त्याचप्रमाणे दिव्य स्वरुपाच्या विस्मृतीरुप गाढ झोपेतून हलवून हलवून जागे करुन सतसाधकांना ते आत्मज्ञानाचा प्रसाद देतात .

जे खरे सदगुरु असतात त्यांचे कार्य फार मोठे असते . ते साधकांना नाममंत्र तर देतातच पण कर्मकांडाच्या जंजाळात न अडकविता त्यांना साधनेची विविध अंगे टप्प्याटप्प्याने शिकवित शिकवित आत्मसाक्षात्कारापर्यंतचा मार्ग दाखवितात .
समाजात निरनिराळ्या थरावरचे (Levels) साधक असतात . प्रत्येकाची कुवत , बुध्दी , ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती व क्षमता वेगवेगळी असते . या सर्वांना त्यांच्या त्यांच्या कुवती प्रमाणे योग्य ती साधना शिकवून , हे सदगुरु साधकांचा उध्दार करतात . त्याचप्रमाणे सदगुरुंवर मनापासून प्रेम करणारे एकनिष्ठ , प्रामाणिक व नम्र असे जे अधिकारी साधक असतात त्यांना दिव्य बोध व दिव्य साधना शिकवून " आपणा सारिखे करितो तात्काळ " असा साक्षात्काराचा सोपान दाखवितात .

जे खरे सदगुरु असतात ते या भूलोकावरचे चालते बोलते देव होत .

थोडक्यात , अशा मोक्षगुरुंना - सदगुरुंना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा मार्ग शिकून घेऊन स्वतःचे शाश्वत कल्याण साधण्यातच साधकांचे खरे हित असते , याची जाणीव साधकांना होणे आवश्यक आहे
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

Marathi Motivational by मच्छिंद्र माळी : 111125133
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now