मंदिरात दर्शनाला आलेल्या एक दोघाना उसळलेल्या आग्या माशांची भिरी घंव घंव करीत येताना दिसल्यावर लोकानी हातातल्या पिशव्या वगैरे तिथेच टाकून “आग्यो माश्यो उसाळल्यो........ ” अशी बोंबाबोंब करीत गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली नी ते बचावले. डुक्कर नेणारे सात केरळी त्याना माशा डसायला लागल्यावर डुक्कर तिथेच टाकून सैरावैरा धावत सुटले. ते गैर माहितगार असल्यामुळे गावच्या दिशेने न जाता चढणीच्या दिशेने पळाले नी दमछाक होवून नेमके माशांच्या हल्ल्यात गावले. या सगळ्या गदारोळात भिकुभाऊनी शांत चित्ताने डोळे मिटून आवर्तनं सुरूच ठेवली. दोन तासानी वारा थांबला नी आग्यामाशा शांत झाल्या. मध्यान्ही नंतर एकादष्णी पुरी झाल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भिकु भाऊनी वरण-भात रांधून देवाला नैवेद्य दाखवून